जालियनवाला बाग : पंजाबमधील अमृतसर शहरातील ब्रिटिश लष्कराने केलेल्या हत्याकांडाचे स्थळ. या मैदानाच्या चोहो बाजूस उंच इमारती असून आत जाण्यास एक चिंचोळा मार्ग आहे. येथे १३ एप्रिल १९१९ रोजी रौलट कायद्याविरुद्धच्या म. गांधींच्या सत्याग्रहास प्रतिसाद देण्याकरिता सु. २०,००० लोक जमले होते. सभेत लाला हंसराजसारखे काही नेते भाषण करीत होते. त्या वेळी ब्रिगेडियर-जनरल एडवर्ड हॅरी डायर याने निवडक ९० सैनिकांच्या मदतीने एकदम गोळीबार केला. हा गोळाबार १० मिनिटे चालू होता आणि एकंदर १,६५० फैरी झाडण्यात आल्या. त्यात असंख्य लोक मृत्युमुखी पडले. या हत्याकांडाची चौकशी करण्याकरिता ब्रिटीश सरकारने हंटरच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, तसेच काँग्रेसनेही पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली दोन्ही समित्यांनी दिलेल्या मृत्यूच्या आकडेवारीत तफावत होती. काँग्रेसच्या मते १,००० लोक मेले, तर सरकारच्या अधिकृत बातमीनुसार ३७९ लोक मेले व १, २०० जखमी झाले. डायरच्या या निर्घृण कृत्याचे समर्थन ले. ग. मायकेल ओड्‌वायर याने केले. या हत्याकांडाची ब्रिटीश सरकारने फारशी दखल घेतली नाही, परंतु म. गांधींच्या सत्याग्रहाला व एकूण स्वातंत्र्य चळवळीला यांमुळे अधिक धार आली. जालियनवाला बागेतील निरपराध लोकांच्या हत्याकांडाने अनेक क्रांतिवीरांना स्फूर्ती मिळाली. उधमसिंगासारखे क्रांतिकारक यामुळे अधिक चिडले. उधमसिंगाने भारताच्या या मानहानीचा सूड घेण्याचा निश्चय केला. त्याकरिता पैसे जमवून तो इंग्लंडला शिक्षणाच्या निमित्ताने गेला. त्याने एक पिस्तूल मिळवले आणि संधी साधून १३ मार्च १९४० रोजी सर मायकेल ओड्‌वायर याला ठार करून आपला बेत तडीस नेला. त्याबद्दल त्याला जून १९४० मध्ये फाशी देण्यात आली. १९६९ मध्ये जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा पन्नासावा स्मृतिदिन साजरा झाला.

संदर्भ : माहिती व नभोवाणी मंत्रालय, भारत सरकार, जालियनवाला बाग, नवी दिल्ली, १९६९.

देवगिरीकर, त्र्यं. र.