धवला : दिगंबर जैनांच्या ⇨ षट्‌खंडागम ह्या सिद्धांतग्रंथावरील सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी टीका. बप्पदेव गुरूने षट्‌खंडागमावर लिहिलेल्या व्याख्याप्रज्ञप्तिनामक टिकेच्या आधारे वीरसेन ह्या विद्वानाने धवलेची रचना केली. वीरसेनाचा हा टीकाग्रंथ इ. स. ८१६ मध्ये वाटग्रामपूर येथे पूर्ण झाला, असे दिसते. प्राकृत–संस्कृत–मिश्रित ७२ हजार श्लोकांची ही टीका आहे. ह्या टिकेमुळे त्रैलोक्य धवलित झाल्यामुळे हिचे नाव धवला  ठेविले, असे ग्रंथकार म्हणतो. दिगंबर—श्वेतांबर आचार्यांच्या साहित्याचा वीरसेनाने उत्तम व्यासंग केलेला होता. सत्कर्मप्रामृत, मूलाचार, अकलंकांचे तत्त्वार्थभाष्य आदी अनेक दिगंबरपंथीय ग्रंथाबरोबरच श्वेतांबर पंथीयांच्या आयारंग, दसवेयालिय आदी ग्रंथांचा उल्लेख अथवा त्यांतील गाथा धवलेत आढळतात.

वीरसेनाने ठिकठिकाणी दाक्षिणात्य व उदीच्या परंपरांचा उल्लेख केलेला असून दाक्षिणात्य परंपरा (दक्षिण-प्रतिपत्ति) ऋजू आणि आचार्यपरंपरागत मानली आहे.

ही टीका लुप्त झाली, असे मानले जात असे तथापि कर्नाटकात मुडिबिद्री मठात असल्याचे १८८५ पासून जैन यात्रेकरूंना ठाऊक झाले. १९२४ पासून ह्या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती भारतभर पसरल्या.

तगारे, ग. वा.