पटवर्धन घराणे : पेशवाईतील एक निष्ठावंत व कर्तबगार घराणे. हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवड गावचे होय. या घराण्याचा मूळ पुरुष हरिभट पटवर्धन. त्याला कृष्ण, बाळ, त्रिंबक, गोविंद, रामचंद्र, माधव य भास्कर असे सात मुलगे होते. पैकी त्रिंबक, गोविंद व रामचंद्र हे प्रसिद्धीस आले. हरिभट गाव सोडून बहिरेवाडी येथे आला. तेथे त्याचा इचलकरंजीकर घराण्याचे संस्थापक नारो महादेव जोशी यांच्याशी कुलोपाध्याय म्हणून संबंध आला. इचलकरंजीकर व पेशवे यांचे विवाहसंबंधाचे नाते होते. त्यामुळे याचा बाळाची विश्वनाथाशी संबंध आला. गोविंदरावाने इंद्रोजी कदमाकडे काही काळ चाकरी केली आणि पराक्रम गाजवला. इंद्रोजीच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी त्यास त्याच्या सैन्याचे आधिपत्य दिले. अशा रीतीने पटवर्धनांनी मराठी राज्याच्या सेवेस सुरुवात केली. भाऊ रामचंद्रराव याने वसईच्या मोहिमेत मराठ्यांच्या बाजूने मोठा पराक्रम गाजवला.

गोविंदरावाच्या पराक्रमामुळे व स्वामिभक्तीमुळे त्याचे नाव सर्वत्र झाले होते. बाळाजी बाजीरावाने आपले पाच हजारांचे पथक गोविंदरावाच्या स्वाधीन करून त्याची नवीन कामगिरीवर नेमणूक केली. या दोन्ही भावांबरोबर हरिभटाचे आणखी दोन मुलगे–त्रिंबकराव व भास्करराव हेही त्यांना सामील झाले. तसेच पटवर्धनांचा इतर परिवारही पेशव्यांच्या सैन्यात व चाकरीत दाखल झाला. माळवा (१७२८, १७४०), दिल्ली (१७३७, १७३९), बुंदेलखंड (१७४१), गुजरात (१७३१, १७५५) आणि कर्नाटक (सावनूरचा नबाब, हैदर व टिपू यांच्या विरुद्ध) यांत झालेल्या लढायांत पटवर्धन घराण्यातील अनेक पुरुषांनी मोठा पराक्रम करून पेशव्यांना यश प्राप्त करून दिले. त्यामुळे त्याला १७५५ मध्ये नगाऱ्याचा मान देण्यात आला. सदाशिवराव भाऊ व पटवर्धन यांचे एवढे सूत नव्हते. शिवाय गोविंदराव दक्षिणेच्या स्वारीत गुंतल्यामुळे पटवर्धनांपैकी पानिपतच्या लढाईत कोणीही हजर नव्हते. पण भाऊसाहेबाच्या साह्यास जाणाऱ्या बाळाजी बाजीरावाबरोबर पटवर्धन उत्तरेत गेले होते. शिवाय १७५० नंतर दक्षिणेची बाजू मुख्यतः पटवर्धनांनी सांमाळली होती.

पटवर्धन घराण्याने १७४० ते १८०० पर्यंत मराठी राज्यासाठी अतोनात कष्ट घेतले. अनेक लढायांमध्ये ते आघाडीवर होते. ६० वर्षांच्या कारकीर्दीत या घरण्यातील तीस कर्ते पुरुष धारातीर्थी पडले.

रघुनाथराव व माधवराव पेशवे यांच्या भांडणामुले पटवर्धन घरण्यास काही काळ प्रतिकूल गेला. रघुनाथरावाने पटवर्धनांच्या मुख्य ठिकाणावर म्हणजे मिरजेवरच चढाई केली. याचा तात्कालिक परिणाम म्हणजे गोविंदरावाचा मुलगा गोपाळराव निजामाकडे गेला. परंतु पुढे माधवराव पेशव्यांनी पटवर्धनांना आपल्या बाजूस वळवून घेऊन राक्षसभुवन येथे निजामाचा पराभव केला. पेशव्यांनी पटवर्धनांना २५ लाखांचा सरंजाम आणि त्यासाठी मिरज व तुंगभद्रा–कृष्णेमधील प्रांत दिला आणि ८,००० घोडदळ सरकारी तैनातीत ठेवण्याची आज्ञा केली. गोविंदरावाचा मुलगा गोपाळराव आणि रामचंद्ररावाचा मुलगा परशुरामभाऊ हे आपल्या वडिलांसारखेच शूर व कर्तबगार निघाले. भाऊंनी तासगाव येथे आपले वास्तव्य कायम केले.

पटवर्धनांना मोठा सरंजाम मिळाल्यामुळे त्यांचे रजकीय महत्त्व वाढले. कर्नाटकातील हैदर व टिपू यांच्या विरुद्ध झालेल्या लढायांचा सर्व भार त्यांच्यावरच होता. ती कामगिरी पार पाडून त्यांनी कर्नाटक आपल्या ताब्यात ठेवले. १७७१ साली हैदरविरुद्ध झालेल्या स्वारीत गोपाळरावास मृत्यू आला व पुढे काही दिवसांतच गोविंदराव हाही मरण पावला.

नारायणरावाच्या वधानंतर पटवर्धनांनी सवाई माधवरावाची बाजू उचलून घरली. गुजरातच्या स्वारीत गोविंदरावाचा दुसरा मुलगा वामनराव हरिपंत फडक्यांबरोबर होता. तो १७७५ मध्ये मरण पावला. गोविंदरावाचा तिसरा मुलगा यास सरंजाम देऊन कर्नाटकात हैदरविरुद्ध पाठविले. १७७७ च्या सावशीच्या लढाईत तो गंभीर जखमी झाला. या लढाईत पटवर्धनांची फारच हानी झाली. पटवर्धनांपैकी कुरुंदवाडचे कोन्हेरराव पडले आणि गोविंदरावाचा तिसरा मुलगा पांडुरंगराव, श्रीपतराव व वासुदेवराव यांना कैद झाली.

चिंतामणरावाच्या नावे १७८३ मध्ये सरंजाम दिला. १७९०–९२ मध्ये टिपूविरुद्ध झालेल्या लढाईत परशुरामभाऊस महत्त्वाचे स्थान होते. १७९५ च्या खर्ड्याच्या लढाईत चिंतामणराव हजर होते, तर विठ्ठल धोंडो याने खूपच मोठा पराक्रम केला.

दुसऱ्या बाजीरावाने पटवर्धनांचा अनन्वित छळ केला. परशुरामभाऊंना कैदेत टाकले परंतु पटवर्धनांनी मराठी राज्याच्या सेवेत कोणतीच कसूर न करता आपले प्राण वेचले.

खडकीच्या बाजीराव–इंग्रज लढाईत (१८१७), तसेच कोरेगाव व अष्टी या लढायांत (१८१८) पटवर्धनांनी भाग घेतला होता. १८१८ नंतर त्यांनी इंग्रजांचे मांडलिकत्व पतकरले.

कुलकर्णी, गो. त्र्यं.