मणिपूर राज्य : भारतातील पूर्व सीमेवरील एक राज्य.‘रत्‍नभूमी’ (द लँड ऑफ ज्युवेल्स) असा या राज्याचा उल्लेख केला जातो. क्षेत्रफळ २२,३५६ चौ. किमी. लोकसंख्या १४,११,३७५ (१९८१). अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे २३° ५०’ ते २५° ४१’ उ. अक्षांश व ९३° २’ ते ९४° ४७’ पू. रेखांश यांदरम्यान. मणिपूर राज्याच्या उत्तरेस नागालँड राज्य, पूर्व व आग्‍नेय दिशांना ब्रह्मदेश, दक्षिणेस मिझोराम हा केंद्रशासित प्रदेश, पश्चिमेस आसाम राज्य असून इंफाळ (लोकसंख्या १,५५,६३९ – १९८१) ही राज्याची राजधानी आहे.

भूर्वर्णन : प्राकृतिक दृष्ट्या मणिपूरचे दोन विभाग पडतात : (१) राज्याच्या मध्यभागी असलेला मैदानी प्रदेश आणि (२) त्याच्या भोवतालचा पर्वतमय प्रदेश, मैदानी प्रदेश मणिपूर खोरे या नावाने ओळखला जात असून तो सस. पासून ७६२ मी. उंचीवर आहे. या प्रदेशाची लांबी ४० किमी., रूंदी सु. ४० किमी. व क्षेत्रफळ सु. १,५५५ चौ. किमी. आहे. राज्याचा सु. ९०% प्रदेश डोंगराळ असून येथील पर्वतरांगा उत्तर – दक्षिण दिशेत पसरलेल्या आहेत. या पर्वतमय प्रदेशाच्या उत्तरेस नागा टेकड्या, पूर्वेकडील ब्रह्मदेशाच्या सरहद्दीदरम्यान मणिपूर टेकड्या व दक्षिणेस लुशाई व चीन टेकड्या आहेत. या प्रदेशाची सस. पासून उंची १,५२५ ते १,८३० मी. यांदरम्यान आढळते. जास्तीतजास्त उंची ईशान्य भागात असून तेथे सस. पासून ३,९६२ मी. पेक्षा अधिक उंचीच्या टेकड्या आढळतात. उत्तरेकडे व दक्षिणेकडे ही उंची कमीकमी होत जाते. काही ठिकाणी शंक्वाकृती टेकड्या, तर काही ठिकाणी सपाट व उघडेबोडके कटक आढळतात. आसाममधील काचार प्रदेशातून पूर्वेकडे मणिपूर खोऱ्याकडे जाताना मुख्य पाच डोंगररांगा पार कराव्या लागतात. या पर्वतरांगांच्या दरम्यान खोल अशी नद्यांची खोरी, निदऱ्या तसेच मोठमोठे कडे आढळतात. याशिवाय उत्तरेस चार, पूर्वेस पाच व दक्षिणेस एक अशा मुख्य पर्वतश्रेण्या आहेत.

सभोवतालच्या पर्वतमय प्रदेशातून वाहून आलेल्या गाळामुळे मणिपूर खोऱ्यातील मृदा गाळाची बनलेली आहे. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशात तृतीयक – पूर्व कालखंडातील स्लेट व वालुकाश्म आढळतात. उच्च प्रतीच्या चुनखडीचे येथे भरपूर साठे असून ते राज्यातील प्रमुख खनिज आहे. यांशिवाय ॲस्बेस्टस, लिग्‍नाइट यांचे तसेच तांबे, निकेल यांच्या धातुकांचेही थोडेबहुत साठे आहेत.

मणिपूर राज्य भूकंपाच्या पट्ट्यात येत असल्यामुळे अधूनमधून भूकंपाचे धक्के बसतात. १८६९ व १८९७ मधील भूकंपांचे धक्के तीव्र स्वरूपाचे होते. मणिपूरमधील बहुतेक नद्या उत्तरेकडील व ईशान्येकडील पर्वतप्रदेशात उगम पावून दक्षिणेकडे वाहत येतात. पावसाळ्यात त्या तुडुंब भरून व वेगाने वाहत असल्या, तरी आकाराने त्या फारशा मोठ्या नाहीत. इंफाळ, इरिल, थोबल, नंबुल व नंबोल या राज्यातील मुख्य नद्या आहेत. यांपैकी पहिल्या तीन नद्या उत्तरेकडील पर्वतीय भागात उगम पावून मध्यभागात असलेल्या लोकटाक सरोवराकडे वाहत जातात. मात्र त्या सरोवराला मिळत नाहीत. नंबोल मात्र लोकटाक सरोवराला येऊन मिळते व तेथून ती कोर्टक नावाने बाहेर पडते. कोर्टकला इंफाळ व नंबुल नद्या येऊन मिळाल्यावर त्यांचा संयुक्त प्रवाह अचौबा, इंफाळ किंवा मणिपूर या नावांनी ओळखला जातो. हा प्रवाह प्रथम किंदत नदीला व पुढे चिंद्‌विन नदीला जाऊन मिळतो. यांशिवाय जिरी, माकरू, बराक, इरांग, लेंगबा इ. नद्या राज्यातून वाहतात. पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेशातील नद्या खडकाळ व खोल अशा निदऱ्यांतून वाहत असून त्या निदऱ्या बहुधा जंगलवेष्टित आहेत. बराक ही पर्वतीय प्रदेशातील सर्वात मोठी नदी आहे. मैदानी प्रदेशातील नद्यांमधून लहानलहान होड्यांद्वारे वाहतूक चालते. मणिपूर खोऱ्याच्या आग्‍नेय भागात लोकटाक हे राज्यातील सर्वात मोठे सरोवर आहे. या सरोवराची लांबी १३ किमी. व रूंदी ८ किमी. असून क्षेत्रफळ पावसाळ्यात १०४ चौ. किमी. आणि कोरड्या मोसमात ६४ चौ. किमी. असते. याचे काठ दलदलयुक्त आहेत. पाण्याच्या पृष्ठभागावर अनेक पाणवनस्पती तरंगताना आढळतात. सरोवरात काही बेटे असून त्यांवर मच्छिमारांची वस्ती आढळते. थांगा हे त्यांतील सर्वात मोठे बेट आहे. याशिवाय वैथाऊ, पमलेन, इकोक, लांफेल ही इतर सरोवरे होत. सर्वच सरोवरे मासेमारीच्या दृष्टीने उपयुक्त आहेत.

हवामान : मणिपूर खोऱ्यातील हवामान थंड, आरोग्यवर्धक आहे. उन्हाळ्यातही रात्री व सकाळी हवा सामान्यपणे थंडच असते. मात्र पर्वतमय प्रदेशाइतके ते थंड नसते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. २०० सेंमी. असून जास्तीतजास्त पर्जन्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. ईशान्य भागातील पर्वतीय प्रदेशातील हवामान थंड व काहीसे आर्द्र असते. हिवाळ्यात धुके व हिमतुषार आढळतात. इंफाळ येथील सरासरी पर्जन्य १७५ सेंमी. असून डोंगराळ प्रदेशात हेच प्रमाण २५० सेंमी. पर्यंत वाढलेले दिसते.

वनस्पती व प्राणी : राज्याचे ६८% क्षेत्र वनाच्छादित असून ते पर्वतीय भागात आढळते. पाइन, फर, ओक, बांबू, साग, सिंकोना, पाम हे येथील प्रमुख वृक्षप्रकार आहेत. जरदाळू, सफरचंद, नासपती, अलुबुखार ही फळझाडेही भरपूर आहेत. काही ठिकाणी चहाचे मळे आहेत. गवताची कुरणेही पुष्कळ आहेत. मणिपूर खोऱ्यात मात्र विरळ वनश्री आढळते. जळाऊ व इमारती लाकूड हे जंगलातून मिळणारे प्रमुख उत्पादन असून बांबू, गवत, सुगंधी द्रव्ये, दालचिनी ही इतर उत्पादनेही मिळतात. १९८१ – ८२ मध्ये वनसंपत्तीपासून ३९ लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मणिपूरमध्ये सामान्यपणे हत्ती, वाघ, गेंडा, अस्वल, हरिण, रानडुक्कर इ. वन्यप्राणी आढळतात. आग्‍नेयीकडील पर्वतरांगांमध्ये गेंडा व गवा, तर उंच पर्वतश्रेण्यांत अधूनमधून सिरो किंवा गोटअँटिलोप आढळतात. रानडुक्कर, हरिण हे प्राणी मैदानी प्रदेशातही दिसून येतात. लोकटाक सरोवरात रानघोडे तसेच बदके आहेत. तितर, कृकणपक्षी व वन्यपक्षी सर्वत्रच आढळतात.


इतिहास व राज्यव्यवस्था : प्राचीन मणिपूरसंबंधी काही पुराणकथांतून माहिती मिळते. प्राचीनकाळी हा प्रदेश सागरमग्‍न होता परंतु अनेक देवदेवतांनी येथे मातीची भर घालून भूभाग निर्माण केला. या भूमीवर शंकर – पार्वती क्रीडेसाठी अवतरले असताना नागराज अनंताने आपल्या मस्तकावरील मण्याने हा प्रदेश प्रकाशित केला, त्यामुळे या प्रदेशाला ‘मणिपूर’ हे नाव प्राप्त झाले, असे म्हटले जाते. मेकलाय, कासी, मकेली, मागली, मागलन इ. नावांनीही हा प्रदेश वेळोवेळी ओळखला जाई. अर्जुनाची पत्‍नी चित्रांगदा ही येथील राजकन्या होय. तिचा पुत्र बभ्रुवाहन हा या प्रदेशाचा राजा झाला, अशी महाभारतात कथा आहे. काही अभ्यासकांच्या मते महाभारतातील ‘मणिपूर’ व सांप्रतचे आसामजवळील मणिपूर राज्य ही दोन्ही भिन्न असावीत.

आर्याच्या आगमनापूर्वी भारतात मणिपूरमध्ये एक स्वतंत्र व प्रगत राज्य नांदत होते, असे सांगितले जाते. त्यानंतर मात्र येथे आर्यांनी वस्ती केली, असे दिसून येते. तथापि इ. स. आठव्या शतकापर्यंतच्या येथील इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यापुढील सतराव्या शतकापर्यंत येथील राजघराण्यात सु. ३६ राज्यकर्ते होऊन गेल्याचे सांगितले जाते. तेराव्या शतकात या प्रदेशावर चिनी आक्रमकांनी हल्ला केला होता परंतु त्यात त्यांचा पराभव होऊन अनेक चिनी आक्रमक पकडले गेले. त्यांच्याकडूनच रेशीम उत्पादन व वस्त्रे विणण्याची तसेच विटांची घरे बांधण्याची कला येथील लोकांना अवगत झाल्याचे सांगितले जाते. पंधराव्या शतकातील राजा क्याम्बाच्या कारकीर्दीत श्रीचैतन्य प्रभूंच्या प्रभावामुळे या प्रदेशात वैष्णव धर्माचा प्रसार झाला.

मणिपूरच्या राजकीय इतिहासात पानहिबा या राजाची कारकीर्द (१७१४ ते सु. १७४९) महत्त्वाची ठरते. नाग कुळातील राजघराण्यातच त्याचा जन्म झाला. हा पितृवध करून राज्य घेईल, असे भविष्य लहानपणीच त्याच्या आईला ज्योतिषाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पानहिबाच्या आईने त्याला लहानपणीच एका नाग – सरदाराच्या ताब्यात दिले. मोठा झाल्यावर भविष्यवाणीप्रमाणेच त्याने वडिलांकडून मणिपूरची गादी बळकाविली. तो अत्यंत पराक्रमी व गरिबांचा कैवारी होता ‘गरीबनवाज’ याच नावाने तो ओळखला जातो. त्याने हिंदू धर्म स्वीकारला, त्याचे अनुकरण करून मणिपूरमधील लोकांनीही हिंदू धर्माचा स्वीकार केला. या शतकापासूनच मणिपूरचा बराचसा सलग इतिहास मिळू शकतो. या काळातच एका वैष्णव संन्याशाने गरीबनवाजाला तो चांद्रवंशीय क्षत्रिय असून अर्जुनाचा वंशज असल्याचे सांगितले. त्यामुळे गरीबनवाजाने बंगालच्या वैष्णव साधूंकडून वैष्णव धर्माची दीक्षा घेतली. या काळात त्याचे गोपालसिंह असे नाव पडले व गरीबनवाज ही त्याची केवळ उपाधी राहिली. आपल्या सु. चाळीस वर्षाच्या कारकीर्दीत सतत युद्धमग्‍न राहूनही मणिपूरच्या विकासासाठी त्याने प्रयत्‍न केला. त्याने ब्रह्मदेशावर अनेक यशस्वी स्वाऱ्याही केल्या. गोपालसिंहाला दोन राण्या होत्या. परंपरेनुसार थोरल्या राणीच्या शामशाह या मुलाला गादीवर बसविण्याऐवजी दुसऱ्या राणीच्या हट्टासाठी तिच्या अजितशाह या मुलाला गादीवर बसविले व शामशाहसह तो ब्रह्मदेशाच्या मोहिमेवर निघून गेला. आपल्याला पदच्युत करून पुन्हा शामशाहला गादीवर बसविणार असल्याची शंका येऊन अजितशाह अस्वस्थ झाला व पानहिबा आणि शामशाह हे दोघे ब्रह्मदेशातून परत येत असताना वाटेतच मारेकऱ्यांकरवी त्याने त्यांचा वध केला. या हत्याकांडामुळे अजितशाहचा भाऊ भरतशाह याने सैन्य जमवून आपल्या भावाला गादी व देश सोडण्यास भाग पाडले व स्वतःकडे राज्यकारभार घेतला. अजितशाह तेथून इंग्रजांच्या आश्रयाला गेला. भरतशाहच्या मृत्यूनंतर शामशाहचा मुलगा जयसिंह हा मणिपूरचा राजा झाला. मृत्यूनंतर (१७९९) या प्रदेशात पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण झाली त्यातच राजघराण्यातील एका वारसाने आपल्या मदतीला ब्रह्मदेशातील सैन्य बोलाविले. ब्रह्मी सैन्याने मणिपूरवर कबजा केला परंतु त्यामुळे इंग्रज व ब्रह्मी सैन्यांत युद्ध झाले. १४ फेब्रुवारी १८२६ रोजी दोघांच्यात तह (यांदाबो तह) होऊन अखेर गंभीरसिंह याला मणिपूरचा राजा करण्यात आले. त्याच्या काळात राज्यविस्तार होऊन राजकीय स्थैर्यही निर्माण झाले. गंभीरसिंहाच्या मृत्युसमयी (१८३४) त्याचा मुलगा चंद्रकीर्तिसिंह हा फक्त एक वर्षाचा होता, त्यामुळे राज्यकारभार त्याचा सेनापती नरसिंह याने पाहिला. तथापि नरसिंहाचा भाऊ देवेंद्रसिंह याने नवीनसिंह या आपल्या साथीदाराच्या मदतीने कपट कारस्थाने सुरू केली. त्यामुळे भीतीने राणी आपल्या चंद्रकीर्ती या राजपुत्राला घेऊन काचार प्रदेशात निघून गेली. पर्यायाने नरसिंह स्वतःच राजा झाला परंतु नवीनसिंहाने त्याचा कपटाने खून केला (१८५०) व देवेंद्रसिंह गादीवर आला. चंद्रकीर्ती मोठा होताच मणिपूरमध्ये आला व त्याने मणिपूरची गादी मिळविली (१८५१). प्रजेचाही त्याला पाठिंबा मिळाला व देवेंद्रसिंह तेथून पळून गेला. चंद्रकीर्तीने ३५ वर्षे राज्यकारभार केला. त्याच्यानंतर मात्र राजघराण्यात अनेक प्रतिस्पर्धी गट निर्माण झाले. या गटांच्या सत्तास्पर्धेचा फायदा घेऊन इंग्रजांनी अखेर मणिपूर आपल्या ताब्यात घेतले (१८९१). त्यावेळी युवराजपदावर असलेला टिकेन्द्रजित (चंद्रकीर्तीचा मुलगा) आणि सेनापती खंगाल यांना १३ ऑगस्ट १८९१ रोजी इंफाळच्या पोलो मैदानावर फाशी देण्यात आले आणि कुलचंद या शेवटच्या राजाला हद्दपार करण्यात आले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात मणिपूरच्या शासनव्यवस्थेत क्रमशः बदल होत गेला. १५ ऑक्टोबर १९४९ रोजी विलीनीकरणाचा करार होऊन त्यानुसार केंद्र सरकारने येथील प्रशासन आपल्या हाती घेतली. मुख्य आयुक्त केंद्र सरकारच्या वतीने येथील प्रशासन चालवू लागला. १९५० – ५१ मध्ये येथे ‘सल्लागार शासन’ सुरू करण्यात आले. १९५७ मध्ये ही शासनव्यवस्था बदलण्यात आली व तिच्या जागी ३० निर्वाचित व २ नियुक्त अशा ३२ सदस्यांची प्रादेशिक परिषद (टेरिटोरिअल कौन्सिल) काम पाहू लागली. पुढे १९६३ च्या केंद्रशासित प्रदेश अधिनियमान्वये मणिपूरमध्ये विधानसभा स्थापन करण्यात आली. तीत ३० निर्वाचित व ३ नियुक्त असे ३३ सदस्य होते. राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन १६ ऑक्टोबर १९६९ मध्ये येथे राष्ट्रपती राजवट सुरू करण्यात आली. पुढे १९ डिसेंबर १९६९ पासून मुख्य आयुक्ताऐवजी लेफ्ट. गव्हर्नर हा येथील मुख्य प्रशासक म्हणून नेमण्यात येऊ लागला. २१ जानेवीरी १९७२ मध्ये मणिपूरला राज्याचा दर्जा देण्यात आला.

विद्यमान मणिपूर राज्यात एकसदनी विघिमंडळ म्हणजे फक्त विधानसभा असून तिचे ६० सदस्य आहेत (१९८२). त्यांपैकी १९ सभासद हे काही जमातींच्या राखीव मतदारसंघांतून निवडलेले असतात. देशाच्या संसदेमध्ये या राज्यातून लोकसभेसाठी २ आणि राज्यसभेसाठी १ असे प्रतिनिधी निवडले जातात. राज्यात फेब्रुवारी १९८१ मध्ये राष्ट्रपती राजवट जाहीर करण्यात आली होती. प्रशासनाच्या सोयीसाठी उत्तर मणिपूर, पश्चिम मणिपूर, दक्षिण मणिपूर, पूर्व मणिपूर, मध्य मणिपूर व टेंगनौपल असे राज्याचे एकूण सहा जिल्हे करण्यात आले आहेत. आसाम राज्यातील गौहाती येथील उच्च न्यायालयाच्या कक्षेत हे राज्य मोडते.

आर्थिक स्थिती : शेती व वनोत्पादने ही राज्याची उत्पन्नाची मुख्य साधने होत. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. एकूण क्षेत्रफळापैकी २,१०,००० हेक्टर क्षेत्र शेतीखाली असून राज्याच्या एकूण उत्पादनापैकी ५१% उत्पादन शेतीव्यवसाय व पशुपालन यांपासून मिळते (१९७९ – ८०). शेतीच्या दृष्टीने मणिपूर खोरे महत्त्वाचे आहे. या खोऱ्यातील मृदा गाळाची, तांबडी व पुरेशी खोलीची असून तीत भाताचे पीक चांगले निघते. एकूण कृषि उत्पादनापैकी ८०% उत्पादन तांदळाचे असते. याशिवाय मोहरी, ऊस, विविध प्रकारची कडधान्ये, तंबाखू, खसखस, पालेभाज्या, गहू, ओट इ. पिकेही घेतली जातात. संत्री, लिंबू, अननस, केळी, फणस, सफरचंद, नासपती यांचेही उत्पादन घेतले जाते. भूधारणाचे प्रमाण बरेच कमी असून सु. ३२% लोकांचे भूधारणाचे प्रमाण केवळ ०.५ ते १ हेक्टर यांदरम्यान आहे. पाचव्या पंचवार्षिक योजनेपासून जपानी भात शेतीपद्धतीचा अवलंब करण्यात येत असून दुहेरी पीकपद्धती, आधुनिक बी – बियाणे, खते इत्यादींचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी १०५ छोट्या जलसिंचन योजना हाती घेण्यात आल्या आहेत. १९७७ – ७८ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन ३ कोटी ९४ लक्ष टन होते. डोंगराळ भागातील भटक्या जमाती सोपान व फिरती शेती करतात. या पद्धतीला ‘झूम’ असे म्हटले जाते.


मणिपूरचे हवामान व जमीन तुतीच्या झाडांच्या वाढीला पोषक असल्याने त्यावर रेशमाचे किडे पोसून त्यांपासून रेशीम मिळविले जाते. ओक टसर उत्पादन करणारे मणिपूर हे भारतातील पहिले राज्य असून राज्यात एकूण ५४ टसर उत्पादन क्षेत्रे आहेत.

मणिपूरमधील बहुसंख्य लोकांच्या आहारात मासे असतात. मासेमारी मुख्यतः सरोवरे, नद्या इत्यादींमधून केली जाते. राज्यात नोंदणी केलेले एकूण २४ मासेमारी विभाग आहेत. १९७९ – ८० मध्ये २,५०० टन मासे पकडण्यात आले.

राज्यात चराऊ क्षेत्र पुरेसे असल्यामुळे पशुधनही भरपूर आहे. गाई, बैल, म्हशी, शेळ्या – मेंढ्या इ. प्राणी पाळले जातात. मणिपूरी तट्टू प्रसिद्ध असले, तरी चांगल्या जातीच्या तट्टूंची संख्या अलीकडे बरीच घटलेली आढळते. डोंगराळ भागातील आदिवासी जमाती केवळ मांसासाठीच काही प्राणी पाळतात. १९७७ – ७८ मध्ये पशुधन पुढीलप्रमाणे होते गुरे ५,३३,२६९ म्हशी ९४,३१६ मेंढ्या ७,२२९ शेळ्या ३३,५६८ घोडे, तट्टू व खेचरे १,०३१ डुकरे १,७६,०९० कोंबड्या, बदके इ. २७,४५,२४४ इतर प्राणी ३२,६८९.

लोकटाक उपसा जलसिंचन प्रकल्प, सिंगडा बहुद्देशीय प्रकल्प, इंफाळ बंधारा, खोपम धरण, सेकमई बंधारा, थोबल बहूद्दशीय प्रकल्प व खुगा जलसिंचन प्रकल्प असे सात लहान – मोठे प्रकल्प राज्यात असून चक्‍पी बहुद्देशीय प्रकल्प आणि इरिल प्रकल्प उभारण्याच्या योजना हाती घेण्यात येत आहेत. या सर्व प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर जलसिंचित क्षेत्र १,४२,००० हेक्टरपर्यंत वाढेल. राज्याची विद्युतनिर्मितिक्षमता १४,८३७ किवॉ. आहे (१९८१ – ८२). लोकटाक जलविद्युत् प्रकल्पाचीयोजना आखलेली असून त्यामुळे वीजनिर्मितीत बरीच वाढ होईल. १९५१ पूर्वी केवळ ९ गावांना विद्युत् पुरवठा होत होता. १९७८ – ७९ पर्यंत ही संख्या २७४ वर गेली आहे.

औद्योगिक दृष्ट्या हे राज्य बरेच मागासलेले आहे. मोठ्या व मध्यम स्वरूपाच्या कारखान्यांची संख्या २८८ असून त्यांपैकी २५० चालू स्थितीत, तर ३८ आजारी होते. (१९७९). लघुउद्योगांची संख्या १,११६ आहे (१९८०). एक खांडसारीचा कारखाना असून त्यातून १९७६ पासून उत्पादनास सुरुवात झाली आहे. लोइटांग खुनाऊ येथे एक सूत गिरणी आहे. चुनखडीच्या साठ्यांचा विचार करून प्रत्येक जिल्ह्यात एकेक छोटा सिमेंट कारखाना उभारण्याची योजना आहे. याशिवाय कागद, स्टार्च, ग्‍लुकोज, मक्याचे पोहे (कॉर्नफ्लेक्‍स) इत्यादीच्या उत्पादनाचे कारखाने सुरू करण्याच्या योजना आहेत.

हातमाग उद्योग हा राज्यातील महत्त्वाचा उद्योग असून तो प्रामुख्याने घरगुती स्वरूपाचा आहे. हातमागावर विविध प्रकारच्या व रंगांच्या कापडाचे उत्पादन काढले जात असून त्याला स्थानिक तसेच परदेशांतूनही मागणी येते. एकूण २,००,००० नोंदणीकृत माग व ५०० विणकर सहकारी सोसायट्या आहेत. येथील हातमाग उद्योगाच्या विकासासाठी ‘मणिपूर हँडलूम अँण्ड हँडिक्राफ्ट्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ ची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडूनही या उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. लघुउद्योगात सुतारकाम, लोहारकाम, चर्मोद्योग, भरतकाम, विटा बनविणे, शिवणकाम, सोनार काम, वाहनांची दुरूस्ती व संधारण, कथिलकाम या उद्योगांचा समावेश होतो. लघुउद्योगांना कच्चा माल पुरविणे व पक्क्या मालाची विक्रीव्यवस्था करणे, ही कामे मणिपूर लघुउद्योग महामंडळातर्फे पार पाडली जातात. तसेच विविध उद्योगांची प्रशिक्षण व उत्पादन केंद्रे स्थापन केलेली आहेत. अशा ३५ केंद्रांचे काम चालू आहे. त्याशिवाय लघुउद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने औद्योगिक सल्लागार मंडळाची स्थापना केलेली असून आसाम वित्त महामंडळाचा मणिपूरमध्ये विस्तार करण्यात आला आहे.

ताक्येलपत व इंफाळ येथे औद्योगिक वसाहती आहेत. राज्यातील जनजातींच्या औद्योगिक विकासासाठी योजना आखण्यात येत आहेत. त्यांनुसार केइथेलमनबी, तामाँगलाँग, तेंगनौपल (चक्‍पी) व उखरुल येथे सहकारी लाकूड कटाई व सुतारकाम संस्था आणि चूरचंदपूर येथे चामडी प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना केली आहे. जनजातींकडून तयार होणाऱ्या हातमाग कापडाचे तसेच हस्तव्यवसाय – उत्पादनांचे विक्रीकेंद्र इंफाळ येथे उघडण्यात आले आहे. राज्यात एकूण १२१ हस्तव्यवसायसहकारी सोसायट्या आहेत. काही प्रमाणात मातीची, धातूची व तांब्याची भांडी तयार केली जातात. परंतु मागणीच्या मानाने त्यांचे उत्पादन कमी असल्याने इतर राज्यांतून त्यांची आयात केली जाते. सुतारकाम, लाकडावरील कोरीवकाम यांत येथील लोक प्रवीण आहेत.

इंफाळ हे राज्यातील बाजारपेठेचे मुख्य केंद्र असून रेशमी व सुती कापड, मासे, पालेभाज्या, तांदूळ, चटया यांचा येथे मोठा व्यापार चालतो. व्यापारात प्रामुख्याने मणिपुरी स्त्रिया अधिक असून त्याच खरेदीविक्रीचे व्यवहार करतात. राज्याबाहेरील व्यापार नागालँड, आसाम व काही प्रमाणात ब्रम्‍हदेशाशी चालतो. तांदूळ, वनोत्पादने, गाई, बैल, म्हशी यांची निर्यात व तेल, सुपारी, सुकविलेले मासे, मीठ, कापडी वस्तू, सूत यांची आयात केली जाते.

राज्य आर्थिक दृष्ट्या मागासलेले असल्यामुळे राज्याचे उत्पन्नाचे क्षेत्रही मर्यादित आहे. सहाव्या पंचवार्षिक योजनेत राज्याचा खर्चाचा अंदाज २४० कोटी रुपये, तर १९८१ – ८२ या वार्षिक योजनेच्या खर्चाचा अंदाज ४३ कोटी रुपये होता.


डोंगराळ भूप्रदेशामुळे व राज्याचे स्थान काहीसे एकाकी असल्यामुळे वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांचा अभावच आहे. बरेचसे रस्ते कच्चे आहेत. येथे दोन प्रमुख रस्ते असून त्यांपैकी एक पश्चिमेस आसामच्या काचार जिल्ह्यात, तर दुसरा काझीरंगा (आसाम) ते दक्षिणेस ब्रम्‍हदेशाच्या सरहद्दीपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग इंफाळ वरून जातो. मणिपूर राज्यमार्ग परिवहन महामंडळाशिवाय पाच खाजगी कंपन्यांकडून मोटार वाहतूक केली जाते. राज्यात लोहमार्ग नाहीत. नागालँडमधील दिमापूर व आसाममधील सिल्चर ही सर्वात जवळची लोहमार्ग स्थानके आहेत. ही दोन्ही ठिकाणे रस्त्याने मणिपूरशी जोडलेली आहेत. इंफाळ हे कलकत्ता, सिल्चर व गौहाती यांच्याशी हवाईमार्गाने जोडलेले आहे.

लोक व समाजजीवन : राज्यात ४० जमाती व उपजमाती आहेत. मणिपुरी लोक कमाल, लुआंग, मोइरंग व मेईथेई या चार जुन्या जमातींचे वंशज होत. आता ते मेईथेई या नावाने ओळखले जात असून इतरही  काही जमाती त्यांतच मिसळल्या आहेत. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी दोनतृतीयांश लोक हिंदू धर्मीय असून ते प्रामुख्याने मणिपूर खोऱ्यात रहातात. ते विष्णुभक्त आहेत. ते स्वतःला हिंदू क्षत्रिय समजतात. मेईथेईशिवाय फुंगनाई जमातीचे लोक येथे असून त्यांच्या पाच उपजमाती आहेत. नागा व कुकी याही जमाती प्रमुख असून नागा जमाती सामान्यपणे उत्तर भागात, तर कुकी दक्षिण भागात आढळतात. नागांमध्ये तंगखुल, काबुई, कोईराव, मारिंग या उपजमातींचा समावेश होतो. येथील लोइस ही कनिष्ठ दर्जाची जमात समजली जाते. राज्यातील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ६४  असून स्त्री – पुरुष प्रमाण ९७२:१००० असे आहे. (१९८१). समाजात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान आहे. मणिपूर खोऱ्यात व्यापार, तसेच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार त्याच पाहतात. कुटुंबामध्येही स्त्री महत्त्वाची भूमिका बजावते. घरामध्येही त्या सूतकताई, विणकाम इ. उद्योग करतात. इतक्या उद्योगी स्त्रिया भारतात अन्यत्र कचितच आढळतील. पुरुष कुकी लोकांमध्ये मुलाला मामाच्या मुलीशी विवाह करावा लागतो. तसेच वराला वधूच्या घरी जाऊन रहावे लागते व त्या कुटुंबातील कामाचा भार उचलावा लागतो. अशीच प्रथा इतरही काही उपजमातीमध्ये आढळते.

लामनई (ग्रामदेवता), उमंगलाई (वनदेवता), इमुंगलाई (गृहदेवता) व पान्‌थोयबी, नोंगशाबू, युमथाईलाई इ. येथील प्रमुख देवता आहेत.‘पाखेम्बा’ या देवाला विश्वपिता मानले जाते. येथील राजघराणे म्हणजे गुरू पाखेम्बाचीच संतती होय, असे समजले जाते. वैष्णव पंथाशी निगडित असे सर्व धार्मिक सण व उत्सव साजरे केले जातात. होळी, दुर्गापूजा, दिवाळी हे येथील प्रमुख सण होत. जून – जुलैमध्ये रथजत्रा, तर मार्चमध्ये दोलजत्रा असते. फाल्गुन महिन्यात येणारी होळी विशेष उत्साहाने साजरी केली जाते. होळीला येथे ‘माउ शांग’ असे म्हणतात. होळीच्या वेळी ‘थावल चोम्बा’ हे नृत्य केले जाते. हा नृत्य सोहळा १५ दिवसांपर्यंत चालतो. ह्या काळात बऱ्याच युवक – युवती पळून जाऊन गांर्धव विवाह करतात. येथील प्रथेनुसार मुलाने मुलीला पळवून नेऊन जर तिला तीन दिवस तो लपवून ठेवू शकला, तर जमातीला त्यांचा विवाहास मान्यता द्यावी लागते.

राज्यात १९८० – ८१ मध्ये पुढीलप्राणे आरोग्य सेवा उपलब्ध होत्या : ४५ रुग्णालये (प्राथमिक आरोग्य केंद्रांसह) व दवाखाने (प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासह) होते. पैकी दोन क्षयरोग रुग्णालये व सहा कुष्ठरोग रुग्णालये होती. आर्. एम्. सी. रुग्णालय वगळता राज्यातील इतर आरोग्य केंद्रात ९४५ खाटा व २१९ डॉक्टर होते. दर १,४९४ लोकसंख्येला एक खाट व ६,४४५ लोकांमागे एक डॉक्टर असे हे प्रमाण पडते.

राज्यात मणिपुरी ही मुख्य भाषा असून ती ६३.२४% लोक बोलतात. भारतातील ही एक प्राचीन भाषा समजली जाते. हिंदी भाषा हळूहळू सार्वत्रिक होत आहे. आदिवासी जमातींच्या स्वतंत्र बोली भाषा आहेत. मणिपुरी भाषा ही तिबेटो – ब्रम्‍ही भाषा समूहापैकी कुकि – चीन या समूहातील असून तिचे ब्रम्‍ही भाषेशी साम्य आहे. एकेकाळी यांची स्वतंत्र लिपीही होती परंतु ती आता प्रचलित नाही. ही लिपी जाणणारेही आता फारच कमी लोक आहेत. मेईथेई लोकांनी वैष्णव पंथाचा स्वीकार केला, तेव्हापासून मणिपुरी बरोबरच बंगाली व आसामी भाषांच्या अभ्यासासही सुरुवात झाली आहे [⟶ मणिपुरी (मेईथेई) भाषा].

प्राचीन काळापासून मणिपुरी साहित्य समृद्ध असावे. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे मणिपुरी साहित्याचे तीन भाग पडतात. इतिहास, ज्योतिष, चिकित्साशास्त्र, नीतिशास्त्र, वंशावळी यांसंबंधी अनेक प्राचीन हस्तलिखिते मिळाली असून पूया, निहौरोन व चेइथा रोल यांसारखे प्राचीन ग्रंथ व अन्य काही ऐतिहासिक कागदपत्रेही उपलब्ध आहेत. पानथोयबी रवोंगुल व रवोंग जोंग नुचे नोन गारोन ही ऐतिहासिक महत्त्वाची पुस्तके असून त्यांत प्रेमकहाण्याही वर्णिलेल्या आहेत. तारबेल ज्ञाम्बा (त्रिपुराचा विजय), सुमजोक ज्ञाम्बा (सुमजोकचा विजय), चेइथारन कुम्बाबा (राजघराण्याचा इतिहास) व नुकिट काप्पा (सूर्याचा शिकारी) इ. काही इतर प्राचीन हस्तलिखिते उल्लेखनीय आहेत.


वैष्णव पंथाच्या स्वीकारानंतर मणिपुरी लोकांनी बंगाली वैष्णव साहित्याशी घनिष्ठ संबंध ठेवण्यास सुरूवात केली. येथील वेष्णव पंथाच्या उदयाबरोबरच (१८ व्या शतकाचा पूर्वार्ध) मध्ययुगीन मणिपुरी साहित्याचाही उदय झाला. प्राचीन प्रेमकाव्‍यांची जागा राधाकृष्णाच्या प्रेमवर्णनांनी घेतली. यातूनच मणिपुरी साहित्याचा विकास होत गेला. तसेच बंगाली भाषाही येथे लोकप्रिय होत गेली. याच काळात बऱ्याचशा संस्कृत व बंगाली ग्रंथाचे मणिपुरी भाषेत अनुवाद करण्यात आले. काही तज्ञांच्या मते मणिपूरमध्ये संस्कृत भाषेचा प्रवेश इ. स. पू. ९६१ मध्येच झाला. रामायणमहाभारत येथे लोकप्रिय बनली. त्यांची मणिपुरी भाषेत भाषांतरेही करण्यात आली. तेव्हापासूनच मणिपुरी लोक हरी, शिव, दुर्गा, इंद्र इ. हिंदू देवतांची पूजा करू लागले. बंगाली भाषेला येथे महत्त्वाचे स्थान असून बंगाली साहित्याचा अभ्यासही केला जातो. १९२४ पर्यंत तर शाळेमध्ये अभ्यासाचे माध्यमही बंगाली भाषा हे होते.

विसाव्या शतकाच्या आरंभापासून आधुनिक मणिपुरी साहित्याची सुरूवात झाली. त्यात कमल हे अग्रगण्य आहेत. त्यांची माधवी कादंबरी उत्कृष्ट समजली जाते. त्यांच्या इतरही काही कादंबऱ्या, गीते व कविता प्रसिद्ध असून कवी म्हणूनही त्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे. चओबा व एच्. अनगनघलसिंह हे कमल यांचे समकालीन उल्लेखनीय लेखक. अनगनघलसिंह यांनी आठ खंडांमध्ये खंबा – थोइबी हे महाकाव्य लिहिले असून त्यात खंबा व थोइबी यांच्यातील अमर प्रेमकहाणी वर्णिलेली आहे. डोरेन्द्रजीत सिंह यांनी केशवध हे महाकाव्य लिहिले आहे. अंगाभ्रहाल सिंह व सुरचन्द शर्मा हे इतर प्रसिद्ध कवी होत. शीतलजीत सिंह हे मणिपूरमधील विद्यामान काळातील एक अग्रगण्य कादंबरीकार होत.

नाट्यकलेतही मणिपुरी लोक प्रवीण आहेत. प्रथम येथे बंगाली नाटके केली जात. १९१४ मध्ये अरजुंगी मैथिबा हे पहिले मणिपुरी नाटक सादर करण्यात आले. हे नाटक म्हणजे पार्थ्व पराजय या बंगाली नाटकाचा अनुवाद होता. १९२५ मध्ये एल्.एम्. श्‍वोन्गाहल सिंह यांनी नरसिंह हे मूळ मणिपुरी नाटक लिहिले. तोपर्यंत भाषांतरित नाटकेच केली जात. नाटके लिहिण्यात व सादर करण्यात रामचंद्र सिंह, ए. श्यामसुंदर सिंह, एस्. बोरमानी सिंह हे प्रसिद्ध आहेत. अनुवाद साहित्यात एम्. कोईरेंग सिंह यांचे कपालकुंडला, वासुदेव शर्मा यांचे अभिज्ञान शाकुंतल व एच्. नवद्वीप चंद्रसिंह यांचे मेघनाद – वध हे काव्य ही उल्लेखनीय आहेत. धार्मिक साहित्यक्षेत्रात पंडित अरोम वाथू शर्मा यांचे कार्य मोठे आहे. यांनी अनेक धार्मिक पुस्तकांचे सचित्र लेखन व अनुवाद केले. मोगांगा गुरू पुन्सिबा, लुवांग गुरू पुन्सिबा व खुमान गुरू पुन्सिबा ही थोर संतमडळी येथे होऊन गेली. मणिपूरच्या सांस्कृतिक परंपरेत ⇨ अगरूच्या सालीवर बराचसा इतिहास लिहून त्यांनी मोलाची भर घातली. ज्ञासी, प्रजातंत्र, अनौबा समाज ही मणिपूरमधील प्रमुख वृतपत्रे आहेत.

राज्यातील साक्षरतेचे प्रमाण ४१.९९% आहे. येथे ३,५३३ प्राथमिक शाळा, ३९१ माध्यामिक शाळा, २६४ उच्च व उच्चमाध्यमिक शाळा, २७ महाविद्यालये, ३६ व्यापार व व्यावसायिक प्रशिक्षण महविद्यालये आणि एकूण विद्यार्थी संख्या ३,३३,८६८ होती (१९७९ – ८०).

मणिपूरने जगाला दिलेल्या ⇨ मणिपुरी नृत्य व मणिपुरी पोलो ह्या दोन प्रमुख देणग्या असून हॉकी व कुस्ती येथील आवडीचे खेळ आहेत.

प्रेक्षणीय स्थळे : मणिपूर हे एक निसर्गसुंदर असून अनेकदा त्याची तुलना स्वित्झर्लंडशी केली जाते. मणिपूर खोऱ्याच्या मध्यभागात वसलेले इंफाळ हे राजधानीचे शहर सांस्कृतिक, व्यापारी व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. येथील बाजारपेठ, पोलो मैदान, वस्तुसंग्रहालय, राजवाडा, सुवर्ण मंदिर, नृत्य अकादमी इ. उल्लेखनीय आहेत. इंफाळच्या पश्चिमेस ६ किमी. वरील प्रसिद्ध प्राणिसंग्रहोद्यान, उत्तरेस ७ किमी. वरील खोंघांपत ऑर्किड यार्ड, ८ किमी. वरील लांगथाबल, १६ किमी. वरील वैथाऊ व २७ किमी. वरील बिशनपूर ही निसर्गरम्य ठिकाणे, २९ किमी. वरील कैना (हिंदूचे पवित्र स्थान), ३७ किमी. वरील खोंगजोम (ऐतिहासिक ठिकाण) इ. स्थळे प्रेक्षणीय आहेत. इंफाळपासून ४५ किमी. वरील मोइरंग हे प्राचीन सांस्कृतिक केंद्र असून खंबा – थोइबी नृत्याचे हे उगमस्थान मानले जाते. दुसऱ्या महायुद्धकाळात काही काळ आझाद हिंद फौजेचे ते मुख्य केंद्र होते. मोरेह हे ब्रह्मदेश सहहद्दीजवळील एक मोक्याचे ठिकाण आहे. याशिवाय चूरचंदपूर, माओ, टेंगनौपल, उखरूल, कांगचूप, पल्लेल, कौब्रू ही पर्यटनकेंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच लोकटाक सरोवर, याच सरोवरतील थांगा व करांग बेटांवरील सुंदर उद्याने आणि लोकटाक जलविद्युत् प्रकल्प ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

चौधरी, वसंत


मणिपूर राज्य

गांधी स्मृतिभवन, इंफाळा

इंफाळ येथील गोविंदजी (विष्णू) मंदिर

लोकटाक सरोवर

मणिपूर टेकडयातील आदिवासींचे शिकारनृत्य

मणिपुरी हस्तकला