मन्सूर, अल् : (७१२ – ऑक्टबर ७७५). पश्चिम आशियातील अब्बासी खिलाफतीचा दुसरा खलिफा. याच्या तडफदार कारकीर्दीमुळे यालाच अब्बासी खिलाफतीचा संस्थापक मानतात. याचे मूळ नाव अबू जाफर. पुढे गादीवर आल्यावर त्याने अल् मन्सून (विजयश्री) हे नाव धारण केले. त्याचा जन्म अल् हुमैय्याह (जॉर्डन) येथे झाला. हा मुहंमद पैगंबरांचा चुलता अब्बास यांचा पणतू होता. उमय्यांचा शेवटचा खलीफा दुसरा मेरवान याचा खोरासान येथे पराभव करून अब्बासी बंडखोरांनी आपल्या वंशाची सत्ता प्रस्थापित केली (७५०). या युद्धाच्या वेळी अबू जाफरने विशेष पराक्रम आणि मुत्सद्देगिरी विशेषत: वॅसितच्या वेढयाच्या वेळी दाखविली.

पहिला खलिफा अबू अल्-अब्बास याच्या कारकीर्दीत अबू जाफर हा आर्मोनिया, आझरवैजान आणि मेसोपोटेमियातील काही प्रदेशांवर प्रशासक होता. अबू जाफर मक्केच्या यात्रेहून परत येताना त्यास खलीफापद मिळाल्याची बातमी मिळाली, परंतु सिरीया येथे तत्कालीन गव्हर्नर असलेल्या अब्दुल्ला अली या चुलत्याने त्यास विरोध केला. हे बंड शमविण्यासाठी त्याने अबू मुस्लिम(७२८-५५) यास पाचारण केले अबूमुस्लिमने अब्बासींना सुरूवातीपासून उमय्यांविरूद्ध सहकार्य दिले होते आणि काही लढायांत सेनापतिपदही भूषविले होते. त्याची यशस्वी आणि महत्वपूर्ण कामगिरी लक्षात घेऊन अल्-मन्सूरने अबू मुस्लिमला अबदुल्लाविरूद्ध धाडले. या युद्धात अब्दुल्ला पकडला गेला व त्याचा पुढे अल्-मन्सूरने खून केला. त्यानंतरही अल्-मन्सूरला अनेक राजकीय व धार्मिक बंडांना तोंड द्यावे लागले. शिया पंथीयांचे उमय्या खिलाफतीविरूद्ध त्यास प्रारंभी सहकार्य मिळाले, परंतु पुढे त्यांच्या अवास्तव मागम्यांमुळे तो त्रस्त झाला. त्याने शियांची निदर्शने दडपून टाकली (७५८). तेव्हा हसन इब्न्-अलीच्या नेतृत्वाखाली शियांनी मोठा उठाव केला आणि मदतीला स्वतंत्र खलीफापद निर्माण केले (७६२). त्याचाही त्याने बीमोड केला. इराणी चालीरीती, शासनपद्धती आणि आचारविचार यांचा अबू मुस्लिम व शिया पंथ यांमुळे अब्बासी खिलाफतीतील इस्लामी संस्कृतीवर प्रभाव पडला. शासनात इराणी लोकांचे वर्चस्वही वाढले, तेव्हा खोरासान येथे नेमलेला राज्यपाल अबू मुस्लिम हा डोईजड होईल, से वाटल्यावर मन्सूरने त्यास ठार मारले. ही बंडे शमल्यानंतर अब्बासी खिलाफतीची सत्ता स्थिरावली.

पुढे अल्-मन्सूरने आपली राजधानी दमास्कसहून टायग्रीस नदीकाठी बगदाद (मदीनत अस्-सलेम) या प्राचीन खेड्यात हलविली (७६२) व त्यास अल्-मन्सुरिया हे वनाव दिले. बगदाद येथे त्याने मशिदी, प्रासाद इ. वास्तू बांधल्या व शहराचे सौंदर्य वाढविले. पुढे हारून अल्-रशीदच्या (कार. ७८६-८०९) वेळी ते इस्लामी जगातील व्यापाराचे एक मोठे केंद्रे बनले.

राज्यविस्ताराचे धोरण अंमलात आणून त्याने अनेक नवीन प्रदेश जिंकले व आपल्या राज्यात समाविष्ट केले. तथापि उमय्या वंश नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. पुढे खोरासान येथील इराणी लोकांच्या मदतीने त्याने आफ्रिकेत शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. बायंझटिनच्या सरहद्दीवर वारंवार हल्ले होतात. म्हणून त्याने सरहद्दीवर किल्ले बांधून संरक्षणव्यवस्था अधिक बळकट केली. त्याने आपल्या राज्यात कार्यक्षम प्रशासनयंत्रणा अंमलात आणली. त्यासाठी वजीर हे खास नवीन पद निर्माण केले. वजीराच्या हाताखाली संरक्षण, अर्थ इ. मंत्र्यांची नेमणूक केली. खालिद इब्‍न बर्मक हा त्याच्या दरबारातीलप्रसिद्ध मंत्री. त्याने अब्बासींची सत्ता द्दढतर करण्यात व बगदादच्या पुनर्स्थांपनेत महत्वाचे कार्य केले. त्याच्या कार्यक्षम प्रशासनामुळे आणि काटकसरीच्या वर्तणुकीमुळे अब्बासींची आर्थिक स्थिती मजबूत झाली. त्यामुळे पुढील शंभर वर्षे खलीफांची आर्थिक स्थिती उत्तम होती, असे इतिहासकार म्हणतात.

अल्-मन्सूरला अरबी वाङ्मयाची आवड असली, तरी संगीताची गोडी नव्हती. त्याने आपल्या दरबारात संगीतास मनाई केली होती. त्याच्या दरबारात सिंधमधून हिंदू आले होते. त्यांनी ब्रह्यागुप्ताने लिहिलेले ब्रह्यास्फुटसिद्धांत आणि खंडखाद्यक हे दोन ग्रंथ मन्सूरला दिले.मन्सूरने या दोन्हींचे अरबीत भाषांतर करवून घेतले.मक्केच्या यात्रेला जाताना (अल्-मन्सूर) पुढे दहाव्या शतकातील खलीफा अबू ताहीर इस्माईल, बाराव्या शतकातील आफ्रिकेचा व स्पेनचा विजेता याकूब इ. मुस्लिम राजांनी धारण केलेला आढळून येतो.पहा: अब्बासी खिलाफत, उमय्या खिलाफत, बगदाद.

संदर्भ: 1. Gruncbaum, G.E.Von Trans. Watson, Katherine, Classical Islam: a History-600-1258, Chicago, 1970.

2. Saunders, J, J. A. History of Medieval Islam, New York, 1965.

शेख, रूक्साना