भृगु : एक अतिप्राचीन महर्षी व वैदिक सूक्तद्रष्टा. कृत्रिम रीत्या अग्नी निर्माण करण्याचा शोध प्रथम याने लावला, असे उल्लेख आढळतात. ‘अग्नीचा आवाज’ वा ‘ज्वाला’ या अर्थाच्या ‘भृग्‌’ या संस्कृत शब्दापासून तसेच भ्रस्ज (भाजणे), भृज (भाजणे) वा भ्राज्‌ (प्रकाशणे) या संस्कृत धातूंपासून हा शब्द बनल्याचे सांगितले जाते. प्रजापतीच्या अग्नीत पडलेल्या वीर्यापासून त्याचा जन्म झाल्यामुळे त्याला अग्नीज हे नाव मिळाल्याची कथा आढळते. कून आणि बार्थ याच्या मते भृगू म्हणजे विद्युत्‍देवता, तर बर्गेनीच्या मते भृगू म्हणजे अग्नी होय. काही पश्चिम विद्वानांनी फ्लेग्यस आणि फ्लेग्यी या ग्रीक व रोमन देवतांबरोबरही भृगूचा संबंध जोडला आहे. आणखी एका मतानुसार भृगू व भार्गव हे थ्रेसचे अग्निशोधक ब्रुजेस होते. भृगू हा ब्रम्हदेव, इंद्र व प्रजापती यांचा पुत्र असल्याच्या विविध कथा आढळतात. प्रथम मनूने निर्माण केलेले प्रजापती, ब्रम्हदेवाचे मानसपुत्र, सप्तर्षी, देवता इत्यादी मध्येही त्याची घणना होते. वरूण व त्याची पत्नी चर्षणी यांनी त्याचे पोषण केल्यामुळे त्याला वरूणपुत्र, चर्षणीपुत्र अशी नावेही मिळाली. चित्रावशास्त्री यांनी स्वायंभुव मन्वंतरात जन्मलेल्या भृगू प्रजापती आणि अग्नीतून जन्मल्यावर ज्याला वरूणाने दत्तक घेतले, तो भृगू वारूणी भिन्न असल्याचे मानले आहे. काहींच्या मते हे एकाच भृगूचे दोन जन्म होत. भृगू हा स्वायंभुव मनूचा जावई, शंकराचा साडू व दक्षाच्या दोन कन्यांचा पती असल्याचे उल्लेख आढळतात. दक्षकन्या स्वाती ही पत्नी, लक्ष्मी ही कन्या आणि धाता व विधाता हे त्याचे पुत्र असल्याचा उल्लेख आढळतो. हिरण्यकशिपूच्या दिव्या आणि पुलोमा (वा पौलोमी) या दोन कन्या म्हणजे भृगूच्या पत्नी असल्याचेही निर्देश आढळतात. भृगू व पुलोमा यांना बारा देव आणि सात ऋषी असे १९ पुत्र होते. एका मतानुसार त्यांपैकी च्यवन हा पुलोमाचा व बाकीचे दिव्याचे पुत्र होते. भृगूने पाण्यात दडलेला अग्नी शोधला, मातरिश्व्याने त्याच्यासाठी अग्नी आणला, त्याने एकदा अग्नीला शाप दिल्यामुळे तो लपून बसला, इंद्र बनलेल्या नहुषाला शाप देऊन त्याने साप बनविले, दक्षयज्ञाचा विध्वंस झाला तेव्हा शंकरविरोधी असलेल्या त्याची दाढी खेचली गेली वा त्याची हत्या झाली, विष्णूने भृगुपत्नी पुलोमाचा युद्धात वध केल्यानंतर भृगूने विष्णूला गर्भवास पतकरून पृथ्वीवर अवतार घेण्याचा शाप दिला, ब्रम्हदेव व शंकर कसोटीला न उतरल्यामुळे त्याना अनुक्रमे पूजा केली न जाण्याचा व लिंगरूप होण्याचा शाप दिला, विष्णूला छातीवर लाथ मारल्यावरही विष्णूने पाय चेपल्यामुळे तो सर्वश्रेष्ट देव असल्याची घोषणा केली, विष्णूने लाथेची खूण छातीवर श्रीवत्स म्हणून कायमची धारण केली, वीतहव्याला ब्राम्हण करून घेतले इ. प्रकारच्या पुराणकथा त्याच्या संदर्भात आढळतात. गंगा व शरयू यांच्या संगमावरील भृगुआश्रम, भृगूने जेथे तप केले ते भृगुकच्छ वा भडोच, नर्मदेच्या काठावरील भृगुतीर्थ, हिमालय वा विंध्य पर्वातावरील भृगुतुंग हे शिखर इ. स्थानांना भृगूचे नाव मिळाले आहे. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला प्रारंभ करून प्रत्येक वद्य द्वादशीला केल्या जाणाऱ्या एका व्रताला ‘भृगुव्रत’ म्हणतात. वरूणाने भृगूला शिकविलेल्या ब्रम्हविद्येला भृगुविद्या म्हणतात. अथर्ववेदाला ‘भृग्वंगिरस्‌’ असे नाव आहे. तैत्तिरीय उपनिषदातील तृतीय वल्लीला भृगुवल्ली म्हणतात. प्रत्येक व्यक्तीचे भविष्य सांगणारी भृगुसंहिता, भृगुस्मृती, भृगुगीता, भृगुसूत्र, भृगूपनिषद, वास्तुशास्त्रावरील एक पुस्तक इ. ग्रंथ त्याच्या नावावर आढळतात. भृगूने सांगितलेली संहिता हेच सध्याच्या मनुस्मृतीचे स्वरूप आहे.

भृगुकुल : भृगूने प्रवर्तित केलेल्या कुलाला भार्गव भृगुकुल म्हणतात. ऋग्वेदात आलेले भृगूचे बहुसंख्य निर्देश बहुवचनी आहेत. ऋग्वेदात त्यांना सोमप्रेमी पितर मानून देवतांसह सोमपानासाठी आवाहन केलेले असल्यामुळे ते खूप प्राचीन असल्याचे स्पष्ट होते. ते पुरोहित होते. अग्नी निर्माण करण्याचे ज्ञान सार्वत्रिक नव्हते. तोपर्यंत त्यांना देवतांसारखा मान दिला जात होता असे दिसते. भृगू हे द्रविड असावेत, असे अनेक विद्वानांचे मत असून काहींच्या मते ते प्रथम समुद्रमार्गाने दक्षिण भारतात आले. ते दैत्य व दानव यांचे पुरोहित असल्याच्या कथा आहेत. ⇨ दाशराज्ञ युद्धात द्रुह्यू व तुर्वश यांच्याबरोबरच तेही सुदास राजाचे शत्रू तसेच मांडलिक असल्याचा निर्देश आढळतो. भृगुकुलातील अनेकांचे विवाहादी कराणांनी क्षत्रियांबरोबर निकटचे संबंध होते. याउलट परशुराम वगैरेंचे क्षत्रियांबरोबर कमालीचे वैरही होते. या कुलात च्यवन, शुक्र [⟶ शुक्राचार्य], और्व, ऋचीक, ⇨ जमदग्नी,परशुराम, शौनक इ. प्रसिद्ध व्यत्की होऊन गेल्या महाभारतात भृगूंविषयी विविध आख्याने आहेत. कौरव-पांडव-युद्धाचे वर्णन करणारा ग्रंथ हे मूळ भारताचे स्वरूप बदलून त्याला नैतिक व धार्मिक शिक्षण देणाऱ्या महाभारताचे स्वरूप त्यांनीच दिले असावे, असे म्हणतात. त्यांची ऐतशायन नावाची शाखा हीन मानली जात होती, असे दिसते. त्यांच्या अंगिरस, अथर्वन् व ऋभू यांच्या बरोबर नेहमी उल्लेख येतो. ते योद्धे असल्याचा तसेच त्यांच्यावर हल्ला केल्याबद्दल सृंजय वैतहव्य या लोकसमूहाचा नाश झाल्याचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदात त्यांचा रथकार म्हणून जो निर्देश आला आहे, तो सायणाचार्य व रूडोल्फ रोट यांच्या मते ऋभृंचा आहे. ई. सीग यांच्या मते भृगू हे नाव मूळचे कारागिरांना होते आणि लाकूडकाम करणारांनाच प्रथम अग्नीचा शोध लागणे स्वाभाविक असल्यामुळे रथकार भृगूंना अग्नीचा शोध लागला असावा.

साळूंके, आ. ह.