अभिधम्मपिटक : त्रिपिटकातील एक पिटक. ह्या पिटकात धम्मसंगणि, विभंग, धातुकथा, पुग्गलपंजत्ति, कथावत्थु, यमक आणि पट्ठान ह्या सात ग्रंथांचा समावेश होतो. हे सात ग्रंथ ‘सत्तपकरण’ या नावाने ओळखले जातात. ह्या पिटकात मन, सभोवतालची बाह्य चराचर सृष्टी आणि निर्वाण यांच्यासंबंधीचे अत्यंत पांडित्यपूर्ण पण क्लिष्ट असे विवेचन आहे. साहजिकच याचे अध्ययन विद्वानांपुरतेच मर्यादित आहे. मनुष्य हा नामरूपात्मक असल्यामुळे नाम म्हणजे मन व त्याच्याशी संलग्न असलेले धर्म आणि रूप म्हणजे शरीर यांचे यथार्थ ज्ञान करून देणे हा या पिटकाचा मुख्य हेतू आहे. धम्मसंगणि या पहिल्या ग्रंथात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले नीतीविषयक चिंतन आले आहे. मानसिक स्थितींचे कुशल आणि अकुशल असे दोन प्रकार सांगून या दोन्ही प्रकारांत न बसवता येण्यासारख्या मानसिक अवस्थांचा अव्याकृत नामक तिसरा प्रकारही दिलेला आहे. इंद्रियगत विश्वाशी संबद्ध असलेल्या विचारांचे आठ मुख्य प्रकार यात विवेचिलेले आहेत. मनाशी संलग्न असलेल्या वेदना, संज्ञा, संस्कार इत्यादींचा परामर्शही येथे घेण्यात आलेला आहे. रूप हे किती प्रकारचे असते, याविषयीही सखोल विचार आढळतो. या ग्रंथास श्रीलंकेमधील बौद्धधर्मीयांत फार मोठी मान्यता लाभली आहे. विभंग या दुसऱ्या ग्रंथात बौद्ध तत्त्वज्ञानाचे यथार्थज्ञान होण्यासाठी ज्यांचे ज्ञान मिळविणे आवश्यक आहे अशा स्कंध, धातू, आयतन, सत्य, इंद्रिये, प्रतीत्यसमुत्पाद, स्मृत्युपस्थान इ. विषयांवर अठरा परिच्छेद आहेत. धातुकथा व पुग्गलपंजत्ति या दोन लहान ग्रंथांत अठरा धातू आणि निरनिराळ्या नैतिक अवस्थांमधील पुरुषांचे वर्णन आहे. कथावत्थु या पाचव्या ग्रंथात अशोकाच्या काळात झालेल्या तिसर्‍या धम्मसंगीतीच्या वेळी दिसून आलेली निरनिराळी पाचशे पाखंडी मते व त्यांचे खंडन आले आहे. हा ग्रंथ या धम्मसंगीतीचा अध्यक्ष मोग्गलीपुत्त याच्या नावावर मोडतो. हे मत सर्वच विद्वानांना मान्य आहे असे नाही. हा ग्रंथ अशोकाच्या काळात लिहिलेला असल्यामुळे त्याला बुद्धवचन म्हणून मान्यता देण्यास इतर संप्रदायांचा विरोध होता. यमक या सहाव्या ग्रंथात कुशल व अकुशल धर्म, स्कंध, आयतन, धातू, चित्त इत्यादींसंबंधी कोडीवजा प्रश्नांच्या जोड्या करून त्यांची उत्तेर दिलेली आहेत. तर्कशुद्ध विधाने कशी असावीत, ह्यासंबंधीची पारंपारिक दृष्टीही ह्यात दिसते. हा आणि शेवटचा पट्ठान हे दोन ग्रंथ अत्यंत किचकट आणि पारंपारिक मदतीवाचून समजण्यास कठीण असे आहेत. पट्ठान या ग्रंथात दोन गोष्टींचा परस्परसंबंध चोवीस प्रकारचा असू शकतो याचे अतिविस्तारपूर्वक केलेले विवेचन आहे. अभिधम्मपिटक हे सर्वांत शेवटी अस्तित्वात आलेले पिटक असून त्यातील काही भाग तरी श्रीलंकेमध्ये रचिले गेले असावेत असा विद्वानांचा तर्क आहे. या पिटकाचा अभ्यास हल्ली ब्रह्मदेशात विशेष होतो. 

पहा : त्रिपिटक बौद्ध दर्शन.

बापट, पु. वि.