पांगारकर , लक्ष्मण रामचंद्र : (३१ जुलै १८७२–१०नोव्हेंबर १९४१). प्राचीन मराठी वाङ्मयाचे इतिहासकार, मराठी संतचरित्रकार, हरिभक्तपरायण भागवतधर्मप्रचारक आणि रसाळ वक्ते. जन्म चिपळूणचा. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव पांगरी (ता. बार्शी जिल्हा सोलापूर). तथापि पुढे त्यांचे घराणे पुण्याजवळील पौड येथे स्थायिक झाले. पांगारकरांच्या वडिलांचे नाव कृष्णाजी. तथापि पांगारकर हे आपले चुलते रामचंद्रपंत ह्यांना दत्तक गेले होते. पांगारकरांचे प्राथमिक शिक्षण पौड येथे, माध्यमिक शिक्षण पुण्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ मध्ये आणि उच्च शिक्षण मुख्यतः पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. १८९९ मध्ये ते बी. ए. झाले. त्यानंतर पंढरपूर, पुणे, अमरावती येथे ते शिक्षक म्हणून होते. हा व्यवसाय सोडून १९०७ मध्ये ‘भक्तिज्ञानवैराग्यविवर्धक विचारांच्या लहरी स्वधर्मबांधवात वाढीस लावाव्या’ ह्या हेतूने मुमुक्षु नावाचे साप्ताहिक त्यांनी धुळे येथे काढले. पुढे ह्या साप्ताहिकाचे मासिकात रूपांतर करून ते त्यांनी पुण्यास आणले. मुमुक्षूचे १९३० पासूनचे अंक नासिकहून निघाले. मुमुक्षु काढल्यानंतर लेखन-संशोधन-प्रवचन-हरिभक्तिप्रसार अशा कार्यांनाच त्यांनी वाहून घेतले. १९१६ ते १९२३ ह्या कालखंडात इंदूर संस्थानचे महाराज तुकोजीराव होळकर ह्यांच्याकडे परमार्थाचे शिक्षक म्हणून त्यांचे जाणे-येणे आणि वास्तव्य असे आयुष्यातली अखेरची बरीच वर्षे त्यांनी नासिकला काढली. वर्धा येथे ते निधन पावले.
अशा प्रकारे अनेक वर्षे प्राचीन मराठी कवी आणि त्यांचे काव्य यांच्याशी एकरूप झालेले पांगारकर प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास प्रसिद्ध करण्याच्या अवस्थेपर्यंत आले. त्या इतिहासाचे कालसापेक्ष असे तीन भाग कल्पून त्यांनी हे इतिहास–खंड प्रसिद्ध केले. मराठी वाङ्मयाचा इतिहास–खंड १ ला (१९३२) यात ज्ञानेश्वर–नामदेव व त्यांचे समकालीन कवी खंड २ रा (१९३५) यात एकनाथ-तुकाराम व त्यांचे समकालीन कवी खंड ३रा (१९३९) यात रामदास आणि तत्कालीन कवी यांची माहिती आली आहे. ह्या खंडाची अखेरची १२९ पृष्ठे ज. र. आजगावकर ह्यांच्या हातची आहेत. वृद्धापकाळाने थकून गेल्याने हा ग्रंथ पांगारकर स्वतः पूर्ण करू शकले नाहीत. पाल्हाळ, पुनरुक्ती असे दोष ह्या इतिहासलेखनात असले, तरी ते खंड माहितीपूर्ण आहेत. चरित्रचंद्र (१९३८) हे पांगारकरांचे आत्मचरित्र.
मुमुक्षु या पत्रात पांगारकरांनी पारमार्थिक, संशोधनपर तसेच सामाजिक व राजकीय अशा विषयांवरील अनेक लेख लिहिले. राजकारणात ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. पहिल्या दोन वर्षांतील लेखांचे दोन भाग मुमुक्षुचे उद्गार (१९०८ व १९०९) या नावाने प्रसिद्ध झाले. सरकारने ते जप्त केले. तसेच रामदासी बोवा (१९०७) हे पुस्तकही जप्त झाले. मुमुक्षूत आलेल्या लेखांवरून पुढे बरीच पुस्तके प्रसिद्ध झाली. उदा., पारिजातकाची फुले (१९१३) नारदभक्तिसूत्रे, सार्थ व सटीक (१९१४) नवविधा भक्ति (दुसरी आवृ.१९२६), भक्तिमणिमाला (१९२४), टिळकांचे अल्प चरित्र आणि संस्मरणीय उक्ति (१९०८) मुमुक्षूचे सिंहावलोकन म्हणजेच मुमुक्षूतील निवडक निबंध–भाग १ (१९२३), भाग२ (१९२३) आणि भाग ३ (१९२९).
पांगारकरांनी प्राचीन मराठी वाङ्मयाचे अत्यंत आवडीने आणि समरसतेने अध्ययन केले होते. मराठी भाषा आणि इतिहास यांचा साक्षेपी व्यासंग करून, आपल्या लेखणीचा आणि वाणीचा प्रभावी वापर करून, जनमानसात या विषयांची गोडी निर्माण करण्याचे कार्य त्यांनी आमरण केले. ते श्रद्धाळू, भक्तिपरायण आणि एकनिष्ठ अभ्यासक होते. मराठी भाषेचा इतिहास ‘स्वराज्यातील कवी’ या चौथ्या खंडाने पूर्ण करण्याचा त्यांना प्रयत्न होता तथापि त्यांच्या निधनामुळे तो अपूर्ण राहिला.
गोखले, म. वि.
“