विवेकानंद, स्वामी : (१२ जानेवारी १८६३–४ जुलै १९०२). एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगद्विख्यात संन्यासी. मूळ नाव वीरेश्वर रूढ झालेले नरेंद्रनाथ. आई भुवनेश्वरीदेवी. वडील विश्वनाथ दत्त, कलकत्ता उच्च न्यायालयात वकील. दत्त घराणे कायस्थ जातीतील होते. नरेंद्रावर बालवयात आईकडून धार्मिक, तर मोठा झाल्यावर वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले. मेट्रपॉलिटन इन्स्टिट्यूट, प्रेसिडेन्सी कॉलेज आणि जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशन येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण होऊन नरेंद्र १८८४ साली बी. ए. ची परीक्षा दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाला. नंतर त्याने कायद्याचा अभ्यास केला पण परीक्षा दिली नाही. महाविद्यालयीन जीवनात जगाचा इतिहास आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचा विशेष अभ्यास झाला. मिल आणि स्पेन्सर यांच्या ग्रंथांचा खोल परिणाम त्याच्या मनावर झाला. ⇨बंकिमचंद्र चतर्जींच्या आनंदमठ (१८८२) ह्या कादंबरीमुळे देशभक्तीची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. नवगोपाल मित्र यांच्या हिंदू महामेळा या संस्थेच्या कार्यक्रमांना तो जात असे. त्याच्यावर सर्वांत अधिक परिणाम झाला तो ⇨केशवचंद्र सेन आणि ⇨शिवनाथ शास्त्री यांच्या ⇨ब्राह्मो समाजाचा. त्या समाजाचे रीतसर सदस्यत्व नरेंद्राने स्वीकारले. मूर्तिपूजेला विरोध आणि सामाजिक सुधारणांचे महत्त्व हे विचार तेथून उचलले. नरेंद्राचे आजोबा दुर्गाप्रसाद हे संन्यास घेऊन घरातून निघून गेले होते. नरेंद्राच्या ठायी आरंभापासून संन्यासाची ओढ होती. लहानपणी दारावर येणाऱ्या साधुबैराग्यांना तो काहीही देऊन टाकत असे. पुढे घरात विवाहाचा विषय निघाला, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. त्याच्या ठायी एक सुप्त आध्यात्मिक प्रवृत्ती होती. ⇨रामकृष्ण परमहंस (१८३६–८६) यांच्या भेटीनंतर तिला खरी जाग आली.

स्वामी विवेकानंद

१८८१ च्या नोव्हेंबरमध्ये सुरेंद्रनाथ नित्र यांच्या घरी काही भक्तिगीते म्हणण्याच्या निमित्ताने नरेंद्राची श्रीरामकृष्णांशी पहिली दृष्टिभेट झाली. त्यांनी म्हटल्यावरून नरेंद्र दक्षिणेश्वरला त्यांना भेटावयास गेला. त्याआधी महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल हेस्टी यांच्याकडून श्रीरामकृष्णांच्या समाधी लागण्याबद्दल ऐकले होते. डॉ. रामचंद्र दत्त हे एक जवळचे नातेवाईक. ते नरेंद्राला म्हणाले होते, “ तुला ईश्वरप्राप्तीची खरीखुरी इच्छा असेल, तर दक्षिणेश्वरला जा.” नरेंद्राने तोवर ⇨देवेंद्रनाथ टागोरांपासून अनेकांना प्रश्न विचारला होता, “ तुम्ही देव पाहिला आहे का?” पण कोणीही त्याला होकारार्थी उत्तर देऊ शकले नव्हते. दक्षिणेश्वरच्या भेटीत श्रीरामकृष्णांना हा प्रश्न केल्यावर, “ होय, मी देव पाहिला आहे व तुझी इच्छा असेल तर मी तुलाही त्याच दर्शन घडवू शकेन ” , असे निःसंदिग्ध उत्तर त्यांनी दिले. त्यांचे विशुद्ध मन आणि संपूर्ण ईश्वरशरणता यांमुळे नरेंद्र त्यांच्याकडे आकृष्ट झाला. तरीही आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा स्वीकार न करण्याची त्याची चिकित्सक वृत्ती व संदेहशीलता कायम होती. १८८४ मध्ये वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आणि नरेंद्राला तीव्र मानसिक क्लेशांमधून जावे लागले. या कालात नरेंद्र प्रथमच कालीमातेच्या मंदिरात तिच्यासमोर नम्र झाला आणि श्रीरामकृष्णांमुळे अद्वैतसिद्धांताचा प्रत्यय येऊन गेला. यानंतर नरेंद्राचे जीवन संपूर्णपणे पालटून गेले. हळूहळू कुटुंबाचे पाश त्याने तोडले आणि त्याचे मन आध्यात्मिक साधनेकडे वळले. काशीपूरच्या उद्यानगृहात कर्करोगाने आजारी असलेल्या श्रीरामकृष्णांची सेवा करण्याच्या काळात १८८६ च्या प्रारंभी त्याला निर्विकल्प समाधीचा लाभ झाला. समाधीतच अखंड बुडून राहावे, अशी त्याची इच्छा होती. पण “तुला या जगात जगन्मातेचे काही कार्य करायचे आहे, ते करावं लागेल,” या श्रीरामकृष्णांच्या आदेशामुळे नरेंद्राने आपली इच्छा बाजूला ठेवली.

१५ ऑगस्ट १८८६ या दिवशी श्रीरामकृष्णांनी महासमाधी घेतल्यावर त्यांच्या आज्ञेनुसार नरेंद्र आणि त्याचे दहाबारा गुरुबंधू यांनी घरादाराचा त्याग केला आणि ते सारे एका छोट्या जुन्या घरात एकत्र राहू लागले तोच वराहनगर मठ होय. भजनपूजन, शास्त्रग्रंथांचा अभ्यास आणि अधूनमधून तीर्थयात्रा असा त्यांचा जीवनक्रम होता. श्रीरामकृष्णांनी महासमाधी घेण्यापूर्वी त्यांना भगवी वस्त्रे आणि रुद्राक्षाच्या माळा दिल्या होत्याच. वराहनगर मठात एकत्र आल्यानंतर काही अवधी गेल्यावर या सर्वांनी विरजाहोम करून विधिपूर्वक संन्यास घेतला आणि नवीन नावे धारण केली. १८९० च्या मध्याच्या सुमारास विवेकानंदांनी कलकत्ता सोडली. गाझीपूरला पव्हारीबाबांच्या आकर्षणात काही दिवस घालवून बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या मार्गाने ते मीरतला आले. तेथे एकाकी भ्रमण करण्याचा निर्णय घेतला. १८९१ च्या प्रारंभी निघून राजस्थान, काठेवाड, सौराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू असा प्रवास करीत ते २४ डिसेंबर १८९२ या दिवशी कन्याकुमारीला पोहोचले. या परिभ्रमणामुळे वर्तमानकालीन भारताचे एक विराट दर्शन त्यांना घडले. शतकानुशतके हा समाज निद्रितावस्थेत आहे, आपला उज्वल वारसा विसरला आहे आणि रूढी व परंपरा यांचा दास झाला आहे, असे भीषण चित्र विवेकानंदांच्या डोळ्यांसमोर होते.

कन्याकुमारीजवळच्या समुद्रात असलेल्या एका शिलाखंडावर ध्यानमग्न अवस्थेत बसलेले असताना या समाजाला जाग आणण्याचा संकल्प त्यांनी केला. त्यानंतर अमेरिकेत जाऊन शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी त्यांनी केलेल्या पाच मिनिटांच्या पहिल्या भाषणाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली आणि सतरा दिवस चाललेल्या त्या परिषदेवर सर्वांत अधिक प्रभाव त्यांचा पडला. त्यानंतर सुमारे साडेतीन वर्षे त्यांचा अमेरिका आणि इंग्लंड येथे संचार झाला. बुद्ध आणि ख्रिस्त यांच्याशी त्यांची तुलना झाली. अनेक व्याख्याने त्यांनी दिली, वेदान्ताचे छोटेछोटे वर्ग घेतले, लंडन आणि न्यूयॉर्क येथे वेदान्त सोसायट्यांची स्थापना केली. डॉ. राइट, इंगरसोल, विल्यम जेम्स, माक्स म्यूलर, डॉ. पॉल डायसेन असे तत्त्वज्ञही प्रभावित होऊन गेले. जे. जे. गुडविन, सेव्हियर पतिपत्नी, ओली बुल, सिस्टर ख्रिस्तिन, जोसेफाइन मॅक्लाउड अशा पाश्चात्य शिष्यांनी आपली जीवने वविवेकानंदांच्या चरणी वाहिली. मिस मार्गारेट नोबल किंवा ⇨भगिनी निवेदिता या त्यांत आग्रगण्य होत. १८९७ च्या जानेवारीत भारतामध्ये परत आल्यावर कोलंबोपासून अलमोड्यापर्यंत विवेकानंदांचे भव्य स्वागत झाले.

भारतीय वाद्यांवर त्यांनी विद्यार्थीदशेत लिहिलेले एक पुस्तक, यूरोप-अमेरिकेच्या प्रवासातील अनुभव शब्दबद्ध करणारा परिव्राजक हा लेखसंग्रह, भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे तौलनिक दर्शन घडवणारी ‘पूर्व आणि पश्चिम’ (मराठी अर्थ) ही लेखमाला, राजयोगावरील इंग्रजी ग्रंथात समाविष्ट केलेले पतंजलीच्या योगसूत्रांचे स्पष्टीकरण, सातआठ स्फुट लेख व सातआठ इंग्रजी कविता एवढे लेखन व विवेकानंदांच्या नावावर आहे. धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती आणि भारतापुढचे आजचे प्रश्न यांवर त्यांनी दिलेली व्याख्याने आणि वेळोवेळी लिहिलेली पत्रे या सर्वांचा संग्रह विवेकानंद ग्रंथावलीच्या दहा खंडातील सु. तीन हजार पृष्ठांमध्ये आहे. ‘पूर्व आणि पश्चिम’ या लेखमालेतील त्यांच्या सुबोध व अर्थगर्भ शैलीने आधुनिक बंगाली भाषेला वळण दिले आहे, असे मत विश्वकवी ⇨रवींद्रनाथ टागोर यांनी व्यक्त केले आहे. विवेकानंदांचे विचार प्राधान्याने त्यांनी दिलेल्या व्याख्यानांमधून व्यक्त झाले आहेत.

हरएक धर्म हा ईश्वरत्वाकडे पोहोचण्यासाठी मानवाने केलेला एक प्रयत्न असतो. अन्य धर्मातील स्वीकारार्ह असेल, ते आत्मसात करणे आणि आपल्या प्रवृत्तीला अनुसरून ज्याने त्याने आपला आत्मिक विकास साधणे हा खरा मार्ग होय. त्यासाठी कर्म, भक्ती, योग वा ज्ञान यांपैकी कोणत्याही एकाचा, एकाहून अधिकांचा वा सर्वांचा एकत्रित अवलंब व्यक्तीने आपल्या रुचीनुसार करावा आणि मुक्त व्हावे. धर्मग्रंथ आणि कर्मकांड, देवदेवता आणि उपासनामार्ग, तत्त्वज्ञानविचार आणि चर्च, मशिदी वा मंदिरे या साऱ्या गोष्टी केवळ दुय्यम आणि साधनरूप होत. धर्म संकुचित असता कामा नये. पशुत्वाशी नाते असणाऱ्या तामस प्रवृत्तीच्या माणसापासून तो ईश्वरी अवतार वाटावा अशा महापुरुषापर्यंत सर्वांना आपल्या छायेखाली घेणारा व्यापक विश्वधर्म जगाला दिला पाहिजे. विवेकानंदांची धर्मसंकल्पना अशा तात्विक अधिष्ठानावर उभी होती. हिंदू धर्माचा अभिमान असला, तरी त्यांनी त्याचा प्रचार कधीही केला नाही. मानवमात्राला आपल्या ईश्वरत्वाची जाणीव करून देणे आणि व्यक्तीला आपल्या हरएक छोट्यामोठ्या कृतीत त्या ईश्वरत्वाचा आविष्कार करण्याचा मार्ग दाखवणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे, असे विवेकानंदांनी म्हटले आहे. त्यासाठी १ मे १८९७ या दिवशी ⇨रामकृष्ण मिशन या नावाची संन्याशांची संस्था त्यांनी स्थापन केली. कलकत्त्यातील बेलूर मठ हे तिचे केंद्र-कार्यालय असून भारतात सु. शंभर तर परदेशांत तीसपर्यंत शाखा कार्यरत आहेत. संन्यासी आणि ब्रह्मचारी यांची संख्या आता जवळजवळ एक हजार आहे.

विवेकानंद हे एक द्रष्टे महापुरुष होते. धर्म हा भारतीय जीवनाचा मूलाधार आहे आणि विज्ञानयुगात होरपळणाऱ्या साऱ्या जगाला भारतातील अध्यात्मविचारामुळे शांती लाभणार आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी भारताला स्वतःच्या अस्मितेची जाणीव उत्पन्न करून दिली आणि पाश्चात्य जगाला भारताचा परिचय करून दिला. धर्माबरोबरच शिक्षण, राजकारण, समाजकारण, स्त्रियांची उन्नती, जनसामान्यांचा विकास अशा अनेक विषयांवर त्यांनी मूलगामी विचार व्यक्त केले आहेत. जगामध्ये यानंतर श्रमिकांच्या सत्तेचा उदय होणार आहे, हे भविष्यदर्शी उद्‌गार त्यांनी १८९८ मध्ये काढले. दरिद्रनारायण हा त्यांचा शब्द आहे. त्यांनी त्यागाला सेवेची जोड दिली आणि भारतात आजवर चालत आलेल्या संन्यासाच्या संकल्पनेत मूलभूत क्रांती केली. भारतातील अध्यात्म आणि पाश्चात्यांचे आधुनिक विज्ञान यांच्या समन्वयातून उद्याची आदर्श मानवसंस्कृती उदयाला येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बुद्धी व श्रद्धा, विचार आणि भावना, सामर्थ्य आणि करुणा, ऐहिक व आध्यात्मिक यांचा विवेकानंदांइतका उत्कृष्ट समन्वय दुसऱ्या कोणीही घातलेला नाही. भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारा व भविष्यातील समन्वयशील मानवसंस्कृतीची दिशा दाखवणारा असा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखविता येत नाही. १८९९ च्या जूनमध्ये विवेकानंद पुन्हा यूरोप अमेरिकेत गेले, ते १९०० च्या डिसेंबरमध्ये परत आले. त्याआधी दीड-दोन वर्षांपासून अविश्रांत परिश्रमामुळे त्यांचे शरीर थकत चालले होते. ४ जुलै १९०२ या दिवशी रात्री त्यांनी बेलूर मठात महासमाधी घेतली.

संदर्भ : 1. Burke, Marie Louise, Swami Vivekananda in America: New Discoveries, Parts 1 to 6. Calcutta, 1983.

        2. Dhar, Sailendranath, A Comprehensive Biography of Swami Vivekananda, Parts 1 &amp 2. Madras, 1976.

        3. Eastern and Western Disciples, The Life of Swami Vivekananda, Vols. 1 &amp 2, Mayavati, Himalayas, 1979.

        4. Mayavati Memorial Edition, The Complete Works of Swami Vivekananda, Vols. 1 to 8. Mayavati, Himalayas, 1979.

        5. Rolland, Romain, The Life of Vivekananda and the Universal Gospel, Calcutta, 1979.

          ६. करंदीकर, वि. रा. रामकृष्ण आणि विवेकानन्द, पुणे, १९८२.

        ७. करंदीकर, वि. रा. रामकृष्ण संघ – एक शतकाची वाटचाल, नागपूर, १९८९.

करंदीकर, वि. रा.