लातूर शहर : मराठवाड्यातील सुप्रसिद्ध व्यापारी पेठ व त्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय,  लोकसंख्या १,१२,०००  (१९८१). ते मांजरा आणि तावरजा नद्यांच्या  खोऱ्यात उस्मानाबाद व 

सोलापूर यांच्या ईशान्येस अनुक्रमे ६२ किमी. व १२९ किमी. सोलापूर – नांदेड महामार्गावर वसले आहे. 

गंजगोलाई बाजारपेठ, लातूर

   

मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-बार्शीकडून येणाऱ्या अरुंदमापी लोहमार्गाचे ते अंतिम स्थानकही आहे. लातूर शहराला प्राचीन ऐतिहासिक परंपरा आहे  परंतु तत्संबंधी फारसे पुरावे उपलब्ध नाहीत. ह्या प्रदेशावर बादामीच्या चालुक्यांचे काही काळ आधिपत्य होते. चालुक्यांचे मांडलिक राष्ट्रकूट यांचा पहिला ज्ञात राजा दंतिदुर्ग ह्याचे मूलस्थान लातूर असल्याचे उल्लेख कोरीव लेखांतून मिळतात. त्यांत लातूरचा उल्लेख लट्टलूर असा केला आहे. पुढे राष्ट्रकूटांचा राजा पहिला अमोघवर्ष (सु.  ८०८ -८८०) याच्या आधिपत्याखाली ते काही वर्षे होते. त्यानंतर हे नगर उत्तर चालुक्यकालीन पहिला सोमेश्वर,  सहावा विक्रमादित्य व तिसरा सोमेश्वर यांच्या आधिपत्याखाली होते. या काळातील तिसऱ्या सोमेश्वराच्या इ. स. ११२८ च्या कोरीव लेखात लातूरचा लट्टलूर असाच उल्लेख आढळतो. त्यानंतर हा प्रदेश देवगिरीच्या यादवांनी घेतला. यादवांच्या पतनानंतर तो मुसलमानांच्या ताब्यात गेला. यावर पुढे इ.स. पंधरा ते सतराव्या शतकांत अनुक्रमे आदिलशाह,  मोगल व निजामशाह यांचे वर्चस्व होते. पुढे १७२४ मध्ये निजाम उल्-मुल्क याने मोगल सेनापती मुबारीझ खान याचा पराभव करून स्वतंत्र ⇨ हैदराबाद संस्थान स्थापले. संस्थान विलीन होईपर्यंत लातूर शहर हैदराबादच्या अंमलाखाली होते. पुढे ते राज्यपुनर्रचनेनंतर मुंबई राज्यात आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आले.   

  

हे मराठवाड्यातील एक औद्योगिक शहर असून येथे अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. विविध शेतमालाची घाऊक बाजारपेठ येथे असून कापूस, उडीद, ज्वारी, भुईमूग, हरभरा यांचा व्यापार चालतो. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची वसाहत येथे असून तीत तेलाचे बरेच कारखाने आहेत. यांशिवाय भुईमुगाच्या तेलापासून वनस्पती तूप तयार करण्याचा एक मोठा कारखाना आहे. सुती व लोकरी कापड विणण्याचा आणि कातडी कमावण्याचा तसेच पादत्राणे बनविण्याचा एक कारखाना आहे. यांशिवाय येथे एक कागद तयार करण्याचा कारखाना असून पोलादी व पितळी भांडे बनविण्याचे छोटे उद्योग चालतात. कापूस पिंजण्याचा व दाबणीचा मोठा कारखाना येथे आहे. कापसापासून सूत तयार करण्याचे उद्योगही येथे चालतात. सहकारी तत्त्वावर चालणारा येथे एक साखर कारखाना असून शहरातील औद्योगिक कार्यक्षेत्रात रंग, खिळे, बादल्या, साबण तसेच घायपातापासून दोरखंड आणि औषधे बनविण्याचे छोटे उद्योग आहेत.   

गंजगोलाई ही शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असून तिचे बांधकाम दुमजली व वर्तुळाकार आहे. चाकाच्या आऱ्याप्रमाणे अकरा रस्त्यांनी शहराच्या इतर भागांशी ती जोडलेली आहेत. गंजगोलाई बाजारपेठेत मालाच्या प्रकारानुसार दुकानांचे स्वतंत्र गाळे असून काही भागांना वस्तूंच्या नावावरून विशिष्ट नावे प्राप्त झालेली आहे.  

लातूरची नगरपरिषद अवर्गीय असून तिची १९३५ मध्ये स्थापना झाली. लातूर नगराची रचना सुबद्ध आणि रेखीव असून शहरातून दगडांची बंदिस्त पक्की गटारे आहेत व घाण काढण्यासाठी जागोजागी मलवापीची योजना केली आहे. लातूरपासून सु.१० किमी. अंतरावर मांजरा नदीवर साई गावात पिण्याच्या पाण्याची विहीर असून तेथून शहराला नळावाटे पाणी पुरविले जाते. शहरात चार शासकीय रुग्णालये, आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रे आणि नगरपरिषदेचा दवाखाना व तीन प्रसूतिगृहे असून यांतून ४८ डॉक्टर व ११७ परिचारिका काम करीत होत्या (१९८८). यांशिवाय एक मोठा जनावरांचा दवाखाना व एक क्षय आरोग्यभवन आहे. शिवाय अनेक खासगी दवाखाने व रुग्णालये असून कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेली दोन शासकीय केंद्रे आहेत (१९८९).

  लातूर हे मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर मानण्यात येते. त्याची तुलना शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत पुण्याशी करतात. शहरात अकरा प्राथमिक विद्यालये, दोन उच्च माध्यमिक विद्यालये, सहा माध्यमिक विद्यालये आणि नऊ महाविद्यालये असून यांपैकी प्राथमिक विद्यालये जिल्हा परिषदेतर्फे चालविले जातात आणि दोन माध्यमिक शाळा शासकीय आहेत. शास्त्र, वाणिज्य व कला शाखांची सुविधा असलेली तीन महाविद्यालये असून बसवेश्वर अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालये तसेच परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण देणारी एक संस्था आहे. याशिवाय शासकीय तंत्रनिकेतन आणि पशु वैद्यकीय महाविद्यालय येथे आहे. शासनाने स्वतंत्र कृषि विद्यापीठास १९८९ मध्ये मान्यता दिली असून त्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. शहरात तीन ग्रंथालये असून नगरपरिषदेचे ग्रंथालय मोठे व सुसज्ज आहे.

  लातूरला सिद्धेश्वर, रामलिंगेश्वर, पापविनाश-भुतेश्वर, राम, केशवराज दत्त आणि अंबाबाई अशी सात मंदिरे असून त्यांपैकी दत्त आणि अंबाबाई यांची मंदिरे विशेष लक्षणीय नाहीत. सिद्धेश्वर व रामलिंगेश्वर ही मंदिरे ताम्रध्वज या पौराणिक राजाच्या वेळी बांधली, अशी वदंता आहे. सिद्धेश्वर हे ग्रामदैवत गावाच्या वायव्येस अर्ध्या किमी. वर दगडी प्राकारात वसले आहे. सभामंडपातील मूर्तिसंभारात चतुर्भुज नारायणाची लक्ष्मीसहित मूर्ति लक्षणीय आहे. सिद्धेश्वराची यात्रा महाशिवरात्रीत भरते आणि पंचक्रोशीतील हजारो लोक दर्शनास येतात. पापविनाश-भुतेश्वर हे उत्तर चालुक्यकालीन मंदिर चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर (कार.११२६-३८) याच्या कारकीर्दीत बांधले गेले असावे. मंदिरातील एका कोरीव लेखात या घराण्यातील काही राजांची नावे असून त्यात शक १०४९ हा उल्लेख आहे. केशवराज मंदिर हेमाडपंती शैलीत बांधले आहे. त्यातील विष्णूची वालुकाश्मातील मूर्ती लक्षवेधक आहे. गावातील हजरत सुरत शाहवली दर्गा प्राचीन आहे. 

   देशपांडे, सु. र.