कॉर्नवॉलिस, लॉर्ड चार्ल्स: (३१ डिसेंबर १७३८—५ ऑक्टोबर १८०५). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १७८६ ते १७९३ व १८०५ ह्या काळातील गव्हर्नर जनरल. याने यूरोपात उत्तम सेनापती व मुत्सद्‌दी म्हणून लौकिक मिळविला होता. त्याचा जन्म लंडन येथे झाला. ईटन व क्लेअर महाविद्यालयांत (केंब्रिज विद्यापीठ) शिक्षण घेऊन १७५७ मध्ये तो सैन्यात दाखल झाला. जर्मनीत लेफ्टनंट कर्नल (१७५८—६२) व अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धात (१७७६) मेजर जनरल या हुद्यांवर त्याने काम केले. तिथे त्याचा १७८१ मध्ये पराभव झाला. मात्र त्याच्यावर प्रधान मंडळाचा पूर्ण विश्वास होता. कॉर्नवॉलिस हिंदुस्थानात आला, त्यावेळी त्याला मुलकी आणि लष्करी अधिकार मिळाले, याशिवाय कौन्सिलचे मनाविरुद्ध स्वतःचे जबाबदारीवर हुकूम देण्याचा आणि वेळप्रसंगी प्रमुख सेनापतीचे काम करण्याचा विशेष अधिकार पिटच्या कायद्याने त्यास मिळाला होता. यावेळी चहूकडून इंग्रजांची इभ्रत खालावत चालली होती व इंग्रजांना एतद्‌देशीय शत्रूंशी मुकाबला देणे प्राप्त होते. महादजी शिंदे याने दिल्ली दरबारी आपली सत्ता बसविली होती तर टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध नेपोलियनशी पत्रव्यवहार  करीत होता व फ्रेंचांशी संधान बांधीत होता. नाना फडणीसाने निजामाशी सख्य करून टिपूने बळकावलेला मराठ‌्यांचा प्रदेश सोडविण्याची खटपट सुरू केली. याच वेळी फ्रेंचांनीही मराठे, टिपू वगैरेंच्या मार्फत इंग्रजांवर चढाई सुरू केली. तेव्हा कॉर्नवॉलिसने टिपूविरुद्ध निजामाची बाजू घेतली. याच वेळी त्रावणकोर व कोचीन ह्या संस्थानांमध्ये बेबनाव उत्पन्न झाला. इंग्रजांनी त्रावणकोरची व टिपूने कोचीनची बाजू घेतली.

टिपूचा पाडाव करण्याकरता कॉर्नवॉलिसने इंग्रज, निजाम व मराठे यांच्यात १७९० मध्ये तह घडवून आणला. हा तह कॉर्नवॉलिसच्या मुत्सद्‌देगिरीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल.टिपूविरुद्ध १७९१ मध्ये कॉर्नवॉलिसने स्वतःकडे सेनापतिपद घेऊन श्रीरंगपटणवर चाल केली. मराठयांच्या मदतीने त्याने टिपूचा पराभव केला. त्यानंतर कॉर्नवॉलिसने १७९२ मध्ये टिपूशी तह केला. या तहाने कूर्ग प्रांत इंग्रजांस लॉर्ड चार्ल्स कॉर्न वॉलिस मिळाला. मलप्रभा व तुंगभद्रा ह्यांमधील सुपीक मुलूख मराठ्यांना मिळाला. मात्र टिपूच्या युध्दाखेरीज एतद्‌देशीयांच्या प्रकरणात कॉर्नवॉलिसने हस्तक्षेप केला नाही. टिपूचा तात्पुरता बंदोबस्त झाल्यानंतर त्याने कंपनीच्या कारभारात लक्ष घातले आणि अनेक सुधारणा केल्या कायमधाऱ्यांची पद्धती, न्याव्यवस्थेची संघटना आणि सनदी नोकरांचा प्रश्न या तीन क्षेत्रांतील कॉर्नवॉलिसची कामगिरी उल्लेखनीय आहे. बंगाल, बिहार व बनारस हे प्रांत इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर हेस्टिंग्जने सुरू केलेल्या मक्तेदारीच्या पद्धतीमुळे वसुलाच्या उत्पन्नात निश्चितपणा राहिला नव्हता. कॉर्नवॉलिसचा ओढा जमीनदारांकडे होता. त्याने पाच वर्षांची सरासरी काढून, जुन्या जमीनदारांच्या जमीनदाऱ्या चालू ठेवल्या. पुढे तीच सरासरी १७९३ मध्ये कायम करून कायमधाऱ्याची पद्धती चालू ठेवली. परंतु या पद्धतीमुळे कॉर्नवॉलिसवर बरीच उलटसुलट टीका झाली. कॉर्नवॉलिसने दिवाणी व फौजदारी न्यायपद्धतीत सुधारणा केली. कलेक्टरकडे मुलकी काम ठेवून दिवाणी व फौजदारी कामाकरिता स्वतंत्र न्यायाधीश नेमले. प्रत्येक जिल्ह्यात न्यायालये स्थापून, अपीलांसाठी पाटणा, मुर्शिदाबाद, डाक्का व कलकत्ता येथे प्रांतिक न्यायालये स्थापण्यात आली. या सर्वांवर एक मुख्य सदर दिवाणी अदालत, गव्हर्नर जनरल व त्याचे कौन्सिल यांची योजना करण्यात आली. याशिवाय किरकोळ न्यायदानासाठी लघुवाद न्यायालये स्थापण्यात आली. या व्यवस्थेत न्यायदानाच्या कामात एतद्देशीयांच्या ऐवजी इंग्रज अधिकारीच नेमण्याचे कॉर्नवॉलिसचे धोरण होते. ह्यास कॉर्नवॉलिस संहिता असे म्हणतात.

कंपनीच्या नोकरांनी खासगी व्यापार करू नये, म्हणून नोकरांचे पगार त्याने वाढवून दिले व त्यांस भक्कम पेन्शन ठरवून देऊन लाचलुचपतीला आणि त्यांच्या खासगी व्यापाराला आळा घातला. मुलकी व दिवाणी नोकरांना पगार व कामे ठरवून देण्यात आली. मात्र एतद्देशीयांना उच्च नोकरीवर किंवा इतरत्र मुळीच नेमू नये, अशी त्याची विचारसरणी होती. १७९३ मध्ये कॉर्नवॉलिसला ‘मार्क्विस’ ही पदवी देण्यात आली. तो परत इंग्लंडला गेला १७९८ ते १८०१ पर्यंत तो आयर्लंडमध्ये व्हाइसरॉय व कमांडर-इन-चीफ या हुद्द्यांवर काम करीत होता. त्याच वेळी त्याने तेथील बंडाळी मोडून काढली. १८०५ मध्ये कॉर्नवॉलिस पुन्हा गव्हर्नर जनरल म्हणून हिंदुस्थानात आला. पूर्वीचे चढाऊ धोरण सोडून युक्तीने त्याने हिंदी सत्ता‌धीशांशी चाललेली युद्धे आवरली. पण पुढे तीन महिन्यातच तो गाझीपूर येथे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी मरण पावला.

कॉर्नवॉलिस प्रामाणिक कार्यकर्ता, मुत्सद्दी व कुशल सेनापती होता. त्याने कंपनीच्या प्रशासनातील उणिवा भरून काढून ब्रिटिश राजसत्तेच्या अंतर्गत राज्यव्यवस्थेचा पाया घातला, असे म्हणण्यास हरकत नाही.

संदर्भ : 1. Oswell, G. D. Sketches of Rulers of India, Vol. III, Oxford, 1908.

2. Seton-Karr, W. S. The Marquess Cornwallis and the Consolidation of British Rule, Vol. IX, Oxford, 1890.

गोखले, कमल