अरुणाचल प्रदेश : भारताच्या ईशान्य कोपऱ्‍यामधील केंद्रशासित प्रदेश २० जानेवारी १९७२ पूर्वी ‘नॉर्थ-ईस्ट फ्राँटियर एजन्सी’ अथवा ‘नेफा’ या नावाने प्रसिद्ध २६२८’ उ. ते २९३०’ उ. आणि ९१३०’ पू. ते ९७३०’ पू. क्षेत्रफळ ८३,५७८ चौ. किमी. लोकसंख्या ४,६७,५११ (१९७१). लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील पंचविसावे आणि भारताच्या ०.०८% लोकसंख्या असलेले हे राज्य लष्करी दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे कारण याच्या उत्तरेस तिबेट, पूर्वेस चीन व ब्रह्मदेश, दक्षिणेस आसाम व पश्चिमेस भूतान आहे. राज्याची राजधानी शिलाँग येथे आहे.

 

भूवर्णन : भारतात प्रथम सूर्योदय ह्या प्रदेशात होतो, म्हणून यास ‘अरुणाचल’ हे नाव मिळाले आहे. आसाम हिमालयाच्या (हिमालयाचा पूर्व भाग) शाखोपशाखांनी हे राज्य व्यापलेले आहे. हिमालयाच्या उत्थापनाच्या वेळेसच येथील पर्वतश्रेणीस एकदम दक्षिणेकडे व नैर्ऋत्येकडे वळण मिळाले. त्यामुळे अरुणाचल प्रदेशातील तौलनिक दृष्ट्या थोड्याशा भागात निसर्गाची विविधता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. राज्याचा ६०% भूभाग जंगलव्याप्त असून त्यामधील बहुतेक प्रदेश असमन्वेषित आहे. अका, डफला, मीरी, अबोर, मिशमी, पातकई इ. टेकड्यांचा समावेश अरुणाचलमध्ये होतो. बहुतेक टेकड्या ईशान्य-नैर्ऋत्य पसरलेल्या असून त्यांची उंची ८०० ते ४,००० मी. पर्यंत आहे. उत्तरेकडे ३,०००–५,२०० मी. उंचीपर्यंतची अनेक हिमाच्छादित शिखरे आढळतात. कामेंग, सुबनसिरी, सियांग अथवा दिहांग, दिबांग अथवा सिकांग, लोहित आणि बुरीदिहींग या ब्रह्मपुत्रेला मिळणाऱ्‍या या राज्यातील प्रमुख नद्या. या नद्या तसेच लहानसहान नद्यानाले यांकाठची जमीन तेवढी सुपीक आहे. नद्यानाल्यांनी हिमालयामध्ये कित्येक घळी व खिंडी बनविल्या आहेत. अशाच एका घळीतून तिवेटमध्ये पश्चिम-पूर्व वाहणारी त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) दक्षिणवाहिनी बनते तिला अरुणाचलमध्ये ‘दिहांग’ म्हणतात, तर लोहित नदीच्या संगमानंतर आसाममध्ये तिला ‘ब्रह्मपुत्रा’ नाव मिळाले आहे.

 

अरुणाचलचा प्रदेश समशीतोष्ण कटिबंधात मोडत असला तरी उंचसखलपणानुसार हवामान बदलते. बरीच पर्वत-शिखरे बर्फमय आढळतात, तर दक्षिणेकडील नदीखोऱ्‍यांत बरीच उष्णता जाणवते. बोमदिला येथे १०० सेंमी., पासिघाट येथे ६०० सेंमी., तेजू येथे ४०० सेंमी. व चांगलाँग येथे २०० सेंमी. वार्षिक पर्जन्य असल्याची नोंद आहे. ओक, पाईन, शाल, बाभुळ, वेत, बांबू त्याचप्रमाणे हिमालयातील अनेक वनस्पतींनी अरुणाचल समृद्ध असून हत्ती, गवा, वाघ, चित्ता, हरिण, ताकिन, अस्वल, रानमेंढा, कस्तुरीमृग, पांडा, लामाचित्ता हे प्राणी येथे आढळतात. मिथुन व गयाल हे दोन प्राणी अरुणाचलमध्ये विशेष महत्त्वाचे मानतात. वस्तुविनिमयासाठी त्यांचा उपयोग होतोच पण धार्मिक दृष्ट्याही ते महत्त्वाचे आहेत.

 

इतिहास व राज्यव्यवस्था : अरुणाचलचा इतिहास फारसा ज्ञात नाही. अतिशय डोंगराळ व घनदाट अरण्ये असलेला मुलूख, दुर्गम रस्ते, अवखळ द्रुतवाह, अत्यंत मागासलेले रानटी लोक इत्यादींमुळे या भागावर सुरळीत शासकीय अंमल कधीच चालू शकला नाही. जमातप्रमुखच जमातीचा कारभार पाहत असत. आसामबरोबर या जमाती ब्रिटिशांकडे आल्या. या लढाऊ जमातींकडून उपद्रव पोहचू नये म्हणून ब्रिटिशांनी येथे काही ठाणी उभारली तथापि महसूल गोळा करण्यापलीकडे या भागात ब्रिटिश शासनालाही फारसे स्वारस्य नव्हते. २० व्या शतकाच्या सुरुवातीस उत्तरेकडील प्रदेशावर चीनने हक्क सांगितल्यामुळे ब्रिटिश सरकारने या भागाचा वेगळा शासकीय उपविभाग बनविला. हिमालयाच्या शिखररेषेनुसार उत्तरेची हद्द १९१२-१३ साली सर हेन्‍री मॅक्मोहन यांनी योजिली. तथापि चीनने या मॅक्मोहन-रेषेस अधिकृत मान्यता दिली नसल्याने अरुणाचलचा उत्तर भाग नेहमी वादग्रस्त राहिला. १९५९ साली व १९६२ साली  चीनने या भागावर आक्रमण केले. १९६३ साली चीनकडून हा भाग परत मिळाला असला, तरी भारत-चीन-तणावामध्ये या प्रदेशाला मोठा धोका असल्याने अरुणाचलवर भारत सरकारला विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

 

शासनाच्या सोयीसाठी अरुणाचल प्रदेश कामेंग (मुख्य शहर बोमदिला), सुबनसिरी (झिरो), सियांग (अलाँग), लोहित (तेजू) व तिराप (खोनसा) या जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. राष्ट्राध्यक्षांचे प्रतिनिधी म्हणून आसामचे राज्यपाल या प्रदेशाचा कारभार पाहतात. पूर्वी हा भाग आसामराज्यांतर्गत होता परंतु शासन मात्र मध्यवर्ती सरकारच्या गृहखात्यातर्फे चाले. २० जानेवारी १९७२ नंतर आसामच्या राज्यपालांकडे कारभार येऊन ते अरुणाचल प्रदेशावर एजन्सी कौन्सिलच्या सल्ल्याने शासन चालवितात. या प्रदेशातून निवडून गेलेले खासदार आणि पंचायत समित्यांचे प्रतिनिधी यांनी मिळून बनविलेले हे मंडळ राज्यपालांना सल्ला देण्यासाठी असून, दिल्ली महानगरपालिकेच्या धर्तीवरच अरुणाचल प्रदेशाचा कारभार चालविण्याच्या योजना आहेत.

 

आर्थिक स्थिती : अत्यंत मागासलेल्या राज्यांपैकी हे एक असून यामधील ९७% लोक ग्रामीण भागात राहतात. पासिघाट (लोकसंख्या ५,११६), बोमदिला (३,१७२), अलाँग (४,८१८) व तेजू (४,१८२) हीच काय ती या राज्यातील शहरे. साहजिकच शेती आणि जंगलावर आधारित उद्योग हे येथील लोकांचे महत्त्वाचे उद्योगधंदे होत. यांशिवाय शिकार, मच्छीमारी, विणकाम आदी उद्योगधंदेही येथेच बऱ्‍याच प्रमाणात आढळतात. शेती अत्यंत मागासलेल्या पद्धतीने केली जाते. अद्याप बैल व नांगर हेही या राज्यातील बऱ्‍याच लोकांना माहीत नाहीत. पायऱ्‍या-पायऱ्‍यांची शेती आणि झूमिंग अथवा फिरती शेती ही येथील वेशिष्ट्ये. शेतीवर बायका पुरुषांच्या बरोबरीने वाटा उचलतात. अरुणाचलमधील स्त्री-कामगारांपैकी ९७·६% स्त्री-कामगार शेतीवर काम करीत असल्याची नोंद आहे. या प्रदेशात एकूण सु. एक लाख हेक्टर जमीन लागवडीखाली असून भात, मका, नाचणी, रताळी ही येथील प्रमुख पिके होत. एकूण कामगारांपैकी ८३·९२% शेती, २·२२% शेतमजूरी व १३·८६% इतर उद्योगांत आहेत. येथे निकेल, कोबाल्ट, तांबे व गंधक यांचे साठे मोठ्या प्रमाणावर असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते अद्याप किफायतशीर नाहीत. येथील जंगलसंपत्ती मोठी असून १९७१ साली त्यापासून सरकारला १·४ कोट रुपयांच्या वर उत्पन्न मिळाले होते. प्रशिक्षण देणे व उत्पादननिर्मिती यांसाठी शासनाने २१ केंद्रे काढली असून तेथे कताई, विणाई, कटाई, शिवणकाम, सतरंजी बनविणे, वेतकाम, सुतारकाम, बांबूकाम, रेशीमकाम, भांडी तयार करणे इ. लघुउद्योग चालतात. हल्ली भात सडण्याची गिरणी, तेलाची गिरणी, प्लायवूडचा कारखाना व लाकूड कापण्याच्या गिरण्या यांची या प्रदेशात भर पडली आहे. ४३ समूह-विकास-प्रकल्प आणि ९७ सहकारी संस्था यांच्या साहाय्याने शासनाने येथील लोकांना उन्नत करण्याच्या योजना आखलेल्या आहेत. परंपरागत चालत आलेल्या विणकाम व कलापूर्ण वस्तुनिर्मिती या उद्योगांस या सहकारी संस्थांमार्फत मोठी चालना देऊन, आंतरराज्यीय व्यापारपेठेत त्यांचा शिरकाव करण्याच्या योजना आहेत. उठावदार आकृतिबंधांच्या व ओजस्वी रंगांतील वस्तू, नक्षीदार लाकडी वस्तू, टंकचित्रे, चांदीचे दागिने, कातडी वस्तू यांबाबत अरुणाचल प्रदेशातील कारागीर प्रसिद्ध आहेत. डोंगराळ प्रदेशामुळे वाहतूक ही या प्रदेशातील मोठी अडचण. तथापि जीप जाऊ शकणारे सु. ५०० किमी. चे मार्ग येथे तयार करण्यात आले असून, खेचरे जाणारे मार्ग व पायवाटा यांमध्ये सुधारणा होत आहेत.

 

 लोक व समाजजीवन : १९६१–७१ या दशकात अरुणाचलची लोकसंख्या ३२·१४ टक्क्यांनी वाढली. १९६१ च्या जनगणनेनुसार अरुणाचलमध्ये ८२ विविध अनुसूचित जमाती होत्या आणि १९७१ च्या लोकसंख्येपैकी ७९·०१% लोक आदिवासी होते. मंगोलॉइडवंशीय, मध्यम बांध्याचे, अधिकतर मध्यमकपालाचे हे आदिवासी लोक प्रामुख्याने हिंदू असून जडप्राणवादी आहेत. त्यांच्यात बौद्ध, ख्रिश्चन व इस्लामधर्मीयही थोड्याफार प्रमाणात आढळतात. मोनपा, शेर्डूकपेन, बांगनी, अका, खोवा, मिजी, सुलूंग, बांगरो या कामेंग जिल्ह्यातील तागिन, डफला, निशांग, अपातानी, बांगरो, मीकीर, सुलुंग या सुबनसिरी जिल्ह्यातील आदी, खांबा, मेंबा, इदुमिशमी या सियांग जिल्ह्यातील पदम, मिशमी, इदु, मिजी, सिंगफो, खाम्पटी या लोहित जिल्ह्यातील आणि नॉक्टे, सिंगफो, तांगसा, योबीन, वांचो या तिराप जिल्हातील काही प्रमुख जमाती होत. सामान्यतः या जमातींमध्ये आंतरजातीय विवाह होत नाहीत. बहुपत्नीकत्वाची चाल ह्यांच्यात आहे. जमात-प्रमुख व जमातीच्या पंचायती यांच्यामार्फत यांचे सामाजिक प्रश्न सोडविले जातात. या लोकांची घरे बांबूची असतात राहणी साधी असते व पूर्वापार चालत आलेले आचार हे लोक सोडण्यास तयार नसतात. बायकांना गोंदवून घेण्याची व दागिन्यांची हौस असते. वधूशुल्काची चाल येथे आढळते. जादूटोण्याचा प्रभाव जमातींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. संगीत व नृत्य यांची आवड सर्वत्र आढळते या लोकांची नृत्ये, विशेषतः जोमदार समरनृत्ये आणि समूहनृत्ये प्रसिद्ध आहेत. बहुतेक वस्ती नद्यांकाठी असून डोगराळ भागात विरळ लोकवस्ती आहे. राज्यात विविध ५० भाषा व बोलीभाषा बोलल्या जातात. १९७१ च्या जनगणनेनुसार या प्रदेशाची साक्षरता ९·३४% असून १९६९-७० साली येथे एकूण ५७१ शिक्षणसंस्था होत्या त्यांत ७ उच्च माध्यमिक, ५६ माध्यमिक, ५०६ प्राथमिक शाळा, एक महाविद्यालय व एक शिक्षक-प्रशिक्षण-संस्था होती. याच वर्षी पहिली ते चौथी २०,५४०, ५ वी ते ८ वी १,३४१ व ९ वी ते ११ वी २११ मुले शिक्षण घेत होती. असमिया, हिंदी व मातृभाषा या शाळांतून शिकविल्या जातात. चौथ्या पंचवार्षिक योजनेत शिक्षणावर २०५·१८ लाख रुपये खर्च करून अगदी सीमेपर्यंत शाळा उघडण्याच्या शासनाच्या योजना आहेत. १९७०-७१ साली प्रदेशात एकूण ११५ रुग्णकेंद्रे, १५६ डॉक्टर, १२६ परिचारिका व ४१ गुरांचे दवाखाने होते. देवी, क्षय इ. रोगांच्या निवारणासाठी विशेष पथके कार्य करीत आहेत.

 

अनेक जमाती, अनेक भाषा, अत्यंत मागासलेले व परंपरेला चिकटून राहणारे लोक, डोंगराळ व जंगलमय प्रदेश, दळणवळणाची अपुरी साधने अशा परिस्थितीतही चीन व ब्रह्मदेशाला लागून असल्यामुळे अरुणाचल प्रदेशाच्या विकासाचे प्रयत्न चालू आहेत. भारत सरकारच्या संरक्षणखात्यातर्फे या प्रदेशात स्थायी स्वरूपाची ठाणी निर्माण करण्यात आली असून, त्यांच्याकडे विकासाचेही काम दिले असल्याने काही वर्षांतच अरुणाचल प्रदेशाचा कायापालट होईल असे म्हटले जाते.

 

शाह, र. रू.