विदर्भ : महाराष्ट्र राज्यातील एक भौगोलिक प्रदेश. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश सांप्रतच्या विदर्भात केला जातो. या भूप्रदेशाचा विस्तार उत्तर अक्षांश १९° ५’ ते २१° ४७’ आणि पूर्व रेखांश ७५° ५९’ ते ७९° ११’ या दरम्यान झालेला असून यातील बहुतेक भाग तापी, पूर्णा तसेच वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात मोडतो. विदर्भाच्या उत्तरेस आणि पूर्वेस मध्य प्रदेश राज्य, पश्चिमेस जळगाव, औरंगाबाद व जालना तसेच दक्षिणेस परभणी व नांदेड हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि आंध्रप्रदेश राज्य आहे. या प्रदेशाचे क्षेत्रफळ ४५,८६८ चौ. किमी आणि लोकसंख्या १,७३,९८,९०० (१९९१) होती. प्राचीन ग्रंथात-विशेषतः ऋग्वेद, उपनिषदेस, महाभारत, रामायण,पुराणे यांत-तसेच नंतरच्या काही पत्रांत, यांशिवाय तवारीख, प्रवाशांचे वृत्तांत आणि कोरीव लेखांतून विदर्भाचा उल्लेख वऱ्हाड, बेरार, वरदातट, विदर्भ इ. नावांनी करण्यात आलेला दिसतो. पयोष्णी (पूर्णा), वरदा(वर्धा), वेणा(वैनगंगा) इ. नद्यांचे व त्यांच्या काठावरील तीर्थक्षेत्रांचे उल्लेख उपयुक्त साहित्यात येतात. विदर्भ नावाच्या राजाने या प्रदेशात आर्यांची वसाहत केली, त्यावरूनच या प्रदेशास विदर्भ हे नाव दिले असावे, अशी आख्यायिका आहे. यदुवंशाच्या भोजनामक शाखेचा प्रमुख ऋषभवेद याचा पुत्र विदर्भ असल्याचे भागवतपुराणात म्हटले आहे. त्याला हा प्रदेश मिळाल्याने या प्रदेशाने विदर्भ हे नाव मिळाले असावे, असे सांगितले जाते.

भूवर्णन : उत्तरेस मेळघाट (गाविलगड पर्वतश्रेणी) आणि दक्षिणेला बालाघाट (अजिंठा पर्वतश्रेणी) यांदरम्यानच्या सुपीक पठारी खोर्यालचा समावेश विदर्भात होतो. पयानघाट म्हणूनही हा प्रदेश ओळखला जातो. या भागातील सर्वांत उंच शिखर बैराट (उंची १,१७७ मी.) हे अमरवती जिल्ह्यात चिखलदर्यारजवळ आहे. सस. पासून या प्रदेशाची सरासरी उंची ५५३ मी. आहे. या भूप्रदेशाचा समावेश ⇨दक्षिण ट्रॅपमध्ये होतो. शिलारसापासून तयार झालेल्या अग्निजन्य बेसाल्ट खडकांनी तो बनलेला आहे. येथील भूस्तर प्रामुख्याने ग्रॅनाईट व चुनखडीयुक्त आहे. बरड, रेतीयुक्त, उथळ व चिकण दुमट जमिनी विदर्भातील डोंगराळ प्रदेशात आढळतात. मिश्र खडकापासून त्या तयार झालेल्या असून बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या काळ्या जमिनीप्रमाणेच त्यांचे गुणधर्म  आढळून येतात.

या प्रदेशात दगडी कोळसा मँगेनीज, लोह, क्रोमाइट, कायनाइट, कुरूविंद, सिलिमनाइट ही खनिजे आढळतात. मँगेनीज आणि दगडी कोळसा या दोन्ही बाबतीत हे प्रदेश समृद्ध असून त्यापासून फार मोठे उत्पन्न मिळते.

विदर्भातील वर्धा व वैनगंगा या नद्या दक्षिण वाहिनी असून त्यांचा उगम महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश राज्यात आहे. वर्धा-वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास ‘प्राणहिता’ म्हणतात. तापी, पूर्णा, पैनगंगा या अन्य प्रमुख नद्या असून तापी पूर्वेकडून पश्चिमेकडे, तर पैनगंगा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. पूर्णा ही तापीचीच उपनदी आहे. पैनगंगा ही वर्धा नदीची प्रमुख उपनदी असून पूस, अरुणावती, अडाण, वाघाडी, कुणी इ. अन्य उपनद्या होत. लोणार (बुलढाणा जिल्हा) हे विदर्भातील एकमेव नैसर्गिक सरोवर असून त्यातील पाणी खारे आहे. भंडारा जिल्ह्यात सु. १५,००० तलाव आहेत म्हणून यास ‘महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा’ म्हणतात.

विदर्भाचे हवामान साधारणतः  विषम असून सखल प्रदेशात उन्हाळी परिस्थिती तीव्र जाणवते. मे महिन्यात या विस्तृत क्षेत्रात अनेक ठिकाणी ४२° ते ४३° से. एवढे उच्चतम तापमान असते. कधीकधी ते ४५° ते ४७° से. पर्यंतही जाते. याउलट हिवाळ्यात १२° ते १४° से. पर्यंत तापमान खाली येते. कधीकधी ते ५° ते ७° पर्यंतही खाली येते. विदर्भचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०८ सेमी. असून नैऋत्य मॉन्सूनच्या कालावधीत एकंदर वार्षिक पर्जन्याच्या ८७% पाऊस पडतो. अमरावती, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यांत तुलनात्मक दृष्ट्या पावसाचे प्रमाण अधिक आढळते.

मेळघाट पर्वतउतारावर घनदाट जंगले असून त्यांतून उत्तम प्रकारचे सागवान, ऐन, धावडा, हळदू, शिसव इ. इमारती व फर्निचरचे लाकूड मिळते. येथील जंगलात वाघ, चित्ता हरीण, अस्वल, गवा, नीलगाय, काळवीट इ. प्राणी आढळतात. विदर्भात पूर्वी गावराणी किंवा बेरारी या नावांनी घोड्यांची पैदास होत असे. त्यांतील उमरडा व खामगावी या जाती काटक व दमदार म्हणून प्रसिद्ध होत्या. पुढे दळणवळणची आधुनिक साधने उपलब्ध झाल्यानंतर त्यांची पैदास जवळजवळ संपुष्टात आली.आणि संकराचेही प्रयत्न झाले नाहीत.

कापूस, गहू, ज्वारी, तूर, भात ही विदर्भातील प्रमुख पिके आहेत.यांशिवाय संत्री, आंबे व विड्याची पाने यांच्या बागा आणि मळे आहेत. लोकांचा मुख्य धंदा शेती असून त्याखालोखाल कापड विणण्याचा धंदा चालतो. सरकी काढण्याचे, कापूस दाबणी व वटण यांचे कारखाने असून काही ठिकाणी तेल काढण्याच्या गिरण्या आहेत. तेंदू पानांपासून विड्या वळण्याचा धंदा या प्रदेशात मोठ्या प्रमाणात चालतो. विदर्भात वरील धंद्यांव्यतिरिक्त हातमाग, घोंगड्या बनवणे, चामडी कमविणे, लाकूड कापणी वगैरे अन्य धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. या प्रदेशात गोंड, कोरकू, बंजारा इ. आदिवासींची लोकसंख्या डोंगराळ भागात लक्षणीय आहे.


इतिहास : विदर्भाच्या भौगोलिक सीमांमध्ये निरनिराळ्या कालखंडांमध्ये बदल होत गेले आहेत. प्राचीन ग्रथांत उल्लेख केलेल्या विदर्भाची राजधानी कुंडिनपूर होय. प्राचीन काळी विदर्भात उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेस कृष्णा नदीच्या खोर्या पर्यंत आणि पश्चिमेस ऋषिक (खानदेश) देशापासून पूर्वेस कोसल (छत्तीसगढ) देशापर्यंत पसरलेल्या विशाल भूभागाचा समावेश होत असे. नर्मदेच्या उत्तरेकडील भोपाळ व भिलसा राज्यांचा समावेशही विदर्भात होत असे. सम्राट अशोकाच्या धर्म-महामात्र या पदाधिकाऱ्याचा चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथील शिलालेख , या भागावर मौर्यांचे इ. स. पू. तिसऱ्या शतकात अधिपत्य असल्याचे दर्शवितो. शुंग काळात ( इ. स. पू. १८७- ७२) अग्निमित्र शुंग याने विदर्भ पादाक्रांत करून माधवसेन राजाची बहीण मालविका हिच्याशी विवाह केला. या विषयावर पुढे कालिदासाने मालविकाग्निमित्र हे नाटक लिहिले. त्यानंतर सातवाहनांच्या (इ. स. पू. १००-इ. स. २५०) आधिपत्याखाली विदर्भ होता. त्यांची नाणी अकोला जिल्ह्यातील तऱ्हाळा येथे मिळाली. सातवाहनांनंतर वाकाटक वंशाचा या प्रदेशातच उदय झाला. त्या वंशातील राजांनी या प्रदेशावर सु. २५५ वर्षे राज्य केले. त्यांच्या राजधान्या अनुक्रमे नंदिवर्धन (नागपूर) आणि प्रवरपूर वा पवनार (वर्धा जिल्हा) येथे होत्या. या वंशातील दुसरा रूद्रसेन यास चंद्रगुप्ताने आपली मुलगी प्रभावती ही दिली होती. वाकाटकांच्या वेळी विदर्भात संस्कृत वा प्राकृत वाङ्‌मय, कलाकौशल्य, व्यापार यांचा विकास झाला. दुसऱ्या. प्रवरसेनाने प्रवरपूरला रामचंद्राचे भव्य मंदिर बांधले. धाम नदीकाठी केलेल्या उत्खननांत काही शिल्पांचे नमुने आढळले आहेत. वाकाटकांनंतर विदर्भावर बादामीच्या चालुक्यांची सत्ता काही वर्षे होती. त्यांचे मांडलिक घराणे राष्ट्रकूट यांनी इ. स. सातव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत विदर्भावर राज्य केले. राष्ट्रकूटांचे काही ताम्रपट अकोला जिल्ह्यात सापडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडी येथील मंदिराचे बांधकाम त्या काळात झाले. परमार नृपती भोजाचा पुतण्या जग्गदेव हा चालुक्य नृपती सहावा विक्रमादित्य (कार. १०७६ ते ११२६) याच्या आश्रयास गेला असता त्यास त्याने विदर्भाच्या एका भागाचा अधिपती नेमले. त्याचा इ. स. १११२ चा कोरीव लेख यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरगाव येथे मिळाला आहे. त्यानंतर विदर्भावर यादवांची सत्ता आली. त्यांचे अनेक लेख या भागात सापडतात. त्यांनी विदर्भात अनेक मंदिरे बांधली. यादवांनी अनेक विद्वानांना आश्रय दिला. त्यांपैकी प्रसिद्ध व्याकरणकर्ता बोपदेव, मुकुंदराज, हरिनाथ ह्या व्यक्ती प्रसिद्ध आहेत. महानुभाव पंथाचा उदय याच काळात झाला. यादवांचा सेनापती खोलेश्वर हा मूळचा विदर्भातीलच. यादवांचे राज्य उत्तरेकडून आलेल्या खल्जी वंशातील सुलतानांनी जिंकून घेतले (१३१८). तत्पूर्वी गोंडांचे राज्य वर्धा-चंद्रपूर भागात शिरपूर या ठिकाणी उदयास आले होते (१२५०). चंद्रपूरचे गोंड राज्य सर्वच बाबतींत श्रेष्ठ ठरले. याचा मूळ पुरुष भीमबल्लाळसिंह हा होय. या घराण्यात एकूण पंधरा कर्तबगार राजे झाले. खांडक्या बल्लाळ (कार. १४३७-६२) याने चंद्रपूर वसविले. या घराण्यातील नीळकंठशाहच्या वेळी (१७५१) रघूजी भोसले याने ते खालसा केले. त्यानंतर नागपूरकर भोसले आणि मोगलांचा दक्षिणेकडील सुभेदार निजामुल्मुल्क ४०% भाग निजामाने घ्यावा आणि उरलेला ६०% भाग भोसल्यांनी घ्यावा असे ठरले. जानोजी भोसले (कार. १७५५-७२) आणि दुसरा रघूजी (कार. १७७२-१८१६) यांच्या कारकीर्दीत ही व्यवस्था सुरळीत चालली. पुढे पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) नागपूर संस्थानात ईस्ट-इंडिया कंपनीच्या ‘रेसिडेंट’ राहू लागला आणि संस्थानात गादीसाठी अंतर्गत स्पर्धा उद्‌भवली. तेव्हा १८५४ मध्ये इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर करून नागपूर संस्थान खालसा केले. तत्पूर्वी १८५३ पासून ब्रिटिशांनी निजामास काही वार्षिक खंडणी देण्याचे कबूल करून येथील राज्यकारभार आपल्या अखत्यारीत घेतला. ब्रिटिशकाळात वणी किंवा ऊन या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली (१८६४). पुढे १९०५ मध्ये त्याचे यवतमाळ हे नामांतरण झाले १९५६ च्या राज्यपुनर्रचनेनंतर मध्य प्रदेशातील काही भाग मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आला. पुढे १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र आस्तित्वात आल्यानंतर विदर्भातील सर्व जिल्हे महाराष्ट्र राज्यात अंतर्भूत करण्यात आले. विदर्भाच्या विकासासाठी १९७३ मध्ये ‘नागपूर करार’ करण्यात आला मात्र त्याचे पालन झाले नाही. त्यानंतर विदर्भाच्या विकासातील असमतोल जाणून घेण्यासाठी अर्थतज्ञ वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट १९८३ मध्ये एक समिती कार्यरत झाली. तिने एप्रिल १९८४ मध्ये आपला अहवालदिला. याच सुमारास प्रादेशीक विकास मंडळे स्थापन करण्याच्या कल्पनेस चालना मिळाली (१९८४). विदर्भासाठी वैधानिक विकास मंडळ १९९४ मध्ये अस्तित्वात आले आहे. तथापि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची चळवळ अद्याप थंडावलेली नाही.

प्रेक्षणीय स्थळे : विदर्भात चिखलदरा, भामरागड व सोमनूर ही थंड हवेची ठिकाणे असून ताडोबा तलावाजवळ ताडोबा राष्ट्रीय अभंयारण्य व मेळघाट जंगलाचे क्षेत्र संरक्षित केले आहे. या जंगलात ढाकणे-कोळखाज व खेमाडोर येथे विश्रामधामे बांधलेली आहेत. पुसद, रामटेक, लोणार, मेहेकर, वाशी व बार्शी टाकळी येथे यादवकालीन हेमाडपंती मंदिरे असून मार्कंडादेव येथील राष्ट्रकूटकालीन मंदिरे त्यांवरील शिल्पांसाठी ख्यातनाम आहेत. या भागातील गाविलगड, नरनाळा हे किल्ले प्रसिद्ध आहेत.

देशपांडे, सु. र.