भारतेंदु हरिश्चंद्र

भारतेंदु  हरिश्चंद्र : (९ सप्टेंबर १८५०-६ जानेवारी १८८५). आधुनिक हिंदी साहित्याचे जनक हरिश्चंद्र यांचा जन्म सेठ अमीनमचंद यांच्या प्रतिष्ठित घराण्यात बनारस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपालचंद उर्फ गिरिधरदास. ‘भारतेंदु’ ही पदवी १८८० मध्ये पंडित रघुनाथ, पंडित सुधाकर द्विवेदी, पंडित रामचंद्रदत्त व्यास इ. हिंदी विद्वानांनी हरिश्चंद्रांना दिली. तेव्हापासून त्यांना ‘भारतेंदु हरिश्चंद्र’ असे गौरवाने म्हटले जाते. भारतेंदूंच्या बालपणीच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी शाळेत जाऊन पद्धतशीर शिक्षण फारच थोडे घेतले कारण स्वभाव हट्टी व चंचल होता परंतु बुद्धी व स्मरणशक्ती फारच चांगली होती व लेखनवाचनाकडे लहानपणापासून ओढा होता. त्यामुळे बंगाली, पंजाबी, हिंदी, उर्दू, संस्कृत, मराठी, गुजराती, इंग्रजी इ. भाषांचे शिक्षण त्यांनी घरच्याघरी घेतले. तेराव्या वर्षीच विवाह झाला व तीर्थयात्रेच्या निमित्ताने त्यांनी उत्तर भारताचा पुष्कळ प्रवास केला. या प्रवासात विविध भाषांचा व त्यांच्या साहित्यातील प्रागतिक चळवळीचा त्यांना जवळून परिचय झाला. त्यांच्या मनावर तिचा मोठा प्रभाव पडला. हिंदी भाषा व साहित्याच्या विकासासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. ते स्वभावाने मनमिळाऊ, उदार विद्याप्रेमी, रसिक व दानशूर होते. ते चांगले संघटनाकुशल व दूरदृष्टी असलेले पुरोगामी विचारांचे साहित्यिक होते. स्वाभाविकच त्यांच्याभोवती अनेक साहित्यप्रेमी व रसिक जमले. भारतेंदूंच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या साहित्यिकांनी आणि रसिकांनी विविध प्रकारची साहित्यिक व सांस्कृतिक कामगिरी केली. बनारस येथे ते निधन पावले.

भारतेंदूंनी स्वतः अनेक प्रकारची साहित्यनिर्मिती केली. त्यांनी हिंदी नाट्य-वाङ्‍मयाला नवे स्वरूप प्राप्त दिले. सामाजिक,पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय अशी सर्व प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. पाखंड विडंबन (१८७२) व वैदिकी हिंसा हिंसा न भवति (१८७३) या नाटकांत धार्मिक व सामाजिक अनिष्ट रूढींवर त्यांनी प्रहार केले आहेत. विषस्यविषमौषधम्‌ (१८७६) या नाटकात देशी संस्थानिकांच्या गुलामी वृत्तीचे व पतित अवस्थेचे चित्रण केले आहे. श्रीचंद्रावली (१८७६) नाटिकेमध्ये प्रेम आणि भक्ती यांचे आदर्शरूप दर्शविले आहे. भारतदुर्दशा (१८८०) मध्ये इंग्रजांमुळे भारताची झालेली दुःस्थिती त्यांनी दाखविली आहे. याशिवाय सत्य हरिश्चंद्र (१८७५), नीलदेवी (१८८१-गीतात्मक रूपक), अंधेर नगरी (१८८१-प्रहसन) ही त्यांची स्वतंत्र नाटके आहेत. त्यांच्या नाटकांची गद्यभाषा खडी बोली असून पद्य ब्रज भाषेत आहे. भारतीय व पाश्चात्त्य नाट्यपरंपरांचा संगम त्यांच्या नाटकांत आढळतो. त्यांनी अनेक नाटके रूपांतरित केली आहेत. ‘नाटक’ या शीर्षकाचा एक गंभीर व विचार परिप्‍लुत निबंधही त्यांनी लिहिला आहे. भारतेंदूंचा नाटक हा विषय आवडीचा असल्याचे प्रमुख कारण ते स्वतः नाटककार होते हे तर खरेच पण त्याशिवाय नाटक हे जनतेशी संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम आहे हेही होय. भारततेंदूंना लोकसंग्रह व लोकजागृतीची ओढ होती. त्यावेळी पारसी थिएटरने जनमनावर छाप टाकली होती. हीन अभिरूचीला उत्तेजित करून अर्थार्जन करणाऱ्या या प्रवृत्तीशी सामना करण्याच्या हेतूने भारतेंदुंनी स्वतः नाटकमंडळी स्थापना केली, उत्तमोत्तम नाटके अनुवादित केली व करवली आणि स्वतः कधी कधी नाटकांत काम करून नाट्यव्यवसायाला प्रतिष्ठाही मिळवून दिली.

भारतेंदूंनी कवी म्हणूनही मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या सु. ६९ लहानमोठ्या कविता उपलब्ध आहेत. यांत अनुवादित कविताही आहेत. त्यांनी शृंगार, भक्ती, दिव्य प्रेम यांसंबंधी कविता लिहिल्याच पण राजभक्ती, देशभक्ती, भावोन्नती आणि समाजसुधारणांसंबंधीही कविता लिहिल्या. त्यांच्या काव्यात परंपरागत काव्यप्रवृत्तींबरोबरच नवीन युगाला अनुरूप अशी कविता आहे. जुन्या वृत्तांबरोबरच नव्या वृत्तांचाही वापर त्यांनी केला. व्यंग्य व हास्यप्रचुर काव्यही त्यांनी लिहिले. त्या काळी त्यांची शृंगारपर रचना जनतेच्या जिभेवर खेळत होती. त्यांनी पुष्कळशी कविता ब्रज भाषेतच लिहिली. खडी बोलीत कविता लिहिण्याचा प्रयत्‍न त्यांनी केला, पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. त्यांचा खडी बोलीतील कवितेचा संग्रह फुलों का गुच्छा (१८८२) या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे काही महत्त्वाचे काव्यसंग्रह पुढीलप्रमाणे: प्रेम मालिका (१८७१), प्रेम माधुरी (१८७५), प्रेम प्रलाप (१८७७), प्रेम फुलवारी (१८८३) इत्यादी.


भारतेंदू चांगले निबंधकार व पत्रकार होते. हरिश्चंद्र मॅगेजिन, कवि वचनसुधा, बाला बोधिनी, हरिश्चंद्र चंद्रिका या त्यांनी संपादित केलेल्या नियतकालिकांतून त्यांचे निबंध, टिपणे प्रकाशित होत असत. या निबंधांतून त्यांची समाजोन्नतीची प्रचंड तळमळ सामाजिक, धार्मिक आणि राजकीय घडामोडींविषयीची जागरूकता स्वदेश, स्वभाषा व समाज यांच्याबद्दलचा अभिमान दिसून येतो. प्रारंभी त्यांच्या मनात राजभक्ती होती परंतु दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या राजकीय परिस्थितीचा त्यांच्या मनावर परिणाम होऊन ही राजभक्ती राष्ट्रीय अस्मितेत परिवर्तित झाली. त्यांची भाषा विषयास साजेसे रूप धारण करीत असे. व्यंग, विनोद, उपहास, उपरोध यांनी युक्त अशी प्रसादपूर्ण भाषा ते सामान्यतः वापरीत. प्रसंगी गंभीर, प्रौढ व विचारपरिप्‍लुत भाषेचाही ते वापर करीत.

भारतेंदूंनी युगप्रवर्तक लेखकाचे काम यशस्वीपणे केले. धार्मिक व शृंगारिक परंपराधिष्ठित काव्यात देशप्रेम, समाजस्थिती, सुधारणा, राजकीय परिस्थितीवर उपहास इ. विषय आणून हिंदी काव्याला आधुनिक बनविण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. भारतीय नाट्यपरंपरांनी जखडलेल्या नाट्य-साहित्यात पाश्चात्त्य नाट्याचे युगानुरूप विशेष समाविष्ट करून नाटकाला त्यांनी काळाला साजेसे रूप दिले. भारतीय संस्कृती, हिंदु धर्म, सामाजिक परंपरा यांच्याबद्दलचा रास्त अभिमान बाळगून नव्या अधुनिक मूल्यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्‍न केला. मध्य युग व आधुनिक युग यांच्या संधिकालात दोन भिन्न जीवनदृष्टी आणि मूल्यविचारांत संघर्ष येऊ न देता कल्याणकारक समन्वय करण्याचा त्यांचा प्रयत्‍न त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतो. हिंदी गद्याला (खडी बोली) अधिक व्यवस्थित, शुद्ध व शक्तिशाली बनविण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. जनसंपर्काची साहित्यिक साधने (नाटक, नियतकालिक) वापरून जनजागृतीचाही त्यांनी प्रयत्‍न केला. हे सर्व त्यांनी आपल्या मृदू, ऋजू आणि शालीन व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने केले आणि म्हणूनच त्यांच्या अवतीभोवती तत्कालीन समाजहितेच्छू विद्वानांचा व ध्येयवादी पत्रकारांचा समुदाय गोळा झाला. या समुदायालाच ‘भारतेंदु मंडळ’ म्हणतात. या मंडळातील बालकृष्ण भट्ट, बदरीनारायण चौधरी-‘प्रेमघन’, प्रतापनारायण मिश्र, राधाचरण गोस्वामी, लाला श्रीनिवास दास, अंबिकादत्त व्यास, बाल मुकुंद गुप्त, ठाकूर, जगमोहनसिंह इ. लेखक-पत्रकारांनी भारतेंदुंनंतरही त्यांचे कार्य सतत चालू ठेवले. म्हणून १८५०-१९०० हा काळ ‘भारतेंदु काळ’ म्हणून हिंदी साहित्यात ओळखला जातो. त्यांना पद्याची व गद्याची भाषा एक (खडी बोली) असावी, हे मनोमन मान्य होते परंतु खडी बोलात पद्यरचना करण्याचे त्यांचे प्रयत्‍न फारसे फलदायी ठरले नाहीत, ही त्यांच्या कार्याची एक सीमा म्हणावी लागेल.

संदर्भ: १. ब्रजरत्‍नदास, भारतेंदु हरिश्चंद्र, अलाहाबाद, १९३५.

          २. शर्मा, रामविलास, भारतेंदु युग, आग्रा, १९५६.

          ३. शुल्क, केसरीनारायण, भारतेंदु के निबंध, वाराणसी, १९५०.

          ४. शुल्क, वीरेंद्रकुमार, भारतेंदु नाट्य-साहित्य, अलाहाबाद, १९५५.

बांदिवडेकर, चंद्रकांत