सासवड : महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्घ स्थळ. त्याची लोकसंख्या २६,६८९ (२००१) होती. ते पुण जिल्ह्यात पुण्याच्या आग्नेयीस सु. २७ किमी. वर कऱ्हा नदीकाठी बाबदेव व दिवे घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-सातारा रस्त्यावर वसले आहे. या गावाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि हे बाळाजी विश्वनाथ (पहिला पेशवा) याच्या काळापासून भट घराण्याचे (पेशवे घराण्याचे) दक्षिणेकडील निवासस्थान होते. उत्तर पेशवाईतील पुरंदरे सरदारांचे हे मूळ गाव होय. या गावात पेशव्यांचा जुना वाडा असून सांप्रत तेथे तहसील कार्यालय आहे, तर पुरंदरे सरदारांचा वाडा संगमेश्वर मंदिराजवळ आहे. तो तटबंदीयुक्त आहे. कऱ्हा आणि एक उपनदी यांच्या संगमावर संगमेश्वराचे भव्य मराठाकालीन वास्तुशैलीचे मंदिर आहे.त्यांत भित्तिचित्रे, मूर्तिकाम व शिखरात चुनेगच्चीतील प्रतिमा नाहित.

सासवडमध्ये इ. स. १८७९ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. नगरपालिका पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अन्य सुविधा पुरविते. पाणीपुरवठा मुख्यत्वे कऱ्हा आणि कम्बळी या नद्यांतील पाण्याद्वारे होतो मात्र उन्हाळ्यात या नद्या आटत असल्यामुळे नगरपालिकेने जॅकवेलची व्यवस्था कार्यवाहीत आणली आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे (पुणे) गावात एक हायस्कूल व वाघिरे महाविद्यालय चालविण्यात येते. येथे बाजारपेठ आहे.

संगमेश्वर मंदिर: सासवड.सासवडच्या नैर्ऋत्येस सु. १० किमी. वर पुरंदर हा इतिहासप्रसिद्घ डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यास शिवकालात व पुढे पेशवाईत लष्करीदृष्ट्या फार महत्त्व प्राप्त झाले होते कारण तो मजबूत असून अवघड चढण असलेला आहे. या किल्ल्यावर १२ जून १६६५ रोजी छत्रपती शिवाजी व मोगल सरदार मिर्झाराजा जयसिंग यांत तह होऊन शिवाजींनी २३ किल्ले मोगलांना दिले. जेव्हा निजामाने इ. स. १७६३ मध्ये पुणे लुटले, तेव्हा गोपिकाबाईंसह पेशवे कुटुंबियांनी याच किल्ल्याचा आश्रय घेतला. निजामाने पुण्याबरोबर सासवडही लुटून पेशव्यांचे मौल्यवान दागिने लुटले. एवढेच नव्हे तर पेशव्यांनी सासवडच्या वाड्यात जतन केलेली महत्त्वाची कागदपत्रे जाळली. उत्तर पेशवाईत सवाई माधवरावांचे जन्मल्यानंतरचे काही दिवस येथेच व्यतीत झाले. या किल्ल्यामुळेच सासवडचे महत्त्व वाढले.

देशपांडे, सु. र.