सिन्हा, तपन : (२ ऑक्टोबर १९२४—१५ जानेवारी २००९). भारतीय चित्रपटनिर्माता. जन्म कोलकाता येथे. कलकत्ता विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषय घेऊन ते एम्.एस्सी. झाले. बंगाली चित्रपट अभिनेत्री अरुंधतीदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सिन्हा यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. तरुण वयात चार्ल्स डिकिन्झ याची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी व त्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपट क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीस सहायक ध्वनिमुद्रक म्हणून १९४६ मध्ये सिन्हा ‘न्यू थिएटर्स स्टुडिओ’ कामाला लागले. त्यानंतर दोन वर्षांनी कोलकात्यातीलचतपन सिन्हा ‘मुव्हीटोन स्टुडिओ’ त ते काम करु लागले. १९५० मध्ये त्यांना लंडनमधील ‘पाइनवूड स्टुडिओ ’त काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी दिग्दर्शक हर्लस क्रेटॉन यांच्यासोबत साऊंड इंजिनिअर म्हणून काम केले. कलात्मक चित्रपटांची निर्मिती कशी करावयाची, याचे धडे त्यांना तेथे मिळाले. भारतात परतल्यावर १९५४ मध्ये नारायण गंगोपाध्याय यांच्या सैनिक कादंबरीवर त्यांनी अंकुश या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली पण तो अपयशी ठरला. त्यानंतर त्यांनी उपहार या चित्रपटाची निर्मिती केली (१९५५). रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित काबुलीवाला हा त्यांचा चौथा चित्रपट १९५७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले, शिवाय बर्लिन आंतराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात संगीतासाठीचे रौप्यपदकही मिळाले.

चित्रपटाची कथा दृश्य माध्यमातून सांगण्यात सिन्हा यांचा हातखंडा होता. चित्रपटसृष्टीत त्यांचा सर्वश्रेष्ठ कथनकार (मास्टर स्टोरी टेलर) असा लौकिक होता. एकाच विषयावर दोन चित्रपट त्यांनी कधीही बनविले नाहीत. चित्रपटांसाठी उत्तम साहित्यकृतींची निवड हे त्यांचे वैशिष्ट्य होते. रवींद्रनाथ टागोर, ताराशंकर बंदोपाध्याय, शरत्‌चंद्र चतर्जी, शरदिंदु बंदोपाध्याय, सुबोध घोष आणि रामपद चौधरी यांच्या कथा त्यांनी आपल्या चित्रपटांसाठी निवडल्या. त्यांनी स्वतः काही कथा व चित्रपटगीतेही लिहिली.

सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या जगण्याच्या संघर्षाला तसेच सामाजिक समस्यांना चित्रभाषा देण्याचे काम सिन्हा यांनी केले. अपनजान (१९६८), सगीना महातो (१९७०), एखोनी (१९७१) या सिनेमांतून त्यांनी कामगारसंघटनांची दादागिरी आणि वाढत्या बेरोजगारीमुळे हताश झालेल्या तत्कालीन युवकांचे प्रभावी चित्रीकरण केले. विधवांच्या प्रश्नांवर आधारित निर्जन सैकाने हा त्यांचा चित्रपट विशेष गाजला. लहान मुलांसाठी बनविलेल्या चित्रपटांमधील त्यांचे सफेद हाथी (१९७७) व आज का रॉबिनहूड (१९८७) हे चित्रपट खूप लोकप्रिय झाले. याशिवाय अदालत ओ एकरी मेये (१९८२), डॉटर्स ऑफ द सेन्च्युरी (२००१) हे त्यांचे चित्रपटही उल्लेखनीय ठरले. सिन्हा यांनी दूरदर्शनसाठी १९८४ मध्ये आदमी और औरत आणि दीदी या चित्रपटांची निर्मिती केली.

सिन्हा यांनी एकूण ४१ चित्रपटांची निर्मिती केली. त्यांतील १९ चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. लंडन, व्हेनिस, मॉस्को आणि बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत त्यांचे चित्रपट दाखविण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी सिन्हा यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला, त्या वेळी आजारपणामुळे ते अंथरुणाला खिळलेले असल्याने तत्कालीन केंद्रीय माहितीमंत्री प्रियरंजनदास मुनशी यांनी कोलकात्यातील त्यांच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला (२००७). २१ जुलै २००८ रोजी दादासाहेब फाळके या प्रतिष्ठित पुरस्काराने सिन्हा यांना गौरविण्यात आले.

कोलकाता येथे दीर्घकालीन आजाराने त्यांचे निधन झाले.

पाटील, क्रांती