वुलर सरोवरवुलर : भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. हे जम्मू व काश्मीर राज्याच्या बारमूल जिल्ह्यात, श्रीनगर शहराच्या वायव्येस ३४ किमी.वर असून सस.पासून १,५७९ मी. उंचीवर आहे. ३४0 १६’ ते ३४0 २६’ उ.व  ७४0 ३३’ ते ७४0 ४२’ पू. यांदरम्यान विस्तारलेल्या या सरोवराची लांबी १६ किमी. व रुंदी १० किमी. असून त्याचा विस्तार ऋतुनुसार ३० ते २६० चौ. किमी. असतो. सर्वसाधारण परिस्थितीत त्याचा विस्तार सु. ३२ चौ. किमी., सरासरी खोली ३.६ मी. व परिघ सु. ४८ किमी. असतो. पूरपरिस्थितीत हा विस्तार २६० चौ. किमी. पर्यंत वाढतो व त्यामुळे आजूबाजूचा सखल भाग जलमग्न होतो. झेलम, हरबुजी, आराह, पोहरू, बंदीपूर (प्राचीन मदुमती), बोहनर व एरिन हे प्रवाह वुलरला येऊन मिळतात. झेलम नदी दलदलीच्या प्रदेशातून वाहत येऊन आग्नेयीकडून वुलरला मिळते तर सरोवराच्या नैर्ऋत्य बाजूस असलेल्या सोपूर गावाजवळ ती सरोवरातून बाहेर पडते. वुलर सरोवरामुळे झेलम नदीतील पाण्याच्या पातळीचे नियमन होते.

महापद्मसरस हे वुलर सरोवराचे प्राचीन नाव. इसवी सनापूर्वी पंडू (पांडव) घराण्यातील सुंदरसेन या राजाची राजधानी असलेले संदिमननगर भूकंपामुळे गाडले गेले व त्याजागी पाणी साठून वुलर सरोवराची निर्मिती झाली, असे मानले जाते. उल्लोल (जोराने हलणारा किंवा उंच उसळणाऱ्या लाटांचा जलाशय) ह्या संस्कृत शब्दाचा वुलर हा अपभ्रंश असावा. वुलर सरोवर म्हणजे सतत हेलकावे खाणाऱ्या निळ्या पाण्याचा जणू समुद्रच आहे. वादळी हवामानाच्या काळात पर्वतीय भागांकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे सरोवरात उंच लाटा उसळतात. सपाट बुडाच्या होड्यांना त्या फार धोकादायक ठरतात. अशा काळात प्रवास करताना काही होड्या बुडत असत. होड्यांचे वादळापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने, तसेच आवश्यकता भासल्यास होड्यांना वाटेत थांबता यावे, म्हणून काश्मीरचा राजा झैन-उल्‌-आबीदीन ऊर्फ बादशाह (पंधरावे शतक) याने सरोवराच्या ईशान्य भागात ९१ मी. लांबीचे व ७७ मी. रूंदीचे एक बेट तयार करून घेतले. त्याला झैना लँक किंवा झैना डेंब हे नाव देण्यात आले. या बेटावर पंधराव्या शतकातील अवशेष आढळतात. सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण काठांलगत उंच पर्वत आहेत. पश्चिम काठावर असलेल्या वतलब टेकडीवर बाबा शुक्रुद्दीनची कबर आहे. सरोवरालगत एक विश्रामधामही आहे.

नौकानयनाच्या दृष्टीने सरोवर महत्त्वाचे आहे. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यांतील रहिवाशांना या सरोवरामुळे व्यवसाय उपलब्ध झाले आहेत. सरोवरात मासेमारीही चालते. श्रीनगर व इतर नागरी केंद्रांना याच सरोवरातून माशांचा पुरवठा होतो. सरोवरातील पाण्याची पातळी थोडीजरी वाढाली, तरी लगतच्या काही गावांतील रहिवाशांच्या जमिनी पाण्याखाली जातात. तेव्हा त्यांचा सरोवरातील मासेमारी व शिंगाडा फळे गोळा करणे हाच मुख्य व्यवसाय असतो.                

चौधरी, वसंत