बाझ बहादूर : (इ.स. १६वे शतक). माळव्याचा शेवटचा सुलतान. बाझ बहादूर व त्याची राणी रूपमती यांच्या रोमांचकारी प्रणयकथा माळव्यातील लोकसाहित्यात रूढ आहेत. त्याच्या जन्ममृत्यूच्या सनांविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. त्याच्या कारकीर्दीचा कालखंड १५५४-१५६४ असा मानण्यात येतो. हा सुलतान विलासी असून शिकार व संगीत यांचा शौकिन होता. राज्यारोहणानंतर त्याने मांडवगड येथे आपली राजधानी स्थापून तेथे सुंदर व भव्य वास्तू उभारल्या. त्याचे राज्यकारभाराकडे विशेष लक्ष नव्हते. त्यामुळे त्याचे अफगाण अधिकारी नाराज झाले व त्यांनी आधमखानाच्या हाताखाली आलेल्या मोगली सैन्याबरोबर लढण्यास बाझ बहादूरास सहकार्य दिले नाही. अकबराच्या बलाढ्य सैन्याने २९ मार्च १५६१ रोजी त्याचा दारुण पराभव करून मालमत्ता, हत्ती, घोडे, जनानखाना इ. सर्व संपत्ती लुटली. बाझ बहादूर खानदेशात पळून गेला. तेथे त्याचा मोगली सैन्याने पाठलाग केला पण खानदेशचा मुबारकखान, वऱ्हाडचा तुफालखान व बाझ बहादूर या तिघांच्या संयुक्त सैन्याने मोगलांचा पराभव केला. तेव्हा त्याला माळव्याचे राज्य पुन्हा मिळाले. अकबराने उझबेकच्या अब्दुलखान याच्या कणखर नेतृत्वाखाली १५६२ मध्ये मोठे सैन्य पाठविले. या सेन्याने माळवा जिंकून बाझ बहादूरचा पराभव केला (१५६२). बाझ बहादूर चितोडला आश्रयास गेला व पुढे काही वर्षे अज्ञातवासात भटकत राहिला. अखेर नोव्हेंबर १५७॰ मध्ये अकबर नागवर येथे असताना बाझ बहादूर त्यास शरण आला. तेव्हा अकबराने त्यास दोन हजारीचा मनसबदार केले. बाझ बहादूर व रूपमती या प्रणयी दांपत्यासंबंधी अनेक दंतकथा प्रसृत आहेत. रूपमती ही मूळची एका राजपूत ठाकूराची मुलगी. तिचा जन्म सारंगपूर येथे झाला. ती अतिशय सुंदर असून गायनकलेत निपुण होती. बाझ बहादूर एकदा शिकारीच्या निमित्ताने भटकत असताना तिच्या संगीताने व रूपाने अनुरक्त झाला. त्याने तिला पट्टराणी होण्याची विनंती केली. तिने राजपूत असल्यामुळे विवाहास नकार दिला पण बाझ बहादूराने फारच विनवणी केली. तेव्हा तिने नर्मदेचा प्रवाह मांडवगडावर नेल्यास, मी तुझ्याशी लग्न करीन, अशी अट घातली आणि १५५७ मध्ये लग्न केले. अटीप्रमाणे बाझने ३६॰ मीटर उंचीच्या मांडवगडावर नर्मदेचा प्रवाह आणला आणि तिच्या नावे एक सुंदर राजवाडा व शृंगार महाल बांधला. ती कविताही करी. तिने बाझवर प्रेमगीते हिंदीत रचली आहेत. ती माळव्यात लोकगीते होऊन लोकप्रिय झाली आहेत. तिने भूपकल्याण हा राग शोधून काढला, असे म्हणतात. बाझ बहादूराच्या पराभवानंतर शत्रूच्या हाती सापडण्यापूर्वी तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. माळव्यात बाझ बहादूर व रूपमती यांच्यावर अनेक काव्ये रचली गेली चित्रशैलीतूनही रूपमती-बाझ बहादूरचाच आविष्कार आढळतो. बाझ बहादूर व रूपमती यांचे राजवाडे मांडू वास्तुशैलीचे नमुने समजले जातात. ते अद्यापि अवशिष्ट आहेत.

भिडे, ग. ल.