तंजावर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मद्रास इलाख्यातील पूर्वीचे एक संस्थान. सध्या हा प्रदेश तमिळनाडू राज्यात समाविष्ट झाला आहे. क्षेत्रफळ १२,२७२ चौ. किमी. व लोकसंख्या २५,६३,३७५ (१९४१). पूर्वेस बंगालचा उपसागर, उत्तरेस कावेरीची उपनदी, पश्चिमेस तिरुचिरापल्ली व पुदुकोट्टई, दक्षिणेस रामनाड यांनी सीमित झाले होते. दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हा प्रदेश चोलांच्या अंमलाखाली होता. तेराव्या शतकात येथे होयसळ राजांचा अंमल प्रस्थापित झाला आणि पुढे ते विजयानगरच्या आधिपत्याखाली गेले (१४००–१५६५). विजयानगरच्या अस्तानंतर मदुराईच्या नायकांप्रमाणे तंजावरचे नायकही स्वतंत्र झाले. शेवटच्या विजयराघव नायकाच्या वंशजाने विजापूरची मदत मागितली. ती मदुराईपासून स्वतंत्र झालेल्या अळगिरी नायकाविरुद्ध लढण्याकरिता होती. विजापूरतर्फे शहाजीराजे मदतीस आले. शहाजींनी प्रथम बाल नायकास गादीवर बसविले परंतु पुढे आपणाकडे कारभार घेऊन तिथे हळूहळू मराठे घराण्याचे वर्चस्व स्थापन केले. पुढे शहाजींचा मुलगा व्यंकोजी याने तंजावरची गादी १६७६ मध्ये बळकाविली. शिवाजी महाराजांनी कर्नाटकच्या मोहिमेत व्यंकोजीस हे राज्य मागितले आणि सर्व मराठ्यांचे एक संघटित राज्य करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तंजावरचा मूळ शाखेशी संबंध जवळजवळ तुटला. तंजावरखेरीज व्यंकोजीच्या राज्यात अरणी, पोर्तोनोव्हो व बंगलोरची मोठी जहागीर होती. व्यंकोजीच्या मृत्यूनंतर (१६८४) त्याच्या शहाजी, सरफोजी व तुकोजी या तिन्ही मुलांनी राज्य केले : शहाजीने (१६८४–१७१२) तंजावरहून, सरफोजीने (१७११–२८) सक्कोटाईहून (कुंभकोणम्‌जवळ) व तुकोजीने (१७२८–३६) महादेवीपट्टणहून (मन्नारगुडीजवळ). या काळात मोगलांचा या प्रदेशातील सुभेदार जुल्फिकारखान आणि नंतर अर्काटचे नबाब यांनी तंजावरकडून खंडण्या वसूल केल्या, तर तंजावरने मदुराईकडून काही प्रदेश मिळविला. शहाजीच्या काळात म्हैसूरकडूनही तंजावरला उपद्रव पोहोचला. तुकोजीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाबासाहेब याने वर्षभर आणि पत्नी सुजानबाई हिने दोन वर्षे संस्थानचे राज्य केले. खरी सत्ता तंजावरच्या सय्यद किल्लेदाराकडे होती. त्याने कोयाजी कट्टीगाई यास गादीवर बसविण्याचा घाट घातला पण लोकप्रियतेमुळे तुकोजीचा दासीपुत्र प्रतापसिंह (१७३९–६३) गादीवर आला. कोयाजीला साहाय्य देण्याच्या निमित्ताने फ्रेंचांनी कारिकल (१७३९) तर इंग्रजांनी देवीकोट्टई बळकाविली (१७४९). त्याला प्रतापसिंह विरोध करू शकला नाही. चंदासाहेब व मुहंमद अली यांच्या भांडणात तंजावर स्वाभाविकपणे युद्धक्षेत्र बनले. प्रतापसिंहाने इंग्रजांची बाजू घेतली. १७६२ मध्ये मुहंमद अलीने इंग्रजांच्या मध्यस्थीने तंजावरवर चार लाखांची खंडणी बसविली. प्रतापसिंहानंतर तुळाजी (१७६३–८७) गादीवर आला. त्यास पुत्र नसल्यामुळे दत्तकवारसाबद्दल तंटे होऊन ब्रिटिशांनी अमरसिंगास पाठिंबा दिला. १७६९ मध्ये हैदर अलीने तंजावरकडून चार लाख खंडणी वसूल केली.

तंजावरचा राजा, हैदर अली व मराठे यांच्याबरोबर काही मसलत करीत आहे, या सबबीवर इंग्रजांनी तंजावर १७७३ मध्ये आपल्या ताब्यात घेतले परंतु १७७६ च्या तहाप्रमाणे पुन्हा ते त्यांना परत द्यावे लागले. १७९९ मध्ये सरफोजी राजाने आपला सर्व मुलूख कंपनीच्या हवाली करून राजसंन्यास घेतला. दरम्यानच्या काळात तंजावरचा कारभार मुहंमद अलीचा मुलगा अमीरुल हा पहात असे. सरफोजीला सालीना एक लाख रु. व महसुलाच्या पाचव्या हिश्श्याची नेमणूक देऊन कंपनीने तंजावर खालसा केले. मात्र राजाचा अधिकार फक्त तंजावरचा किल्ला व त्याचा परिसर एवढ्यापुरता मर्यादित ठेवला होता. दुसऱ्या सरफोजीचा गादीवर आलेला पुत्र शिवाजी (१८३३–५५) निपुत्रिक वारल्याने तोही अधिकार पुढे संपुष्टात आला व इंग्रजांनी संस्थान पूर्णतः खालसा केले.

तंजावरचे सर्वच मराठे राजे विद्या-कलांना आश्रय देणारे, संस्कृत-तेलुगू-तमिळ-मराठीतून ग्रंथरचना करून घेणारे, बहुभाषिक, व्युत्पन्न असे होते. व्यंकोजीने तेलुगूत द्विपद रामायण  लिहिले, तुकोजीने संगीत सारामृत  हा दाक्षिणात्य संगीतावरील ग्रंथ लिहिला. शहाजीच्या काळात अनेक तमिळ नाटके लिहिली गेली. त्याने शहाजीपुरम् नावाचे गाव वसविले. त्याला आणि तुळाजीला अद्वैत तत्त्वज्ञानात विशेष रस होता. शहाजीने सरस्वती महाल येथे हस्तलिखितांचा अमूल्य संग्रह केला, तर दुसऱ्या सरफोजीने त्यात भर घातली. या दोघांना स्थापत्यातही रस होता. मनोरा ही आठ मजली इमारत दुसऱ्या सरफोजीने बांधविली. त्याचप्रमाणे दोघांनीही वैद्यकात रस घेतला व त्यावरील ग्रंथरचना करून घेतली. शहाजीने रुग्णालयासाठी दूरच्या प्रदेशांतून वैद्यक-हकीम आणविले, तर सरफोजीने धन्वंतरी महाल या संस्थेतर्फे १८ खंडात्मक एक वैद्यकीय संशोधनावर संशोधनपर ग्रंथ लिहून घेतला. मराठ्यांच्या काळात तंजावरमध्ये धर्मशाळा, अन्नछत्रे होती. सर्व राजे परधर्मसहिष्णू होते. शहाजीने पोर्तुगीजांच्या अन्याय्य धर्मप्रसारास आळा घातला खरा पण प्रतापसिंहाने नागौरला मशीद बांधली. दुसऱ्या सरफोजीस पाश्चात्य वाङ्‌मयात गोडी होती. त्याने काही इंग्रजी ग्रंथ जमविले. त्याला चित्रकला आणि शास्त्रीय ग्रंथांचा छंद होता. त्याने देवनागरी खिळ्यांचा छापखाना काढला होता. एकंदरीत संस्थान ईस्ट इंडिया कंपनीत विलीन होईपर्यंत संस्थानने अनेक सांस्कृतिक क्षेत्रांत स्पृहणीय प्रगती केली होती.

संदर्भ : १. पारसनीस, द. ब. तंजावरचे राजघराणे, मुंबई, १९१२.

            २. वाकसकर, वि. स. तंजावरचे मराठे राजे, बडोदे, १९३३.

कुलकर्णी, ना. ह.