रक्त : मानवासहित  सर्व  पृष्ठवंशी (पाठीचा  कणा  असलेले)  प्राणी  व  काही  अपृष्ठवंशी  प्राणी  यांच्या  शरीरात  प्रामुख्याने  वाहकाचे  कार्य  करणाऱ्या  लाल  रंगाच्या  हृदयापासून  निघून  वाहिन्यांद्वारे  शरीरात  फिरून  परत  हृदयापर्यंत  अभिसृत  होणाऱ्या  द्रव  पदार्थाला  ‘रक्त’  म्हणतात.  रक्ताचा उल्लेख  ऊतक (समान  रचना  व  कार्य  असणाऱ्या  कोशिकांचा-पेशींचा-समूह)  प्रकारातील  ‘अभिसारित  ऊतक’ असाही  करतात.  संयोजी  ऊतकाच्या  अवकाशोतक  तंतुमय  इ.  प्रकारांप्रमाणेच  रक्तही  एक  प्रकार  आहे. [  → ऊतके, प्राण्यांतील]. शरीराचा  कोणताही  भाग  रक्तपुरवठ्याशिवाय  जिवंत  राहू  शकत  नाही  म्हणून  त्यास  ‘जीवनधारा’  असेही  म्हणतात.

अनादिकाळापासून  रक्ताला  ‘पवित्र  द्रव’  मानण्यात  आले  आहे.  प्राचीन  चिनी  लोक  व  दक्षिण  अमेरिकेतील  इंका  लोक  स्वतःच्या  शरीराला  रक्त  फाशीत  कारण  त्यामुळे  रोग  होत  नाहीत, असा  त्यांचा  समज  होता.  प्राचीन  ग्रीक  व  रोमन  लोक  जीवनरक्षक  व  पोषक  पदार्थ  रोहिण्या  शरीरात  वाहून  नेतात  असे  मानीत.  त्यांच्या  मताप्रमाणे  रोहिण्या  व  नीला  स्वतंत्र  तंत्रे   (  संस्था)  असून  सागराच्या  भरती-ओहोटीवर  रक्तप्रवाह  अवलंबून  असतो.  मध्ययुगीन  काळात  नीला  कापून  रक्तस्राव  होऊ  देणे  हा  रोगावरील  नेहमी  वापरात  असलेला  उपचार  होता.  जळवा  लावून  रक्तस्राव  करविणे  हा  मेंदू, मूत्राशय  व  जठर  यांच्या  रोगावरचा  उपचार  समजत.

आ. १. मानवी रक्तातील कोशिका : (अ) श्वेत कोशिका प्रकार : (१) उदासीनता, (२) अरुणकर्षी, (३) क्षारककर्षी, (४) एककेंद्रक, (५) लसीका  (आ) तांबडया कोशिका (इ) बिंबाणू.

विल्यम  हार्वी  यांनी  १६२८  मध्ये  रक्ताभिसरणाचे  पहिले  शास्त्रीय  वर्णन  लिहिले.  १६७०  मध्ये  सूक्ष्मदर्शकाच्या  शोधानंतर  रक्ताची  जटिल  रचना  ज्ञात  झाली.  १७३०  मध्ये  स्टीव्हेन  हेल्स  या  इंग्रज  धर्मोपदेशाकांनी  घोड्यावरील  प्रयोगांनी  ⇨ रक्तदाबाचा अभ्यास  केला.  सतराव्या  शतकात  मानवा-मानवातील, तसेच  मानव  व  इतर  प्राणी  यांच्यावरील  ⇨ रक्ताधानाचे  प्रयोग  केले  गेले परंतु  ⇨रक्तक्लथनाचे  ज्ञान  नसल्यामुळे  ते  थोपविता  येत  नसे.  विसाव्या  शतकात  रक्ताच्या  अभ्यासात  झपाट्याने  प्रगती  झाली  आहे.  एकोणिसाव्या  शतकाच्या  सुरुवातीस  ⇨रक्तगटांचा  शोध  लागल्यानंतर  रक्ताधानाचा  मोठ्या  प्रमाणावर  उपयोग  होऊ  लागला.  रक्त  साठवण्याच्या  पद्धतीत  सुधरणा  होत  गेल्यानंतर  १९१४  च्या  पुढे  ⇨रक्तपेढ्या  अस्तित्वात  येऊ  लागल्या.  रुग्णास  रक्ताच्या  ज्या  घटकाची  आवश्यकता  असेल  तेवढाच  दात्याच्या  रक्तातून  घेऊन  बाकीचा  भाग  दात्याला  परत  करण्याचे  तंत्र  १९७०  नंतर  अस्तित्वात  आले.  वैद्यकशास्त्रातील  आधुनिक  संशोधनाबरोबरच  रक्ताचा  चिकित्सात्मक  उपयोग  वाढत  गेला  आहे.  ‘रक्तचिकित्सा’  या  नव्या  उपचारांची  भर  पडली  आहे.  नैसर्गिक  रक्ताशिवाय  प्रयोगशाळेत  निर्माण  केलेल्या  ‘कृत्रिम  रक्ता  ’चाही  मानवी  रोगांकरिता  उपयोग  करण्यात  येत  आहे.  रक्ताचा  महत्त्वाचा  घटक  तांबड्या  कोशिका  असून  त्याही  कृत्रिम  रीत्या  बनविण्यात  यश  आले  आहे.  या  संबंधीची  माहिती  ‘रक्ताधान’  या  नोंदीत  दिली  आहे.

प्रस्तुत  नोंदीत  प्रथम  मानवी  रक्तासंबंधी  व  नंतर  इतर  प्राण्यांच्या  रक्ताविषयी  माहिती  दिली  आहे.

गुणधर्म : मानवी  रक्त  लाल  रंगाचे, अपारदर्शी, पाण्यापेक्षा  घट्ट  व  अधिक  श्यान (दाट)  द्रव  असूनही  ते  सहज  अभिसृत  [  →  रक्ताभिसरण  तंत्र]  होते.  त्याची  श्यानता  त्याच्या  प्रवाह  वेगानुसार  बदलते.  त्याचा  लाल  रंग  ⇨ रक्तारुण (हीमोग्लोबिन)  या  विशिष्ट  प्रथिनामुळे  प्राप्त  झाला  आहे.  विशिष्ट  गुरुत्व  सर्वसाधारणपणे  १·०६०  असते. pH मूल्य   [→   पीएच  मूल्य] रोहिणी  रक्ताचे  ७·४  व  नीला  रक्ताचे  ७·३५  असते  म्हणजे  रक्त  क्षारधर्मी   (अल्कधर्मी)  असते.   pH   मूल्य  ७·४  पेक्षा  कमी  होण्याला  ‘अम्लरक्तता’  आणि  वाढण्याला   ‘अल्करक्तता’   म्हणतात.   pH   ७  च्या  जवळ  किंवा  ७·७  च्या  जवळ  गेल्यास  जीवन  काही  तासांतच  संपुष्टात  येते.  रक्ताचा  क्षारधर्म  वृक्कांच्या (मूत्रपिंडांच्या)  अम्लधर्मी  किंवा  क्षारधर्मी मूत्रोत्सर्जन  कार्याद्वारे  टिकविला  जातो.

मानवी  रक्ताचे  घनफळ  सु.  ५,०००  मिलि.  असते.  सर्वसाधारणपणे  दर  किग्रॅ.  शरीरवजनास  पुरुषांत  ७०  मिलि.  आणि  स्त्रियांत  ६५  मिलि.  रक्त  असते.  ५,०००  मिलि.पैकी  रक्तद्रव  ३,०००  मिलि.  व  २,०००  मिलि  कोशिका  असतात.  शरीरात  रक्ताचे  वितरण  पुढीलप्रमाणे  असते.  २५०  मिलि.  हृदय, १,३००  मिलि.  फुप्फुसांतील  रक्ताभिसरण, ५५०  मिलि.  रोहिण्या, २,२५०  मिलि.  नीला  आणि  उरलेले  यकृत,   प्लीहा   (पानथरी)  इ.  अवयवांत  संचयित  असते.  शारीरिक  वजन  व  लिंग  रक्ताच्या घनफळावर  परिणाम  करतात, तरी  निरोगी  व्यक्तीच्या  शरीरातील  घनफळ  जवळजवळ  एकसारखे  असते.  रक्ताचा  प्रत्येक  घटक  सतत  बदलत  असतो.  विशेषेकरून  पाणी  रक्तप्रवाहातून सतत अतीजलद बाहेर-आत जाते. ५०० मिली. पर्यंत रक्तनाश (उदा., रक्तदात्याने एका वेळी दिलेले रक्त) कोणताही दुष्परिणाम करीत नाही.

कोष्टक क्र. १

मानवी रक्ताचे घनफळ मोजता येते. त्याकरिता रक्तातील तांबड्या कोशिकांशी संयोगित होणारे लोह किंवा क्रोमियम किंवा फॉस्फरस यांचे समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) वापरतात, उदा., लोह (५५) किंवा क्रोमियम (५१). याशिवाय रक्तद्रवातील प्रथिनाशी संयोगित होणारे काही रंग किंवा किरणोत्सर्गी आयोडीनही वापरून घनफळाचे मापन करता येते.

रक्त हे जटिल रासायनिक संघटनेचा द्रव असून ते रक्तद्रव व तीन प्रकारच्या कोशिका मिळून बनलेले असते. ५५% रक्तद्रव व ४५% कोशिका असतात. या चार प्रमुख घटकांची माहिती पुढे दिली आहे.

रक्ताचे रासायनिक संघटन अतिशय जटिल आहे. संपूर्ण रक्त, रक्तद्रव व तांबड्या कोशिका यांचे रासायनिक संघटन कोटक क्र. १ मध्ये दिले आहे.

शरीरातील सर्व रोहिण्यांतील रक्ताचे संवटन नेहमी स्थिर असते. याउलट, निरनिराळ्या भागांतील नीला रक्ताचे संघटन ते जेथून जात असेल त्या अवयवाच्या कार्याप्रमाणे बदलते. रोहिणी रक्ताचे संघटन स्थिर ठेवण्यास पुढील गोष्टी कारणीभूत असतात.

(अ) रक्तातील किंवा त्यातील कोशिकांतील रासायनिक घटकांची वृद्धी पुढील गोष्टी नियंत्रित करतात : (१) पदार्थ विसरणक्षम (सूक्ष्मकण रूपाने वितरित होणारा) असल्यास ऊतकद्रवात पसरणे; (२) विशिष्ट कोशिकांत साठवण किंवा वद्ध करणे; (३) प्रत्यक्ष नाश किंवा रूपांतरण; (४) उत्सर्जन : फुफुसे, वृक्क, आंत्रमार्ग (आतड्यांनी बनलेला अन्नमार्ग) व त्वचा उत्सर्जनाचे (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकण्याचे) कार्य करतात.

(आ) पदार्थांची कमतरता पुढील गोष्टींमुळे भरून काढली जाते : (१) पाणी, लवणे, कार्बन डाय-ऑक्साइड यांसारखे ऊतकात संचयित असलेले पदार्थ ऊतकद्रवाद्वारे पुन्हा रक्तात येऊन तूट भरून निघते; (२) ग्लुकोज, प्रथिने इ. पोषक पदार्थांची कमतरता पडल्यास उत्पादक अवयव त्यांचे उत्पादन वाढवून ते रक्तात मिसळतात; (३) कोशिकांची उणीव रक्तोत्पादक ऊतके (उदा., अस्थिमज्जा म्हणजे लांब हाडांतील व विशिष्ट चपट्या हाडांतील वाहिनीयुक्त संयोजी ऊतक) भरून काढण्याचा प्रयत्न करतात.

भ्रूणातील रक्तोत्पादन : पीतक कोशातील भ्रूणमध्यस्तरातील [→भ्रूणविज्ञान] विशिष्ट कोशिकांचे रक्तकोशिकाजनक कोशिकांत अथवा आद्य स्कंधकोशिकांत (रक्तातील इतर कोशिका निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कोशिकांत) विभेदीकरण (विशिष्ट कार्य करण्यासाठी होणारे रूपांतरण) होते. आजूबाजूच्या इतर कोशिकांपासून (वाहिनीजनक ऊतकापासून) रक्तवाहिन्या वनतात. स्कंधकोशिकांपैकी बहुसंख्य रक्तारुणाचा संचय करतात आणि त्या आद्य तांबड्या कोशिका बनतात. काही काळपर्यंत या कोशिकांना केंद्रक (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारा गोलसर पुंज) असतो व त्यातील रक्तारुणाला ‘भ्रूणीय रक्तारुण’ म्हणतात. हे रक्तारुण ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड यांची देवाण-घेवाण प्रौढातील रक्तारुणापेक्षा अगदी सहज करू शकते. गर्भावस्थेच्या शेवटास तांबड्या कोशिकांमध्ये भ्रूणीय रक्तारुण प्रौढ रक्तारुणापेक्षा चौपट असते. पुढे हे प्रमाण जलद कमी होते. भ्रूणीय वयाच्या दुसन्या महिन्यापासून यकृत रक्तोत्पादनाचे कार्य करू लागते आणि पाठोपाठ प्लीहा त्यात भाग घेते. तिसऱ्या महिन्यापासून अस्थिमज्जा रक्तोत्पादन करू लागते व त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या कोशिका उत्पन्न होऊ लागतात. यकृताचे कार्य जवळजवळ नवव्या महिन्यापर्यंत चालू असते. मात्र प्लीहेतील उत्पादन सहाव्या महिन्यात थांबते. मध्यंतरी लसीकाभ ऊतकातून लसीका कोशिका आणि एककेंद्रक कोशिका हे श्वेत कोशिकांचे प्रकार निर्माण होऊ लागतात. जन्मानंतर अस्थिमज्जा व लसीकाम ऊतक यांतच फक्त रक्तोत्पादन चालू असते.

रक्ताचे प्रमुख घटक : (१) रक्तद्रव, (२) तांबड्या कोशिका, (३) श्वेत कोशिका व (४) बिंबाणू. या रक्ताच्या घटकांबद्दल खाली माहिती दिली आहे.

आ. २. भ्रूणातील रक्तकोशिकांचे उत्पादन व टप्पे

रक्तद्रव : रक्तातील कोशिका काढून टाकल्यास उरलेल्या द्रवाला ‘रक्तद्रव’ म्हणतात. रक्तक्लथनानंतर जो द्रव वेगळा मिळतो, त्याला ‘रक्तरस’ म्हणतात. रक्तद्रव एक जटिल विद्राव असून त्यात ९०% पाणी व उरलेल्या १०% विद्रुत (विरघळलेल्या) पदार्थांमध्ये ७% बहुजातीय प्रथिने असतात. निरनिराळे वसाभ (स्निग्ध पदार्थांशी सदृश असे) पदार्थ निलंबित (लोंबकळत्या अवस्थेत) व विद्राव स्वरूपात असतात. यांशिवाय क्षार, ग्लुकोज, ॲमिनो अम्ले, जीवनसत्त्वे, हॉर्मोने, चयापचयजन्य (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमध्ये तयार होणारे) त्याज्य पदार्थ त्यात असतात.

रक्तद्रवातील प्रथिनांच्या बाहुल्यामुळे त्यास ‘प्रथिनांचा कलिली विद्राव’ असेही म्हणता येते. अल्ब्युमीन, ग्लोब्युलीन व फायब्रिनोजेन ही प्रमुख प्रथिने असून १०० मिलि. रक्तद्रवात अनुक्रमे ४.५., २.५ ग्रॅ. आणि ०.३ ग्रॅ. असे त्यांचे प्रमाण असते. या प्रत्येक प्रथिन प्रकाराची विशिष्ट कार्ये आहेत. रक्तप्रवाहातील पित्तारुण अल्ब्युमिनाशी बद्ध होऊन वाहून नेले जाते; लोह व तांबे ट्रान्सफेरीन व सेल्यूलोप्लॅझ्मीन या प्रथिनांशी बद्ध होतात; ब१२ जीवनसत्त्व विशिष्ट प्रथिनाशीच बद्ध होते; वसाभ पदार्थ वाहून नेणारी वसा-प्रथिने आहेत. अनेक प्रकारची ग्लोब्युलिने असून अवशोषित प्रथिने वाहून नेण्यास मदत करणे आणि गॅमा ग्लोब्युलिनामार्फत प्रतिपिंडे वाहून नेऊन सुक्ष्मजंतु-संसर्गाविरुद्ध संरक्षण देणे ही कार्ये ती करतात. फायब्रिनोजेन रक्तक्लथनात महत्त्वाचा भाग घेते.

रक्तद्रवात यूरिया, यूरिक अम्ल, क्रिॲटिनीन हे कार्बनी आणि सोडियम, पोटॅशियम मॅग्नेशियम, कॅल्शियम यांची क्लोराइडे, फॉस्फेटे, व सल्फेटे हे अकार्बनी पदार्थही असतात. ऊतक कोशिकांतून येणारा कार्बन डाय-ऑक्साइड सोडियम बायकार्बोनेटाच्या स्वरूपात वाहून नेला जातो.

तांबड्या कोशिका : या अती विशिष्ट कोशिका असून सर्व ऊतकांपर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्यास योग्य अशीच त्यांची रचना आहे. प्रत्येक कोशिका उभयांतर्गोल तत्रफडीच्या

आ. ३. साध्या सूक्ष्मदर्शकाखाली रक्तातील कोशिकादर्शन : तांबड्या कोशिका, श्वेत कोशिका व बिंबाणू यांचे सर्वसाधारणपरस्पर प्रमाण : (१) तांबडी कोशिका, (२) श्वेत कोशिका, (३) बिंबाणू.

आकाराची व ७.५ ते ८ मायक्रॉन (सरासरी ७.२ मायक्रॉन) व्यासाची, मध्यभागी पातळ व फडा २-२ मायक्रॉन जाड असते (१ मायक्रॉन = १०० मिमी.). कोशिका आकाराने एकसारख्या असतात. पुरुषात यांचे प्रमाण एकूण रक्तघनफळाच्या ४२ ते ५४%, स्त्रीत ३७ ते ४२% आणि संख्या अनुक्रमे ६०,००,००० व ४०,००,००० असते. प्रत्येक कोशिकेत तिच्या वजनाच्या एकतृतीयांश भाग रक्तारुण असते. साध्या सूक्ष्मदर्शकाखाली ताज्या रक्तातील तांबड्या कोशिका पिवळसर हिरव्या रंगाच्या, कोणती ही विशिष्ट अंतर्रचना नसलेल्या, केंद्रकहीन आणि नाण्यांच्या चवडीप्रमाणे गोळा होताना दिसतात.

तांबडी कोशिका कलावेष्टित (पातळ पटलाने वेष्टित) असून या कलेचा पारगम्य ता (पदार्थ आरपार जाऊ देण्याची क्षमता) हा विशेष गुणधर्म आहे. पाणी, ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड, ग्लुकोज, यूरिया व इतर काही पदार्थ सहज पारगम्य असले, तरी रक्तारुणास ही कला अपारगम्य आहे. याशिवाय ती एवढी लवचिक असते की, कोशिकेच्या व्यासापेक्षाही कमी व्यासाच्या अतिसूक्ष्म केशवाहिनीतून (केसासारख्या बारीक रक्तवाहिनीतून) ती पुष्कळशी विकृत (वेडीवाकडी) होऊन सहज जाऊ शकते आणि योग्य जागा मिळताच पुन्हा पूर्ववत आकार धारण करते.

मिठाच्या विरल विद्रात्रातून तांबड्या कोशिका जादा पाणी आत शिरून फुगतात, तर संहत (विद्रुत पदार्थाचे प्रमाण जास्त असलेल्या) विद्रावात पाणी बाहेर पडून त्या संकोचतात. ऊर्ध्वपातित (वाफ करून व मग ती थंड करून मिळविलेल्या) पाण्यात त्या फुगत राहून शेवटी फुटतात आणि त्यांतील रक्तारण

आ. ४. क्रमवीक्षण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या तांबड्या कोशिका

व इतर पदार्थ बाहेर पडतात. या क्रियेला ‘रक्तविलयन’ म्हणतात. रक्तविलयनास आघात, पित्तलवण, सर्पविष, जंतुविष, इ. कारणीभूत होऊ शकतात व या पदार्थांना ‘रक्तविलयक’ म्हणतात.

तांबड्या कोशिकांची जीवनमर्यादा ठराविक १२० दिवसांची असते व ती ग्लुकोजजन्य चयापचयापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे टिकते. केंद्रक तसेच रिवोन्यूक्लिइक अम्ल [आर एन ए; न्यूक्लिइक अम्ले] यांच्या अभावामुळे कोशिका विभाजन व प्रथिनांची नवनिर्मिती अशक्य असते. ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड वाहून नेण्यास ऊर्जा लागत नाही, कारण ती क्रिया रक्तारुणाचा अंगभूत गुण- धर्म आहे. कोशिकावाह्य सोडियम व कोशिकांतर्गत पोटॅशियम यांचे योग्य संतुलन ठेवण्याकरिता ऊर्जा लागते. अनेक एंझाइमे रासायनिक प्रक्रियांद्वारे ऊर्जा नियंत्रण करतात. वाढत्या वयाबरोबर वापरल्या गेलेल्या कोशिका जीर्ण होतात. प्लीहा, यकृत व अस्थिमज्जा या ठिकाणी असलेल्या भक्षीकोशिका (सूक्ष्मजंतू, इतर कोशिका व बाह्य कण यांचे भक्षण करणाऱ्या कोशिका) या जीर्ण कोशिकांचे भक्षण करतात. रक्तारुण व इतर प्रथिनांचे अपघटनाने (रेणूचे तुकडे होण्याच्या क्रियेने) ॲमिनो अम्लांत रूपांतर होऊन ती रक्तद्रवामार्फत योग्य जागी प्रथिन नवनिर्मितीकरिता वापरली जातात. निराळे झालेले लोह अस्थिमज्जेत नेले जाऊन नव्या रक्तारुण निर्मितीत वापरले जाते. रक्तारुणाचा काही भाग पित्तारुणात रूपांतरित होतो व यकृतात नेला जातो. पित्तारुणाचे उत्पादन व त्याचे पित्तातील स्रवण रक्तारुणाच्या नाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. [→ पित्तारुण ].

श्वेत कोशिका : तांबड्या कोशिकांपेक्षा अनेक बाबतीत निराळ्या असणाऱ्या या कोशिका पूर्ण कोशिका असून त्यांना केंद्रक व स्वतंत्र हालचाल करण्याची क्षमता असते, म्हणजेच प्रवाहपतित निर्जीव पदार्थासारख्या त्या नाहीत. १० ते २० मायक्रॉन आकारमानाची कोशिका केशवाहिनीच्या भित्तीच्या सलग दोन कोशिकांमधून बाहेर पडू शकते. याला ‘कोशिकापारण’ म्हणतात. त्यांची हालचाल अमीबासदृश [→ अमीबा] व पादाभजन्य [→ पादाभ] असते. यांनाकेंद्रक असून आर एन ए च्या निर्मितीची क्षमता असल्यामुळे त्या प्रथिन संश्लेषण करू शकतात.

श्वेत कोशिकांची संख्या प्रत्येक घ. मिमी. रक्तात ४,५०० ते ११,००० असते. ५०० तांबड्या कोशिकांमागे एक श्वेत कोशिका असे सर्वसाधारण प्रमाण असते. वयोपरत्वे संख्येत बदल होतो. नवजात अर्भकात २५,००० ते ३०,०००; जन्मानंतर तिसन्या व चौथ्या दिवशी कमी होत जाऊन यौवनात ९,००० ते १४,००० आणि प्रौढावस्थेत ४,९०० ते ११,००० होते. विश्रांतिकाळात ही संख्या कमी व श्रमामुळे संख्याचाढ होते.

श्वेत कोशिकांचे तीन प्रकार असून प्रत्येक प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे : (१) कण कोशिका : उपप्रकार (अ) उदासीनरंजी, (आ) अरुणकर्षी आणि (इ) क्षारककर्णी; (२) एककेंद्रक कोशिका आणि (३) लसीका कोशिका (पहा आ. १).

कण कोशिका : उदासीनरंजी कोशिकांत सतत बदलणारा व कोमॅटिनाच्या धाग्यांनी जोडलेले तीन ते पाच खंड असलेला केंद्रक असून कोशिकाद्रव्यात (केंद्रकाच्या बाहेरील

आ. ५

कोशिकेतील जीवद्रव्यात) उदासीन रंजकांनी अभिरंजित होणारे [→ रंजक, जीवविज्ञानीय] कण असतात. केंद्रकाचे खंड झालेले असल्याने कोशिका बहुकेंद्रकी असल्यासारखे भासते. या कोशिकांची संख्या एकूण श्वेत कोशिकांच्या ६०% असते. ताजे रक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास या कोशिकांच्या अमीवास हालचाली दिसतात. त्या पादामांनी चालतात. कोणीकडे जावयाचे हे रसायनानुचलनाने (रासायनिक प्रभाव पाडणाऱ्या पदार्थाच्या सापेक्ष दूर वा जवळ जाण्याच्या हालचालीने) ठरते. ऊतकहानीच्या जागी निर्माण होणारे काही रासायनिक पदार्थ या कोशिकांना आकर्षित करतात. आपल्या पादाभांनी त्या सूक्ष्मजंतू गिळंकृत करतात व त्यांच्या कोशिकाद्रव्यातील सूक्ष्म एंझाइमांचे समुच्चय असणारे कण सूक्ष्मजंतूंचा नाश करतात. या कृतीवरून त्यांना ‘भक्षीकोशिका’ म्हणतात. त्या केवळ सूक्ष्मजंतूंचाच नाश करीत नाहीत, तर हानीच्या जागी असलेल्या मृत कोशिकांचेही भक्षण करून संमार्जनाचे (सफाई करण्याचे) कार्य करतात. ही कृती करताना उदासीनरंजी कोशिका स्वतः ही नाश पावतात.

अरुणकर्षी कोशिकांच्या कोशिकाद्रव्यात इओसीन रंजकांनी अभिरंजित होणारे कण असतात व त्यांतील केंद्रक क्रॉमॅटिनाच्या धाग्याने जोडलेल्या दोन खंडांना वनलेला असतो. या कोशिका उदासीनरंजी कोशिकांप्रमाणेच चलनशील असून भक्षीकोशिकाही असतात. त्यांचे प्रमाण अत्यल्प ०.५ ते १% पर्यंत असते. त्या प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रियांशी [प्रतिजन] संबंधित असाव्यात. क्षारककर्षी कोशिकांचे आकारमान साधारण इतर कण कोशिकांइतकेच असते. केंद्रक लांबट किंवा एक वा दोन संकोचित भाग असलेला आढळतो. यातील कण साधारण मोठे असून क्षारकीय रंजकांनी अभिरंजित होतात व पाण्यात विद्राव्य असतात. क्षारककर्णी कोशिकांचे निश्चित कार्य अजून समजलेले नाही.

सर्व कण कोशिका अस्थिमज्जेत स्कंधकोशिकांपासून निर्माण होतात. एक केंद्रक कोशिका : यांची संख्या एकूण श्वेत कोशिकांच्या ७% असते. त्या चलनशील व भक्षीकोशिका आहेत. त्यांची हालचाल अतिमंद असते. त्या आकारमानाने मोठ्या कणांचे किंवा जीर्ण तांबड्या कोशिकांचे भक्षण करतात; परंतु सूक्ष्मजंतूंच्या भक्षणात असमर्थ असतात. प्रामुख्याने ऊतकहानीच्या जागी संमार्जनाचे कार्य करतात. ऊतकांतील महाभक्षीकोशिका एककेंद्रक कोशिकांपासून निर्माण होत असाव्यात.

लसीका कोशिका : यांची संख्या श्वेत कोशिकांच्या जवळजवळ ३०% असते. त्यांची हालचाल अतिमंद असून बहुसंख्य कोशिका ⇨ लसीका ग्रंथी, प्लीहा, ⇨ योवनलोपी ग्रंथी, ⇨ गिलायू (टॉन्सिल) व इतर लसीका ऊतकांत असतात. रक्ताभिसरणातून त्या सहज ये-जा करू शकतात व त्यांची आयुर्मर्यादा एक वर्षापर्यंत असते.

लसीका कोशिका बाह्य कोशिका व प्रतिजन यांविरुद्ध उपार्जित ⇨ रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. त्या शरीरात शिरणाऱ्या सूक्ष्मजंतूच्या विरुद्ध प्रतिरक्षात्मक प्रतिक्रिया, तसेच कर्क कोशिका किंवा प्रतिरोपित (अन्य व त्याच व्यक्तीच्या शरीरातील एका भागातून कृत्रिम रीत्या काढून दुसऱ्या ठिकाणी बसविलेल्या) ऊतक कोशिकांच्या विरोधी प्रतिक्रिया निर्माण करतात. काही लसीका कोशिका विशिष्ट प्रतिजनांच्या उद्दीपनानंतर तदनुरूप प्रतिपिंडे निर्माण करतात.

रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्याशिवाय लसीका कोशिका स्वशरीर कोशिका व बाह्य कोशिका यांमधील फरक ओळखतात. उदा., शरीराची एका जागेची त्वचा काढून तिचे त्याच शरीरात दुसऱ्या जागी प्रतिरोपण केल्यास ते यशस्वी ठरते. याला लसीका कोशिकांचा वरील गुणधर्म कारणीभूत असतो. याउलट हे त्वचारोपण दुसऱ्या व्यक्तीची त्वचा घेऊन केल्यास लसीका कोशिका त्यास वाह्य पदार्थ म्हणून ओळखून टिकू देत नाहीत. अवयव प्रतिरोपण शस्त्रक्रिया यशस्वी होण्यामध्ये लसीका कोशिकांची ही प्रतिरक्षात्मक प्रतिक्रिया मोठा अडथळा असतो. लसीका कोशिकांची ही शक्ती काबूत ठेवणारी काही औषधे शोधल्यामुळे वृक्क प्रतिरोपण अधिकाधिक यशस्वी होत गेले [→ अंतस्त्य प्रतिरोपण].

आ. ६

बिंबाणू : रक्तातील कोशिकांमध्ये सर्वांत लहान आकारमानाच्या (२ मायक्रॉन व्यास) परंतु संख्येने श्वेत कोशिकांपेक्षा पुष्कळच अधिक (१,५०,००० ते ३,००,००० प्रत्येक ध. मिमी. रक्तात) या कोशिका असतात. त्या केंद्रकहीन व विभाजनक्षमता नसलेल्या असतात. त्यांचा चयापचय अधिक गुंतागुंतीचा असतो. सूक्ष्मदर्शकाखाली मध्यभागी कणसमुच्चय दिसतो. रक्तस्राव होऊ न देणे आणि त्यावर नियंत्रण करणे हे बिंबाणूंचे प्रमुख कार्य आहे. हे कार्य रक्तक्लथनासंबंधी असल्यामुळे त्याविषयी अधिक माहिती ‘रक्तक्लथन’ या नांदीत दिली आहे.

बिंबाणूंची निर्मिती अस्थिमज्जेतील मोठ्या आकारमानाच्या ‘महाकवच’ कोशिकांपासून होते. रक्ताभिसरणातील बिंबाणूची जीवन मर्यादा १० दिवसांची असते व ती संपताच त्यांचा ⇨ जालिका अंतःस्तरीय तंत्रामार्फत नाश केला जातो. त्यांचा शरीरात साठा नसतो; परंतु प्लीहेमध्ये त्यांची संख्या अधिक असते. ऑम्बोपोएटिन नावाच्या अद्यापही निश्चित ज्ञात नसलेल्या व हॉर्मोनसदृश पदार्थामुळे विवाणूंची निर्मिती नियंत्रित केली जाते. बिंबाणू तांबड्या कोशिकांना किंवा श्वेत कोशिकांना चिकटत नाहीत; परंतु एकमेकांस चिकटतात.

रक्तोत्पादक अवयव : अस्थिमज्जा, लसीकाभ ऊतक व प्लीहा है शरीर भाग प्रमुख रक्तोत्पादक अवयव आहेत.

अस्थिमज्जा : रक्तोत्पादनाचा प्रमुख उद्गम लांब हाडे, फासळ्या, कवटीची हाडे, उरोस्थी (छातीच्या मध्यावरील चपटे हाड) व कशेरुक (मणके) यांच्यातील लाल रंगाच्या अस्थिमज्जा भागात आहे. या भागात सूक्ष्मदर्शकाखाली तपासणीत तांबड्या कोशिका, कणकोशिका व विवाणू उत्पादनाच्या पूर्वगामी अवस्थांत दिसतात.

लसीकाभ ऊतक : यौवनलोपी ग्रंथी, गिलायू, लसीका ग्रंथी, आंत्र-श्लेष्मतर (आतड्याच्या आतील बुळबुळीत अस्तर) या टिकाणी कमीजास्त प्रमाणात हे ऊतक असते. या टिकाणी लसीका कोशिकांची निर्मिती होते [लसीका तंत्र].

प्लीहा व यकृत : भ्रूणवयाच्या पाचव्या महिन्यापर्यंत या दोन्ही अवयवांत रक्तातील कोशिकांची निर्मिती होते.

रक्ताचे कार्य : रक्ताचे प्रमुख कार्य शरीरांतर्गत परिस्थितीची स्थिरता कायम ठेवणे हे असून ते समस्थिती (अंतर्गत परिस्थितीची स्थिरता व पर्यावरणापासून स्वायत्तता राखणे) या जैव क्रियेचा महत्वाचा भाग आहे. निरनिराळ्या शारीरिक क्रिया व रासायनिक संघटना यांमधील विरोधांना नियंत्रित करून त्या संतुलित ठेवणे म्हणजेच समस्थिती. बाह्य वातावरणातील अनेक बदल, शारीरिक क्रिया बदलण्याची क्षमता, बदलते अन्नग्रहण व जलपान, आघातास प्रतिरोध, रासायनिक विषांशी मुकाबला, संसर्गजन्य रोग यांसारख्या अनेक समस्यांशी समस्थितीचा संबंध येतो. रक्ताचे संघटन आश्चर्य वाटण्याइतके जटिल असून त्याचे घटक अतिशय गुंतागुंतीच्या व काही अद्यापही अपूर्णपणे ज्ञात असलेल्या पद्धतींनी समस्थिती संतुलनात भाग घेतात. शारीरिक तापमानातील बदल, pH मूल्यातील बदल, घटकांतील फेरफार यांचे परिणाम अतिशय संवेदनशील उद्दीपकांद्वारे रक्तामार्फत योग्य त्या ठिकाणी नेले जातात. रक्ताच्या कार्याचा आढावा खाली दिला आहे.

श्वसन तंत्र : फुप्फुसातून रक्तारुणामार्फत ऑक्सिजन वाहून नेऊन सर्व ऊतक कोशिकांपर्यंत पोहोचविणे. ऊतकांना नको असलेला कार्बन डाय-ऑक्साइड फुप्फुसाकडे आणणे.

पोषण : आंत्रमार्गातून अवशोषित झालेले किंवा शरीरात इतरत्र तयार होणारे पोषक पदार्थ ऊतक कोशिकांपर्यंत पोहोचविणे.

उत्सर्जन : चयापचयजन्य टाकाऊ पदार्थ उत्सर्जक अवयवांपर्यंत नेणे.

रोगप्रतिकारक्षमता : टी-कोशिका, बी-कोशिका व प्रतिपिंडे तसेच इतर संरक्षक पदार्थ योग्य त्या ठिकाणी नेणे [→ रोगप्रतिकारक्षमता].

हॉर्मोन वहन : हॉर्मोनांची म्हणजेच अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावांची परस्पर कार्य जुळणी व कार्य नियंत्रण. शरीरातील निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या अंतःस्रावी ग्रंथींचे नाव योग्य ऊतकापर्यंत वाहून नेण्याचे व त्यामुळे शारीरिक क्रियांचे नियंत्रण रक्तप्रवाहामुळे होते. [अंतःस्रावी ग्रंथि; हॉर्मोने].

शरीराचे जलसंतुलन साधणे : ऊतक द्रव, लसीका व रक्तद्रवातील पाणी मिळून कोशिकाबाह्य द्रव बनतो. या तिन्ही भागांची पाण्याची देवाण-घेवाण सतत चालू असते. यांपैकी रक्तद्रव शरीरभर अभिसृत होत असून त्याचे रासायनिक संघटन नेहमी एकसारखे असल्यामुळे शरीरकोशिकांना कार्य करण्यास योग्य परिस्थिती नेहमी एकसारखी ठेवण्यास मदत होते.

शारीरिक तापमान नियंत्रण : या यंत्रणेत पुढील गोष्टी भाग घेतात : (अ) पाण्याची उष्णता धारिता (तापमान १° से. वाढविण्यासाठी त्याला द्यावी लागणारी उष्णता) उच्च असल्यामुळे देहद्रव अधिक उष्णता संचय करू शकतात. (आ) रक्ताच्या जलद अभिसरण गतीमुळे उष्णता वाटली जाऊन तापमान सारखे ठेवले जाते. (इ) रक्ताद्वारे उष्णता शरीराच्या पृष्ठभागावर पसरवली जाऊन (त्वचेद्वारे) वाष्पीभवन, संवहन, संनयन व प्रारण या भौतिक तत्त्वांप्रमाणे कमी केले जाते [→ उष्णता संक्रम]. (ई) रक्तद्रव फुप्फुसे व त्वचा यांच्यामधील बाष्पीभवनास व त्यामुळे तापमान नियंत्रणास सतत पाण्याचा पुरवठा करते.

तर्षण छाव नियंत्रण : शरीरातील एकूण ४० लि. देहद्रवाची विभागणी २५ लि. कोशिकांतर्गत द्रव आणि १५ लि. कोशिकावाह्य द्रव अशी असते. कोशिकावाह्य द्रवात रक्ताशिवाय मस्तिष्क मेरुद्रव (मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार म्हणून उपयोगी असणारा द्रव), नेत्रगोलांतर्गत द्रव इत्यादींचा समावेश होतो. जरूरीप्रमाणे या दोन्ही विभागांत ⇨ तर्षणक्षम घटकांची देवाण-घेवाण होत असते, दोन्ही विभागांचे एकूण घनफळ व एकूण रक्ताचे घनफळ नेहमी सारखे ठेवले जाण्याकरिता प्रामुख्याने तर्पण दाव कारणीभूत असतो.

अम्ल-क्षार संतुलन नियंत्रण : समस्थिती टिकवण्याकरिता अम्ल-क्षार संतुलनाचे नियंत्रण आवश्यक असते. अम्ल-क्षार संतुलन हा शब्दप्रयोग वापरताना खऱ्या अर्थी शरीरद्रव्याच्या

आ. ७

हायड्रोजन आयनाच्या (विद्युत् भारित अणूच्या) संहतीचाच विचार केला जातो. शरीरकोशिका आणि त्या निर्माण करणारे पदार्थ अगदी ठराविक pH मूल्यांच्या कक्षांमध्येच कार्यक्षम असतात. उदा., तोंडातील लाळ पिठूळ पदार्थावर (स्टार्चावर) पाचकक्रिया करण्यास pH मूल्य ६.०० व ७.०० यांच्या दरम्यानच असावे लागते. ते कमी झाल्यास अम्लता दातावर दुष्परिणाम करील व वाढल्यास पाचकक्रियाच होणार नाही, आ. ७ मध्ये काही महत्त्वाच्या शरीरद्रव्यांच्या pH मूल्यांच्या कक्षा दर्शविल्या आहेत.

रोहिणी रक्ताचे pH मूल्य ७.४ असते. नीला रक्ताचे त्यातील कार्बनिक अम्लामुळे ७.३५ असते. त्याच कारणामुळे ऊतक द्रवाचे pH मूल्यही जवळजवळ तेवढेच असते. रोहिणी रक्ताचे pH मूल्य जेव्हा ७.४ पेक्षा कमी होते तेव्हा त्या व्यक्तीला अम्लरक्तता असल्याचे आणि ७.४ पेक्षा जास्त होते तेव्हा क्षाररक्तता असल्याचे म्हणतात. रक्ताचे pH मूल्य ७.० पेक्षा कमी किंवा ७.७ पेक्षा जादा झाल्यास व्यक्ती काही तासच जिवंत राहू शकते. अम्लरक्तता किंवा क्षाररक्तता उत्पन्न होऊ नये म्हणून काही खास यंत्रणा उपलब्ध आहे. याकरिता रक्तामध्ये बायकार्बोनेट उभयरोधक, फॉस्फेट उभयरोधक व प्रथिन उभयरोधक ही अम्ल-क्षार उभयरोधक संयुगे असतात. या यंत्रणेचा उद्देश रक्ताचे pH मूल्य नेहमी समस्थितीस पोषक ठेवणे हाच असतो.

आयत संतुलन नियंत्रण : कोशिकाबाह्य द्रव म्हणजे रक्तद्रव व ऊतक द्रव यांमध्ये सोडियम, क्लोराइड व बायकार्बोनेट यांचे आयन (विद्युत् भारित अणू वा अणुगट) भरपूर प्रमाणात असतात. त्यांशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट, सल्फेट व कार्बनी अम्ल यांचे आयनही अल्प प्रमाणात असतात. रक्तद्रवात प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते, तर ऊतक द्रवात ते अल्प असते. कोशिकावाह्य द्रवाचा उल्लेख अंतःस्थ परिस्थिती असाही करतात. या द्रवाच्या आयन घटकांचे संतुलित संघटन कोशिका कार्याकरिता आवश्यक असते. तसेच त्या द्रवातील विद्युत् विश्लेष्य (ज्यांतून विद्युत् प्रवाह जाऊ दिल्यास घटक पदार्थ अलग होतात असे) पदार्थ व पोषक पदार्थही संतुलित असावे लागतात.

रक्तदाबावर नियंत्रण : रक्ताच्या घनफळात योग्य ते बदल करून रक्तदाबावर नियंत्रण ठेवले जाते. घनफळ वाढल्यास हृक्षेपित रक्त वाढते व रोहिणी रक्तदाब वाढतो आणि कमी झाल्यास हृदक्षेपित रक्त कमी होते व रक्तदाब कमी होतो. [→ रक्तदाब ].

रक्तासंबंधीचे रोग : अनेक रोग रक्ताशी संबंधित आहेत. बहुतेक सार्वदेहिक रोगांत रक्तावर किंवा रक्तातील घटकांवर परिणाम होतात; उदा., ⇨ न्यूमोनिया व ⇨ आंत्रपुच्छशोध या विकृतींत श्वेत कोशिकाधिक्य आढळते. अशा वेळी या विकृतींचा समावेश रक्तासंबंधीच्या रोगांत केला जात नाही. रक्तासंबंधीच्या रोगांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते : (१) तांबड्या कोशिकांसंबंधीचे, (२) श्वेत कोशिकांसंबंधीचे, (३) दिवाणूंसंबंधीचे आणि (४) रक्तोत्पादक ऊतकांचे रोग.

रक्तासंबंधीच्या रोगांचा अभ्यास वैद्यकाच्या ज्या शाखेत केला जातो तिला रक्तरोगविज्ञान म्हणतात. रक्ताचे शारीर (शरीररचनाविज्ञान), शरीरक्रियाविज्ञान, विकृतिविज्ञान, रक्तरोग लक्षणे आणि त्यांवरील उपचारांचा अभ्यास या शाखेत केला जातो. आधुनिक उपकरणे व जीवरसायनशास्त्रातील प्रगतीमुळे या शाखेत सतत भर पडत आहे.

तांबड्या कोशिकांसंबंधीचे रोग : यांमध्ये नेहमी आढळणाऱ्या ‘पांडुरोग’ (ॲनिमिया) अथवा ‘रक्तक्षय’ या रोगावर स्वतंत्र नोंद आहे. ⇨ रक्तकोशिकाधिक्य या विकृतीत तांबड्या कोशिकांची संख्या वाढलेली असते.

काही रोगांमध्ये तांबड्या कोशिकांची जीवनमर्यादा बरीच घटलेली (१२० दिवसांऐवजी फक्त १५ ते २० दिवस) आढळते. यांमध्ये पांडुरोग आणि/किंवा रक्तविलयनजन्य कावीळ [→ कावीळ] बहुधा आढळतात. अशा रोगांचा उल्लेख ‘रक्तविलयनजन्य रोग’ असा करतात. या रोगांची कारणे अनेक आहेत व कोशिकांतर्गत अपसामान्यता वा कोशिकाबाह्य कारणांचा त्यांत समावेश होतो. कोशिकांतर्गत कारणे बहुतेक आनुवंशिक असतात. कधी कधी रोगप्रतिकारक्षमता यंत्रणेच्या क्रियाशीलतेमुळे रक्तविलयन होते. नवजात अर्भकातील रक्तविलयनजन्य कावीळ याचे उत्तम उदाहरण आहे [→ नवजात अर्भक]. मातेच्या रक्तातील प्रतिपिंडे व अर्भकांच्या रक्तातील तांबड्या कोशिका (प्रतिजन) या प्रतिक्रियेमुळे ही विकृती उद्भवते, विरुद्धधर्मी रक्ताधानाचा तांबड्या कोशिकांवर अनिष्ट परिणाम होऊन रक्तविलयन होते. आत्मप्रतिरक्षाजन्य रक्तविलयनास स्वनिर्मित प्रतिपिंडे स्वतःच्याच तांबड्या कोशिकांच्या नाशास कारणीभूत असतात.

श्वेत कोशिकांसंबंधीचे रोग : मानवी रक्तातील श्वेत कोशिकांची संख्या सारखी बदलत असते. सकाळी ती कमी, तर दुपारी वाढलेली आढळते. शारीरिक श्रम, मासिक पाळी, गर्भारपण, प्रसूतीची वेळ व भावनाविवशता यांमुळे श्वेत कोशिकांची संख्या तात्पुरती वाढते. श्वेत कोशिकांची अपसामान्य वाढ किंवा न्यूनता, एकूण प्रमाणातील बदल, आकार बदल हे शारीरिक विकृतीचे दर्शक असतात. सर्वसाधारणपणे तिन्ही प्रकारच्या श्वेत कोशिकांचे शरीराचे सूक्ष्मजंतुविरुद्ध संरक्षण करणे, हे महत्त्वाचे कार्य आहे.

उदासीन रंजी कोशिकाधिक्य : प्रत्येक घ. मिमी. रक्तात २,००० ते ७,५०० उदासीनरंजी कोशिका असतात. ही संख्या शारीरिक श्रम, भावना, गर्भारपण किंवा प्रसूती यांमुळे वाढते. अशा वाढीला ‘शरीर- क्रियावैज्ञानिक वाढ’ म्हणतात. शारीरिक विकृतीमुळे होणाऱ्या संख्या- वाढीला ‘विकृतिजन्य वाढ’ म्हणतात. अशी वाढ पुढील विकृतींत आढळते : (१) सूक्ष्मजंतू संसर्ग : पू-उत्पादक सूक्ष्मजंतू संसर्गात १५,००० ते ३०,००० आणि कधी कधी ८०,००० पर्यंत संख्या वाढते, २) तीव्र रक्तस्राव, (३) ऊतकहानी. उदा., हृद्स्नायू अभिकोथ (रोहिणीचा आकस्मिक रोध झाल्याने रक्तपुरवठा थांबल्यामुळे ऊतकाचा मृत्यू होणे), मूत्रविषरक्तता (मूत्र घटक रक्तात आल्याने निर्माण होणारी विषारी अवस्था), (४) कर्करोग (विशेषेकरून यकृतातील प्रक्षेपासह म्हणजे मूळ रोगस्थानापासून रक्तवाहिनी, लसीकावाहिनी इत्यादींमार्गे कर्ककोशिका वाहून आल्याने निर्माण होणाऱ्या हानिकारक गाठीसह), हॉजकिन रोग (लसीका ग्रंथी, प्लीहा व सर्वसाधारण लसीकाभ ऊतक यांची वाढ होणारा आणि टॉमस हॉजकिन या इंग्रज वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा मारक रोग), (५) रक्तविलयन : वाहिनी अंतर्गत किंवा वाहिनीबाह्य, (६) औषधे : क्विनीन, ॲड्रे- नॅलीन, कॉर्टिकोस्टेरॉइडे वगैरे व (७) विषबाधा : पारा, शिसे व कार्बन डाय-ऑक्साइड.

उदासीनरंजी कोशिकान्यूनता : पुष्कळ वेळा निरोगी व्यक्तीतही कोशिकासंख्या १,५०० च्या आसपास आढळते. काही आफ्रिकन जमातींत जीननिर्मित (आनुवंशिक) न्यूनता निरोगी व्यक्तीत नेहमी आढळते. १,५०० पेक्षा संख्या जेव्हा सतत कमीच आढळते तेव्हाच ती विकृतिजन्य समजली जाते. कारणे : (१) विशिष्ट सूक्ष्मजंतू संसर्ग : उदा., आंत्रज्वर (टायफॉइड). (२) अस्थिमज्जा विकृती : उदा., व१२ जीवनसत्त्व व फॉलिक अम्ल न्यूनता, काही औषधे (उदा., क्लोरेंफिनिकॉल), आयनीकारक प्रारण (आयन निर्माण करणारी तरंगरूपी ऊर्जा). (३) आत्मप्रतिरक्षानिर्मित विकृती : उदा., सार्वदेहिक त्वचारतिमा. उदासीनरंजी कोशिकाविरोधी स्वनिर्मित प्रतिपिंडे निर्माण होतात. (४) काही जन्मजात विकृती : उदा., यौवनलोपी ग्रंथी न्यूनोत्पत्ती.

अरुणक कोशिकाधिक्य : पुढील विकृती यास कारणीभूत असतात : (१) दमा, पित्त उठणे इ. अधिहृषताजन्य (अॅलर्जीजन्य) रोग, (२) परजीवीजन्य (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या सजीवांमुळे उद्भवणारे) रोग. (३) औषधे : उदा., स्ट्रेप्टोमायसीन, यकृतार्क, (४) काही स्वचा रोग, (५) फुप्फुस विकृती, (६) काही रक्तासंबंधीचे रोग : उदा., मारक पांडुरोग.

लसीका कोशिकाधिक्य व लसीका कोशिकाम्यूनता : काही विशिष्ट तीव्र संसर्गजन्य रोगांत लसीका कोशिकाधिक्य आढळते, तर काहींमध्ये लसीका कोशिकान्यूनता आढळते.

एककेंद्रक कोशिकाधिक्य : संक्रामक एककेंद्रक कोशिकाधिक्य अथवा ग्रंथिल ज्वर नावाच्या विकृतीत सुरुवातीला निरनिराळ्या आकाराच्या एककेंद्रक कोशिका आढळतात व संख्याही (एकूण वेत कोशिकासंख्येच्या ६०-७० व्हायरसामुळे होतो. १०%) वाढते. हा संसर्गजन्य रोग इप्स्टीन-बार व्हायरसामुळे होते.

बिंबाणुसंबंधीचे रोग : बिंबाणू वस्तुतः कोशिका नसून अतिसूक्ष्म (२ मायक्रॉन व्यासाचे) कण असतात. रक्तस्तंभन अथवा वाहिनी तुटल्यास रक्त बाहेर न पडू देण्याच्या व रक्तक्लथन या क्रियांमध्ये विवाणू महत्त्वाचे कार्य करतात.

बिंबाणु-आधिक्य : कधी कधी बिंबाणुंची संख्या अतिशय वाढते. त्यामुळे रक्तस्रावी रोगक्षमता तसेच वाहिनीक्लथन प्रवृत्ती वाढतात. प्लीहा उच्छेदन (प्लीहा काढून टाकण्याच्या) शस्त्रक्रियेनंतर संख्या वरीच वाढते.

बिंबाणु-दौर्बल्य : यात बिंबाणुची संख्या प्राकृतिक असूनही त्यांच्या कार्यात विकृती असते. काही वेळा हा दोष जन्मजात असतो. मूत्रविपरक्तता अती गंभीर असल्यास ही विकृती आढळते.

बिंबाणुन्यूनता : रक्तप्रवाहातील एकूण बिंबाणूंची संख्या कमी ‘ होण्याला ‘बिंबाणुन्यूनता’ म्हणतात. संख्या ५०,००० पेक्षा कमी न होताच रक्तस्राव होतात व ती १०,००० पर्यंत घटल्यास बहुधा मारक ठरते. बिंबाणुत्यूनतेची अनेक कारणे आहेत. काही विषाणुन्यूनताजन्य ग रोगांची सविस्तर माहिती ‘नीलारुणी रोग’ या नोंदीत दिली आहे.

रक्तोत्पादक अवयवांचे रोग : रक्तार्बुद अथवा श्वेत कोशिकार्बुद : या रोगाचे मूळ नाव ल्युकेमिया असे असून त्याचा अर्थ ‘श्वेत रक्त’ असा आहे. या विकृतीत श्वेत कोशिकांची संख्या अपसामान्य वाहून (५,००,००० ते १०,००,००० पर्यंत) अपरिपक्वावस्थेतील कोशिका उत्पादक ऊतकांत व शरीरभर संचयित होतात. एकदा सुरू झालेली विकृती अज्ञात कारणामुळे वाढत जाते व बहुधा संख्या तसेच गुणधर्मात्मक बदल श्वेत कोशिकांत आढळतात. ही विकृती बहुतकरून मारक असते. [→ श्वेत कोशिकार्बुद].

कोष्टक क्र. २

हॉजकिन रोग : याला हॉजकिन लसीका मांसार्बुद असेही म्हणतात. पूर्वी ⇨ जालिका-अंतःस्तरीय तंत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि प्रामुख्याने भक्षीकोशिकांचे कार्य करणाऱ्या तंत्राला आता ‘एककेंद्रक कोशिका-महाभक्षी कोशिका तंत्र’ हे नाव देण्यात आले आहे. या तंत्रात असलेल्या प्रमुख लसीकाम ऊतकांची सतत वेदनारहित वृद्धी होणाऱ्या चिरकारी रोगाला हॉजकिन रोग म्हणतात. अमेरिकेत प्रतिवर्षी ५,००० ते ६,००० नवे रुग्ण या रोगाने पछाडल्याचे आढळते. पुरुष व स्त्री यांचे प्रमाण १.४ : १ असे आहे. कुमारावस्था आणि प्रौढावस्थेच्या सुरुवातीस प्रमाण अधिक असते. शरीरातील लसीका ग्रंथींची हळूहळू वाढ होणे (विशेषेकरून मानेतील लसीका ग्रंथींची वाढ) हे प्रमुख लक्षण असते. वजन कमी होणे, अशक्तता, पांडुता व ज्वर ही इतर लक्षणे कालांतराने सुरू होतात. रक्त तपासणीत रक्तक्षय व श्वेत कोशिकाधिक्य (उदासीनरंजी कोशिकाधिक्य) आढळतात. लसीका ग्रंथी ऊतकाची जीवोतक परीक्षा (जिवंत शरीरावून घेतलेल्या ऊतकांची रोगनिदानाकरिता स्थूलमानाने आणि सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने केलेली तपासणी) महत्त्वाची असते. तीत रीड स्टर्नवर्ग नावाच्या (डोरोथी रीड व जी. एम्. स्टर्नवर्ग या विकृतिवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या) विशेष कोशिका भाढळणे निश्चित निदानात्मक असते.

हा रोग मारक अर्बुदामध्ये गणला जातो. पूर्वी हमखास मारक समजला गेलेला हा रोग चिकित्सक दृष्ट्या निरनिराळ्या टप्यांत विभागता येत असून लवकर निदान झाल्यास कोशिकानाशी औषधोपचारांनी रुग्णाची जीवनमर्यादा वाढवता येऊ लागली आहे.

लेखक : भालेराव, य. त्र्यं.

रक्तविकार : आयुर्वेदीय वर्णन : रक्तविकाराचे रक्तक्षय, रक्तवृद्धी आणि रक्तदुष्टी असे मुख्य तीन प्रकार पडतात. यांपैकी रक्तक्षय या विकारासाठी ‘पांडुरोग’ ही नोंद पहावी. रक्तवृद्धीने डोळे लाल, शरीर लाल व शिरा भरलेल्या इ. लक्षणे होतात. ह्यावर रक्ताचे पचन वाढवून त्यापासून मांस धातूची उत्पत्ती व्हावी ह्या दृष्टीने उपचार करावयाचे असतात. रक्तधातूचा अग्नी वाढवून त्याचे पचन करण्याच्या दृष्टीने कडू पडवळ, अनंतमूळ, नागरमोथा, पहाडमूळ, कुटकी ही औषधे उपयुक्त होतात. अधिक प्रमाणात जर रक्तवृद्धी असेल, तर रक्त सम होईतोपर्यंत मधूनमधून दोन्ही हातांच्या शिरांमवून आलटून पालटून रक्तस्राव करवावा व वरील औषधे घ्यावीत. रक्तदुष्टीने तोंड येणे, डोळे लाल होणे, तोंडाला व श्वासाला घाण येणे, गुल्म, विसर्प, रक्तपित्त, विद्रधी, रक्तमेह, प्रदर, वातरक्त वगैरे अनेक विकार उत्पन्न होतात. त्यांचे उपचार त्या त्या विकारात पहावेत.

लेखक ꞉ पटवर्धन, शुभदा अ.

मानवेतर प्राण्यांतील रक्त : सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये रक्ताशिवाय अभिसृत होणारा आणखी एक द्रव असतो व त्याला ‘लसीका’ म्हणतात [ → लसीका तंत्र]. सर्वच बहुकोशिकीय प्राण्यांमध्ये रक्त असतेच असे नाहीत. अगदी कनिष्ठ वर्गीय प्राण्यांत (उदा., सीलेंटे रेट, स्पंज, चापट कृमी वगैरे) रक्त नसते व पोषक पदार्थांचे वहन कोशिकांतर्गत द्रवामार्फत होते. एकायनोडर्म (कंटकी चर्मी) प्राणी, गोलकृमी व इतर काही प्राण्यांत अभिसृत होणारे रक्त नसते.

वरिष्ठ प्राण्यांत रक्त श्वसन तंत्राच्या कार्यात महत्त्वाचा भाग घेते. बहुतेक सर्व कीटकवर्गीय प्राण्यांत व काही आर्थोपॉड (संधिपाद) प्राण्यांत रक्त श्वसन कार्यात भाग घेत नाही. बहुतेक सर्व वरिष्ठ व प्राण्यांत रक्तामध्ये ऑक्सिजनवाहक रक्तद्रव्य असतेच. मानवात रक्तारुण हे कार्य करते. रक्तद्रवातील श्वसन रंजकद्रव्ये जेवढा ऑक्सिजन विद्राव्य स्वरूपात वाहून नेऊ शकतील, त्यापेक्षा चाळीस पट अधिक ऑक्सिजन रंजकद्रव्ये संयोजित स्वरूपात वाहून नेऊ शकतात.

निरनिराळ्या प्राण्यांच्या रक्तातील तांबड्या कोशिकांची संख्या खालीलप्रमाणे असते [दर घ. मिमी. रक्तातील संख्या (लक्षामध्ये)].

मानव ४०-६०                             मासे      २.५-२०

शेळी ९०-१००                            बेडूक ५.०

मेंढी ११०-१४०                           प्रोटिअस ०.४

पक्षी १०-४०

तांबड्या कोशिकांच्या आकारात आणि आकारमानातही कधी कधी फरक आढळतात. उंट सोडून इतर स्तनी प्राण्यांत या कोशिका गोल आकाराच्या असतात. उंटात त्या अंडाकृती असतात. स्तनी प्राण्यांखेरीज इतर प्राण्यांत आकार अंडाकृती असून कोशिकेत केंद्रक असतो.

अपृष्ठवंशी प्राण्यांत रक्तारुणाशिवाय क्लोरोक्रुओरीन, हीमोसायनीन, हीमइरिथीन यांसारखी आणखी काही रंजकद्रव्ये असतात. काही क्रस्टेशियन (कवचयुक्त) प्राण्यांत (उदा., खेकडा) हीमोसायनीन ऑक्सिजन वाहकाचे कार्य करते. ते ऑक्सिजनाशी संयोजित होताच त्याचा रंग निळा बनतो. हीमइरिथ्रीन फिकट पिवळ्या रंगाचे असते आणि ऑक्सिजनमिश्रित होताच लालसर बनते. जेफीरिअन व पॉलिकीट कृमींमध्ये ते परिवर्तनीय ऑक्सिजनवाहक असते. काही ट्यूनिकेट प्राण्यांच्या रक्तकोशिकांत व्हॅनेडियम क्रोमोजेन हिरव्या रंगाच्या पिंडांच्या स्वरूपात असते. कोष्टक क्र. २ मध्ये काही प्राण्यांतील श्वसन रंजकद्रव्यांविषयी माहिती दिली आहे.

लेखक : इनामदार, ना. भा.

संदर्भ : 

  • Guyton, A. C., Textbook of Medical Physiology, Toky, 1976.
  • Houssay, B. A. and others, Human Physiology, New York, 1955.
  • Macleod, J., Ed., Davidson’s Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1984.
  • Maksimov, A. A.; Bloom, W., Textbook of Histology, Lon- don, 1957.
  • Morrison, T. F. and others, Human Physiology, New York, 1959.
  • Petersdorf, R. G. and others, Ed., Harrison’s Principles of Internal Medicine, Singapore, 1983.
  • Scott, R. B. Ed., Price’s Textbook of Practice of Medicine, Oxford, 1978.
  • Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Tokyo, 1984.
  • Williams, P. L.; Wendell-Smith, C. P., Basic Human Embryology, London, 1969.