कोल्हटकर, श्रीपाद कृष्ण: (२९ जून १८७१–१ जून १९३४). मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्‍मयसमीक्षक. जन्म विदर्भातील बुलढाण्यास. अकोला, पुणे आणि मुंबई येथे बी.ए., एल्एल्. बी. पर्यंतचे शिक्षण. व्यवसाय वकिलीचा. त्यांनी आपल्या वाङ्‍मयसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला. संगीत वीरतनय (१८९६) हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी मूकनायक (आवृ. तिसरी, १९२२, प्रथम प्रयोग १९०१), गुप्तमंजूष (१९०३), मतिविकार (१९०७), प्रेमशोधन (१९११), वधूपरीक्षा (१९१४), सहचारिणी (१९१८), जन्मरहस्य (१९१८), परिवर्तन (आवृ. दुसरी, १९२३), शिवपावित्र्य (१९२४), श्रमसाफल्य (१९२९) आणि मायाविवाह (१९४६) ही नाटके लिहिली. उपर्युक्त बारा नाटकांपैकी पहिली आठच रंगभूमीवर आली. ‘साक्षीदार’ हा त्यांचा पहिला विनोदी लेख विविधज्ञानविस्तारात प्रसिद्ध झाला (१९०२). सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे (१९१०) हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह. त्याची तिसरी आवृत्ती सुदाम्याचे पोहे- अर्थात साहित्य बत्तिशी  ह्या नावाने प्रसिद्ध झाली (१९२३). त्यांचे समीक्षालेख, अध्यक्षीय भाषणे, निबंध कोल्हटकरांचा लेखसंग्रह (१९३२) ह्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. दुटप्पी की दुहेरी (१९२५) आणि श्यामसुंदर (१९२५) ह्या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत. गीतोपायन (१९२३) हा त्यांचा कवितासंग्रह. ‘बहु असोत सुंदर संपन्न’ ह्या सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताचे ते जनक आहेत. साधारणपणे १९२० पर्यंतच्या त्यांच्या जीवनाचा आढावा त्यांनी आपल्या आत्मवृत्तात (१९३५) घेतला आहे. भारतीय ज्योतिर्गणित (१९१३) ह्या ग्रंथातून त्यांच्या ज्योतिर्गणितविषयक व्यासंगाचा प्रत्यय येतो.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

कोल्हटकरांचे नाव घेतले जाते ते मुख्यत: नाटककार, विनोदकार आणि वाङ्‍मयसमीक्षक म्हणून. त्यांची नाटके जरी त्यांच्या हयातीतच रंगभूमीवर नाहीशी झाली, तरी त्यांचा मराठी नाट्यलेखनावर झालेला परिणाम दुर्लक्षणीय नाही. त्यांच्या पदरचनेने ज्याप्रमाणे रंगभूमीवरील संगीताला वेगळे आकर्षक वळण लावले, त्याचप्रमाणे त्यांच्या संवादलेखनाने मराठी नाटकांतील संवादांमध्ये खटकेबाजपणा आणि कोटित्व आणले. आपल्या असाधारण कल्पकतेच्या साहाय्याने नाट्यसंवादांतून आणि विनोदी लेखांतून त्यांनी जी विरुद्धकल्पना–न्यासात्मक चमकदार वाक्यरचना–रूढ केली, तिला त्यांच्या हयातीत गडकऱ्यांनी व त्यानंतर प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे इत्यादींनी सुरूप प्राप्त करून दिले. त्यांचे सुदाम्याचे पोहे… हे पुस्तक हा मराठीचा बहुमोल वाङ्‍मय ठेवा आहे. त्यात संगृहीत झालेल्या त्यांच्या उपहासगर्भ व विनोदी लेखनाने एका अभिनव वाङ्‍मयप्रकाराला आणि लेखनपरंपरेला जन्म दिला. गडकरी, चिं.वि. जोशी, अत्रे, पु.ल. देशपांडे इ. विनोदी लेखक याच परंपरेतील. कोल्हटकरांचे सुदाम्याचे पोहे… मधील लेखन असामान्य कल्पनाविलास व कोटित्व यांच्याबरोबच समाजचिंतनातून जन्माला आलेल्या सामाजिक सुधारणांविषयीच्या पुरोगामी भूमिकेतून स्फुरलेले असल्यामुळे ते जितके रंजक तितकेच विचारप्रवर्तक ठरले. सुदाम्याचे पोहे… मध्ये संगृहीत झालेल्या लेखांची संख्या बत्तीसच असली, तरी त्यांतून प्रकट होणाऱ्या उपहासविषयांची व्याप्ती फार मोठी आहे. धर्मव्यवहार, सार्वजनिक जीवनव्यवहार, वाङ्‍मयव्यवहार ह्या आणि महाराष्ट्र समाजजीवनाच्या इतर अनेक व्यवहारांचे कोल्हटकरांनी त्यामध्ये विनोदगर्भ व उपहासगर्भ परीक्षण केले आहे. कोल्हटकरांचे वाङ्‍मयसमीक्षात्मक लेखन प्रत्येक प्रश्नाचा खोलवर जाऊन शास्त्रशुद्धपणे विचार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचे निदर्शक आहे. ह्या वृत्तीतून ते समग्र लेखन झालेले असल्यामुळे तद्वारा कोल्हटकरांनी मराठी वाङ्‍मयविचाराला भरभक्कम असे तात्त्विक अधिष्ठान प्राप्त करून दिले. पुस्तकपरीक्षणे, ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे व खास लिहिलेले अभ्यासलेख यांमधून त्यांनी जे मूलभूत स्वरूपाचे वाङ्‍मयीन प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले व त्यांची जी शास्त्रीय काटेकोरपणे चर्चा केली, त्यामुळे मराठी वाङ्‍मयविचाराला योग्य दिशा मिळाली. त्यांच्या असाधारण कल्पकतेला व्यासंगाची, शास्त्रीय दृष्टीची, शिस्तप्रियतेची व परिश्रमशीलतेची सतत जोड मिळाल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत भारदस्त व प्रभावी ठरले आणि म्हणूनच विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत कोल्हटकर ही केवळ एक व्यक्ती न राहता ती संस्था बनली.

त्यांनी केलेल्या साहित्यसेवेबद्दल त्यांना १९२२ साली पुण्यास भरलेल्या द्वितीय कविसंमेलनाचे अध्यक्षपद व १९२७ साली पुण्यासच भरलेल्या महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. सांगली येथे भरलेल्या तृतीय ज्योतिष संमेलनाचेही (१९२०) ते अध्यक्ष होते. पुणे येथे ते निधन पावले.

संदर्भ :  १. कुळकर्णी, वा. ल. श्रीपाद कृष्ण : वाङ्‍मयदर्शन, मुंबई, १९५९.

२. खानोलकर, गं. दे. साहित्य-सिंह श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (जीवन गाथा), मुंबई, १९७२.

कुळकर्णी, वा. ल.

.