बेटवा नदी : (वेत्रवती). भारतातील मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्यांतील निमओसाड प्रदेशातून वाहणारी उत्तरवाहिनी नदी. यमुनेची ही उपनदी असून तिची लांबी ५७६ किमी आहे. विंध्य पर्वतात भोपाळच्या आग्नेयीस सु. ४० किमी. वरील कुमरी गावाजवळ ही उगम पावते. प्रथम ८० किमी. ईशान्य दिशेने वाहत जाऊन भिलसा जिल्ह्यात प्रवेश करते. पुढे ती मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश (झांशी जिल्हा) राज्यांच्या सरहद्दींवरून काही अंतर वाहत जाऊन उत्तर प्रदेशातून पुन्हा मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यात प्रवेश करते. पुढे पुन्हा उ. प्रदेशांतून ईशान्य दिशेस ओर्छा व जलाऊन जिल्ह्यांतून वाहत जाऊन हमीरपूर येथे यमुना नदीला मिळते. पुराणांत तसेच मेघदूतात या नदीचा उल्लेख आढळतो. पांडवांचे विदिशेच्या राजाशी झालेले युद्ध या नदीच्या काठावरच झाले, अशी समजूत आहे. बेस, जमनी, धसान, पावन ह्या बेटवाच्या प्रमुख उपनद्या होत.

बुंदेलखंडातील शेतीला ही नदी विशेष उपयुक्त ठरली आहे. नदीखोऱ्यात गहू, ज्वारी, कापूस, जवस, तंबाखू, ऊस इ. पिके घेतली जातात. झांशीच्या दक्षिणेस ३० किमी. वरील डुकवान येथे १८९३ मध्ये या नदीला बंधारा बांधून तेथून कालवे काढले आहेत. झांशीच्या उत्तरेसही २७ मी. उंचीचा एक बंधारा बांधण्यात आला असून त्यामुळे सु. ८१ हजार हे. जमिनीला पाणी मिळते. त्याचप्रमाणे झांशीच्या दक्षिणेस ५६ किमी. वरील मतातिला येथे १९६६ साली धरण बांधले असून त्यापासून १,६५,७५७ हे. (पैकी ४५,३२६ हे. क्षेत्र मध्य प्रदेशातील) जमिनीला पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची जलविद्युत् निर्मितीक्षमता ३०,००० किवॉ. आहे. झांशी हे या खोऱ्यातील मुख्य शहर आहे.

यार्दी, प. व्यं. चौधरी, वसंत.