हुबळीकर, शांता : (१४ एप्रिल १९१४–१७ जुलै १९९२). मराठी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात आपल्या अभिनयाने व गायनाने विख्यात झालेल्या अभिनेत्री. कर्नाटकातील हुबळीजवळच्या अदरगुंची या गावी शेतकरी कुटुंबात जन्म. त्यांचे मूळ नाव राजम्मा. त्यांच्या वडिलांचे नाव दोड्डप्पा. वयाच्या तिसऱ्या वर्षी आई-वडिलांचे लागोपाठ निधन झाले, तेव्हा मोठी बहीण नीला (नीलम्मा) लग्न होऊन सासरी गेली होती, तर धाकटी बहीण शारदा फक्त अकरा दिवसांची होती. या पोरक्या पोरी आईच्या आईकडे म्हणजे आजीकडे वाढत असताना मोठा दुष्काळ पडला. या मुलींना पोटभर खाऊपिऊ घालणे अशक्य वाटल्याने आजीने मुलींना हुबळीला आपल्या विधवा शेतमालकिणीकडे – सावित्राक्काकडे – पाठविले. सावित्राक्का निपुत्रिक असल्यामुळे चंद्राक्का या दत्तक मुलीसह तेथील एका चिरेबंदी वाड्यात राहत असे. तिने राजम्माचे नाव ‘शांता’ ठेवले. मुलींना प्रेमाने वाढविले. इथे शांताला शालेय शिक्षण, स्वयंपाकादी गृहकृत्यांचे शिक्षण व ⇨ अब्दुल करीमखाँ साहेबांकडून चार वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण लाभले. सावित्राक्काने वृद्धत्वामुळे चंद्राक्का व जावई चन्नप्पा यांच्या हाती जमीनजुमल्याचा सर्व कारभार सोपविला. सुशिक्षित, काळ्यासावळ्या

शांता हुबळीकर
 

व अनाथ शांताचे लग्न जमेना, तेव्हा चंद्राक्काने एका पंच्याहत्तर वर्षांच्या वृद्धाशी शांताचे लग्न लावून देण्याचे ठरविले. अंबू या जिवलग शालेय मैत्रिणीकडून ही बातमी कळताच शांता अंबूच्या पतीच्या साहाय्याने घरातून निसटली आणि त्यांच्याच शिफारशीने गदग येथे ‘गुब्बी’ या नाटक कंपनीत काम करू लागली (१९३०). त्यामुळे तिचे राहणे, जेवण व पगार यांची सोय झाली. पुढे त्यांना १९३० नंतर नाटकात थोड्या महत्त्वपूर्ण भूमिका मिळू लागल्या. कंपनीचा मुक्काम हुबळी, बेळगाव येथे असताना बेळगावमध्ये त्यांच्या खोलीशेजारी शांता बेहेरे नावाची मुलगी वासुदेवराव शिंदे या केशवराव भोसल्यांच्या जावयाच्या मार्गदर्शनाखाली पेटी शिकत होती. तिथे त्यांनी शांताबाईंचा आवाज ऐकून त्यांची शिफारस कोल्हापूर सिनेटोनच्या व्यवस्थापकांकडे केली, तेव्हा त्यांना बाबूराव पेंढारकरांच्या कोल्हापूर सिनेटोनमध्ये नोकरी मिळाली (१९३५) आणि त्यांची चित्रपटातील कारकीर्द सुरू झाली. भालजी पेंढारकर या ख्यातनाम दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. भालजींच्या साध्या राहणीचा व वक्तशीरपणाचा त्यांनी अंगीकार केला. कान्होपात्रा या चित्रपटात त्यांनी कान्होपात्रेच्या आईची भूमिका केली. इथे दिनकर कामण्णा, चिंतामणराव कोल्हटकर आदींकडून त्यांना अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या. १९३७ मध्ये त्या ⇨ प्रभात फिल्म कंपनीमध्ये रुजू झाल्या आणि इथेच त्यांना अमाप लोकप्रियता व वैभव मिळण्यास सुरुवात झाली. त्यांची परीक्षा घेतली ⇨ व्ही. शांताराम व प्रभातमधील इतर बड्या मंडळींनी. त्या वेळी माझा मुलगा (हिंदी मेरा लडका) दिग्दर्शित करणारे के. नारायण काळे यांनी त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊनत्यांना नायिकेची भूमिका दिली. त्यांनी हिंदी-मराठी शब्दोच्चार सुधारत ती भूमिका साकारली. नंतर व्ही. शांताराम दिग्दर्शित माणूस (हिंदी आदमी) या चित्रपटाने त्यांना कीर्ती, पैसा व लोकप्रियता मिळवून दिली. व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शकीय संस्कारांमुळे त्यांचा या चित्रपटातील अभिनय उत्कृष्ट झाला. त्यातील त्यांचा अभिनय व गाणी अतोनात गाजली. त्यांनी साभिनय गायिलेले ‘आता कशाला उद्याची बात’ हे बहुभाषी गीत अजरामर ठरले. पुढे व्ही. शांताराम यांच्याशी मतभेद झाल्यावर त्यांना प्रभात फिल्म कंपनी सोडावी लागली. 

 

या काळात पुण्यातील डेक्कन एम्पोरियमचे मालक बापूसाहेब गीते यांच्याशी त्यांचा परिचय झाला. पूर्वविवाहित व वयाने मोठे असलेल्या गीते यांच्याशी त्यांनी विवाह केला (१९३९). गीते यांचे धंद्यात फारसे लक्ष नव्हते आणि कर्जाचा बोजा त्यांच्यावर होता. मात्र शांताबाईआपली प्रतिष्ठा जपत आपल्या परीने चित्रपटांतून काम करीत असत.एम्. व्ही. व्यास यांनी शांताबाईंना मुंबईला बोलावून घेतले व प्रभातया चित्रपटात भूमिका दिली. हा चित्रपट प्रदर्शित झाला (१९४०), त्याच सुमारास त्यांच्या पहिल्या चार महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. दुःख आवरून त्यांनी घरगृहस्थी, जीवननाटक, मालन, विश्राम बेडेकर दिग्दर्शित पहिला पाळणा, घर संसार (१९४२) इ. मराठी चित्रपटांमधून उत्तम भूमिका साकारल्या. तसेच कानडी चित्रपटातही त्यांनी काम केले. त्यांना दुसरा मुलगा झाला (१९४२). त्याचे नाव प्रदीप. पुण्यात त्यांनी ‘प्रदीप’ हा भव्य बंगला बांधला पण नवऱ्याचा कर्जबाजारीपणा, मुलगा प्रदीप याची जबाबदारी यांमुळे बंगला, गाडी सर्व विकून भाड्याच्या खोलीत राहण्याची त्यांच्यावर वेळ आली. १९४५ मध्ये शांताबाईंनी कुलकलंक हा चित्रपट केला. तो त्यांचा नायिका म्हणून अखेरचा चित्रपट. त्यानंतर चरितार्थासाठी शांताबाईंनी १९४५–५७ दरम्यान हैदराबाद, निजामाबाद, दिल्ली, आग्रा, कानपूर, इंदूर, ग्वाल्हेर इ. शहरांतून जलसे केले नाटकांत कामे केली गाण्याचे कार्यक्रम केले. १९५७ मध्ये फिल्मिस्तान कंपनीचे सौभाग्यवती भव व घरगृहस्थी (हिंदी) असे दोन चित्रपट केले पण पुढे तीही कामे मिळेनात. तेव्हा त्यांनी शिकवण्या केल्या आणि प्रदीपचा संसार थाटला पण कुटुंबियांच्या त्रासामुळे त्यांनी स्वतःचे घर सोडून वसईचा श्रद्धानंद वृद्धाश्रम गाठला (१९७४). त्या वृद्धाश्रमात असतानाच गीते यांचे निधन झाले (१९७७). 

 

दै. लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी यांच्या लेखाने विस्मृतीत गेलेल्या शांताबाईंना संजीवनी दिली. सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे त्यांना निवृत्तिवेतन मिळू लागले आणि लोकांनी देणग्यादिल्या. त्यांचा अमृतमहोत्सव संपन्न झाला (१९८९). जागतिक मराठी परिषदेत त्यांचा सत्कार करण्यात आला, तेव्हा त्यांना अनेक जुने सहकलाकार भेटले. अखेर सुनीती पुंगलिया व गडकरी यांच्या साहाय्याने पुणे महिला मंडळाच्या वृद्धाश्रमात शांताबाईंची सोय लागली (१९८९). तिथेच अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी कशाला उद्याची बात हे आत्मचरित्र लिहिले (१९९०). त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी माणूस चित्रपटातील अभिनयासाठीचा बंगाल फिल्म असोसिएशनचा पुरस्कार (१९३९) महत्त्वाचा होय. पुण्याच्या मॉडेल कॉलनीतील ‘दीप’ बंगला हेच त्यांचे स्मारक म्हणावे लागेल. 

 

संदर्भ : हुबळीकर, शांता, कशाला उद्याची बात, आवृ. २ री, पुणे, २००९

कुंटे, माधवी