सासणे, भारत जगन्नाथ : (२७ मार्च १९५१– ). मराठी कथाकार. जालना येथे जन्म. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्‌सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. जॉन आणि अंजिरी पक्षी हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८० मध्ये प्रसिद्घ झाला. त्यानंतरचे कँप व बाबीचे दुःख (१९८२), लाल फुलांचं झाड (१९८४), चिरदाह (१९८६), अस्वस्थ विस्तीर्ण रात्र (१९९०), अनर्थ (१९९८),आयुष्याची छोटी गोष्ट (२०००) हे त्यांचे कथासंग्रह उल्लेखनीय होत. यांतील काही दीर्घकथांचे संग्रह आहेत. त्यांनी मुख्यत्वे दीर्घकथा लिहिल्या व या प्रकाराला कलात्मकता व वाड्‌मयीन पृथगात्मता प्राप्त करून दिली. यांखेरीज त्यांनी लिहिलेल्या दूर तेथे दूर तेव्हा आणि सर्प ह्या दोन लघुकादंबऱ्यांचा संग्रह (२०००) व दोन मित्र (२००४) ही त्यांची कादंबरी प्रसिद्घ आहे, तसेच मरणरंग, नैनं दहति पावकः, आतंक ही त्यांची नाटके १९९९ मध्ये प्रसिद्घ झाली. त्यांनी जंगलातील दूरचा प्रवास (१९९८) ही बालकादंबरी आणि चल रे भोपळ्या आणि हंडाभर मोहरा (२००१) ही बालनाटके लिहिली.

१९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते त्यांच्या कथांमधून व्यक्त होणारे जीवनानुभव हे नावीन्यपूर्ण, असांकेतिक, गूढगहन व चमत्कृतिपूर्ण असतात पण त्यांचे वास्तवाशी घट्ट अनुबंध जुळवलेले असतात. त्यांच्या कथांतून ग्रामीण, आदिवासी, नागर असे समाजजीवनाचे विविध स्तर व त्या सामाजिक परिसरात जगणारी, वैशिष्ट्यपूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसे भेटतात. मानवी जीवनाची अतर्क्यता व असंगतता, मानवी नातेसंबंधांतील ताणतणाव, व्यक्तीच्या मनोविश्वातील गूढ, व्यामिश्र व अनाकलनीय गुंतागुंत, त्यांचे सूक्ष्म, अनेक पदरी चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा स्वाभाविकपणेच दीर्घत्वाकडे झुकतात. कित्येकदा या कथांतून गंभीर, शोकाकुल, व्यामिश्र भावजीवनाचा विलक्षण अस्वस्थ करणारा प्रत्यय येतो. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडून दाखवतात. काही कथांतून मुस्लिम संस्कृतीच्या छायेत जगणाऱ्या मराठवाड्यातील शहरांचे व व्यक्तींचे सखोल, तपशीलवार चित्रण आढळते. त्यांच्या कथनशैलीत कथाशयाला अनुरूप अशा अन्वर्थक प्रतिमा, प्रतीके, तरल काव्यात्मता, गूढ चमत्कृती (फँटसी) अशा अनेकविध घटकांचा सुसंवादी मेळ साधलेला दिसतो. माणसाला केंद्रबिंदू मानणाऱ्या व मनुष्यजीवनाबद्दल अपार करूणा व्यक्त करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत.

इनामदार, श्री. दे.