चंदीदास-बडु : (१४१७ ?—१४७७ ?). प्राचीन बंगाली वैष्णव कवी. त्याचा काळ व जीवन यांबद्दल मतभेद आहेत तथापि जयानंदाचे चैतन्यमंगल, कृष्णदास कविराज याचे चैतन्यचरितामृत  आणि बसंतरंजन राय यांना विष्णुपूर येथे सापडलेली श्रीकृष्णकीर्तन  नावाची पोथी यांवरून चंडीदासाबाबत काही माहिती मिळते. १९१७ मध्ये त्यांनी ही पोथी प्रसिद्ध केली. सु. पंधराव्या शतकात चंडीदास होऊन गेला. बीरभूम जिल्ह्यातील नान्नूर (नांदूर, नानोर असेही पर्याय) गावी तो जन्मला. पित्याचे नाव दुर्गादास बागची. बांकुडा जिल्ह्यातील छातना हे चंडीदासाचे जन्मस्थान, असेही एक मत आहे. ही दोन्ही ठिकाणे केंद्रे समजून चंडीदासाबद्दल बऱ्याच दंतकथा प्रचलित आहेत. तो ब्राह्मण होता व अविवाहित राहिला. वरील ‘भणिता’ युक्त (स्वतःचा नामोल्लेख करून लिहिलेले काव्य) पोथीत कवीने स्वतःला कोठे नुसते चंडीदास, कोठे ‘बडु’ चंडीदास तर कोठे ‘अनंत बडु’ चंडीदास असे म्हटले आहे. बडू म्हणजे मंदिरातील सेवक किंवा दुय्यम पुजारी. 

चंडीदास देवी विशाली किंवा विशालाक्षाची (बाशुलीचा) पुजारी होता. विशाली हे सरस्वतीचे रूप समजले जाते. विशालीच्या मंदिरात सेविका म्हणून असलेल्या रामी (तारा किंवा रामतारा अशीही नावे आढळतात) नावाच्या धोब्याच्या मुलीच्या प्रेमात तो सापडल्याची एक आख्यायिका आहे. ती खरी, की चंडीदासाने त्याच्या साधन-भजनाचे रूपक म्हणून ‘रामी’ हा शब्द उपयोजिला होता, याबद्दल विद्वानांत तीव्र मतभेद आहेत. ते काहीही असेल, तरी रामीस अनुलक्षून चंडीदासाने काही पदे रचिलेली आहेत, हे मात्र खरे.

श्रीकृष्णकीर्तन (सु. १४३३) हे बडू चंडीदासाचे श्रेष्ठ काव्य. त्याखेरीज त्याने काही पदावल्याही रचिल्या. श्रीकृष्णकीर्तनाचे जन्मखंड, तांबूलखंड, दानखंड, नौकाखंड, भारखंड, वृंदावनखंड, कालियादमनखंड, यमुनाखंड, हारखंड, बालखंड, बंसीखंड, राधाविरहखंड असे विविध भाग पाडलेले आहेत. बडू चंडीदासांची राधिका ही एक स्वतंत्र निर्मिती आहे. या काव्याची भाषा व रस लक्षात घेता, ते चैतन्यपूर्वकालीन असल्याचे दिसते. श्रीकृष्णकीर्तनाची भाषा इतकी जुनी आहे, की चर्यागीताखेरीज अशी जुनी भाषा बंगाली साहित्यात अन्यत्र आढळत नाही. श्रीकृष्णकीर्तनात १२५ संस्कृत श्लोक सापडले असल्याने चंडीदासाचे संस्कृतचे पांडित्य सिद्ध होते. हे काव्य नुसते वर्णनात्मक नाही त्यात नाट्यगुणही विशेषत्वाने आढळतात. चंडीदास वर्षाऋतूचा कवी. त्याच्या काव्यात वर्षाऋतूची सुरेख वर्णने आहेत. श्रीकृष्णकीर्तन  बंगालीत ‘पांचाली’ म्हणून गायिले जात असे आणि नाट्यगीत या दृष्टीने ते अभिनीतही होत असे.

अभ्यासकांच्या मते तीन चंडीदास होऊन गेले. तीन की दोन, याबद्दलही मतभेद आहेत. त्याचप्रमाणे चंडिदास हे व्यक्तीचे नाव, की चंडीसेवकाचे नामाभिधान याविषयीही दुमत आहे. बडू चंडीदास व पदावलीकार चंडीदास हे निरनिराळे असून पहिले चैतन्यपूर्वकाली आणि दुसरे चैतन्योत्तरकाली होऊन गेले, हे निश्चित.

संदर्भ : Sen, Sukumar, Chandidas, New Delhi, 1971.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)