समग्र क्रांति : व्यक्ती आणि समाज यांच्या सर्वांगीण विकासाचा पुरस्कार करणारी विचारप्रणाली. समग क्रांतीचा पहिला उद्गार भारतात ⇨महात्मा जोतिराव फुले (१८२७-९०) यांनी केला आणि समतेचे वारे खेडयपाडयांतून, दसऱ्याखोऱ्यांतून व घराघरांतून वाहू लागले. ⇨कार्ल मार्क्स च्या अगोदर समतेची दृष्टी फुल्यांनी महाराष्ट्रास दिली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक समतेचा दीपस्तंभ समग समाजाच्या मार्गदर्शनासाठी उभा केला. त्यांनी सत्यशोधकी चळवळीव्दारे समग्र समाजक्रांतीच्या युगास प्रारंभ केला मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ही चळवळ अनाथ झाली, उपेक्षित राहिली. शिवाय राजकीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य मिळाल्याने ती मागे पडली. फुल्यांनंतर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समग क्रांतीच्या विचारसरणीला ⇨जयप्रकाश नारायण यांनी व्यापक स्वरूप दिले. भूदान आंदोलनातून फारशी फलनिष्पत्ती होत नाही, असे दिसताच जयप्रकाशांनी १९७० नंतर त्यातून अंग काढून घेतले. देशातील सर्वंकष भष्टाचार, दुबळ्या घटकांच्या विकासाकडे दुर्लक्ष इ. प्रश्नांनी अस्वस्थ होऊन त्यांनी देशाला समग्र क्रांतीची आवश्यकता आहे, ही भूमिका घेतली आणि त्यानुरूप गुजरात राज्यातील राजकीय सत्तांतर व बिहारमधील आंदोलन यांचा पुरस्कार केला. पाटणा ( बिहार ) येथील ५ जून १९७४च्या जाहीर सभेत त्यांनी समग क्रांतीची संकल्पना मांडली. पुढे आणीबाणीच्या काळात (१९७५-७७) त्यांच्या या चळवळीला देशभर प्रतिसाद मिळाला. जयप्रकाश मार्क्सवाद, समाजवाद, लोकशाही या मार्गांनी सर्वोदयाकडे वळले होते, तरीसुद्धा या विचारपरिवर्तनात त्यांचा क्रांतीवरील विश्वास ढळला नव्हता.

सर्वोदयी समाजाकडे जाण्याचे एक साधन वा माध्यम असे या विचारांचे स्वरूप आहे. सर्वोदयवादी विचार हे त्याचे तात्त्विक अधिष्ठान असून, समग क्रांतीच्या मुळाशी प्रेरक असलेल्या ध्येयवादात सर्व नागरिकांचे सर्वतोपरी हित व विकास ही अंतिम मूल्ये गृहीत धरलेली असतात. ही एक कमश: सातत्यपूर्णरीतीने घडून येणाऱ्या परिवर्तनाची प्रक्रिया आहे. ‘ क्रांती ’ या शब्दाला असलेला रूढ अर्थ या विचारात अभिप्रेत नाही. हा एक रक्त-विहीन, अनात्याचारी आणि अहिंसक अशा परिवर्तनाचा मार्ग आहे. एकाएकी घडून येणाऱ्या प्रचंड राजकीय आणि सामाजिक उलथापालथीला यात स्थान नाही.

समग्र क्रांतीचा विचार हा माणसाच्या आचार, विचार, मूलभूत प्रवृत्ती यांत परिवर्तन घडवून आणणारा विचार आहे. मानवी स्वभाव परिवर्तनीय आहे. मानवी वृत्तींना प्रभावित करणाऱ्या स्वार्थ, स्पर्धा, महत्त्वाकांक्षा या प्रवृत्ती आणि निर्भयता, शांतता या दिशेने जाणारे समग्र क्रांती हे एक विकासाभिमुख तत्त्वज्ञान आहे. मानवी जीवनाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि नैतिक अंगांवर तिचा भर आहे. त्याचबरोबर त्यांना समाजातील सांस्कृतिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक क्षेत्रांतील परिवर्तनही अभिप्रेत आहे.

आर्थिक अंग : केवळ वाढते उत्पादन हा आर्थिक विकासाचा अर्थ नसून व्यक्ती हा आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू मानून बेकारीचे निवारण, कुटुंब हा घटक धरून कामाचे वाटप आणि कुटुंब आणि व्यक्तीच्या किमान गरजा पूर्ण होतील, असे वेतन ही त्रिसूत्री आर्थिक क्रांतीचा आधार मानून केली आहे. (१) मोठया उदयोगांच्या विस्तारावर नियंत्रण, (२) उपयुक्त तंत्रज्ञानाचा जागरूकतेने वापर, (३) ग्रामीण आणि शहरी उदयोगांत समन्वय, (४) उत्पादनाच्या साधनांच्या मालकीत विविधता व अपव्ययाला प्रतिबंध भ्रष्टाचार, कामगारांचे शोषण यांना पायबंद तसेच कार्यक्षमता यांविषयी विधिवत नियमावली होय.

राजकीय अंग : व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे शासन किंवा अन्य संस्थांकडून त्यांची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेतली जाते. आणीबाणीच्या काळात या हक्कांची पायमल्ली झाली.

विकेंद्रित आणि सहभागात्मक लोकशाही हे राजकीय क्रांतीचे लक्ष्य असून त्यासाठी (१) निर्णय प्रकियेत लोकांचा थेट सहभाग, (२) विकास कार्यात लोकांच्या उपकमशीलतेला प्राधान्य, (३) भ्रष्टाचार निर्मूलनासाठी संघर्ष समित्या, (४) पक्षविरहीत लोकसत्तेची स्थापना, (५) विविध स्तरांवर – केंद्र, राज्य, जिल्हा, ग्रामसत्तेचे वास्तव स्वरूपात वाटप, ही तत्त्वे यात गृहीत धरलेली आहेत. व्यक्ती आणि समाज यांचे परस्परावलंबन लक्षात घेऊन सामुदायिक स्वावलंबी जीवनपद्धतीचा स्वीकार, यावर जयप्रकाशांचा भर होता. लोकशाही शासनपद्धती ही एक नैतिक जीवनप्रणाली आहे, असे ते मानत. स्वनियंत्रित कल्याणकारी समाजाची निर्मिती ही भूमिका त्यामागे होती.

सामाजिक अंग : यांत समाजातील कनिष्ठ व सामान्यातील सामान्य व्यक्तीचे कल्याण केंद्रस्थानी आहे. अल्पसंख्याक, आदिवासी, स्त्रिया आणि दुर्लक्षित घटकांच्या विकासाला यात प्राधान्य दिलेले आहे. या संदर्भात युवक आणि छात्रशक्ती – क्रांतीचे वाहक असतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या समित्या, दक्षतापथके यांव्दारे हे परिवर्तन घडवून आणता येईल. यांबाबतीत कायदयाचा माफक प्रमाणात वापरही करता येईल परंतु त्याला मर्यादा असल्यामुळे स्वयंस्फूर्त लोकसंघटन अधिक उपयुक्त ठरेल, अशी भूमिका जयप्रकाश नारायण यांनी घेतली.

शैक्षणिक अंग : शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन आहे. प्रचलित पाश्चात्त्यांकडून घेतलेली शिक्षणपद्धती कुचकामी असल्याचे मत जयप्रकाशांनी व्यक्त केले असून त्यात अमूलाग्र बदलाची आवश्यकता प्रतिपादिली आहे. त्यासाठी (१) गामकेंद्री शिक्षण व्यवस्था, (२) व्यापक प्रमाणात साक्षरता प्रसार, (३) स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रमाची आखणी, (४) साध्य आणि साधने यांना पुरक शिक्षण आणि (५) ज्ञान आणि जीवन यांना उपयोगी व व्यवहार्य शिक्षण दयावे.

समृद्ध सांस्कृतिक जीवनासाठी जयप्रकाशांनी वैचारिक आणि नैतिक परिवर्तनाची आवश्यकता प्रतिपादिली आहे. त्याकरिता गीतेतील ‘ स्वधर्म ’ आणि ‘ निष्काम कर्मयोग ’ या संकल्पना आधारभूत मानल्या आहेत. यासाठी जयप्रकाश नारायण भारतीय समाजजीवनातील नैतिकता आणि आध्यात्मिकता या पैलूंवर भर देतात. त्यांना अभिप्रेत असलेला आध्यात्मिकतेचा अर्थ केवळ मानव – ईश्वर संबंध किंवा कर्मकांडापुरता मर्यादित नव्हता तर व्यक्तीला समाजनिष्ठ बनवून तिची मानवतावादाच्या दिशेने वाटचाल करण्यास सहाय्यभूत अशी मूल्यव्यवस्था असा होता. समन्यायबुद्धी, सत्य, सचोटी, स्वातंत्र्य या मूल्यांची जोपासना करण्याचे कार्यकम हा समग्र क्रांतीचा एक भाग होता. स्वार्थ, सत्तांधता, सत्तालोलुपता आणि भ्रष्टाचार यांविरूद्ध संघटितपणे संघर्ष करणे. वरवर पहाता सकृतदर्शनी समग क्रांतीचा विचार स्वप्नाळू आदर्शवादाकडे जाणार वाटतो, पण त्याचे स्वरूप सामाजिक उन्नती आणि जागृती असे आहे. समग्र क्रांतीच्या विचारसरणीत आदर्शवाद आणि व्यवहारवादाची सांगड घालण्याचा जयप्रकाश यांनी प्रयत्न केला आहे. ही एक कालातीत समृद्ध समाजाच्या उभारणीच्या दिशेने सतत वाटचाल करणारी विचारसरणी आहे.

संदर्भ : 1. Gupta, Ram Chandra, J. P. From Marxism to Total Revolution, New Delhi, 1981.

२. जोशी, वि. सी. समग्र क्रांती, औरंगाबाद, १९८०.

३. धर्माधिकारी, आचार्यदादा, संपूर्ण क्रांती, पुणे, १९७८.

४.नारगोलकर, वसंत, संपूर्ण क्रांतीच्या दिशेने, मुंबई, १९७७.

दाते, सुनील