सरदार वल्लभभाई पटेल

पटेल, वल्लभभाई जव्हेरभाई : (३१ ऑक्टोबर १८७५–१५ डिसेंबर १९५०). भारतीय स्वातंत्र्य-आंदोलनातील एक ज्येष्ठ नेते व स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान. जन्म लेवा पाटीदार शेतकरी कुटुंबात करमसद (खेडा जिल्हा) येथे. त्यांच्या आईचे नाव लाडबाई. विद्यार्थिदशेतच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभी करून एका कठोर शिक्षकाविरुद्ध तीन दिवसांचा यशस्वी संप घडवून आणला. प्राथमिक शिक्षण करमसद येथे घेऊन पुढील शिक्षण त्यांनी पेटलाड, बडोदा व नडियाद येथे घेतले. विद्यार्थिदशेतच जव्हेरबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). १८९७ साली नडियादहून ते मॅट्रिक झाले. घरच्या गरिबीमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. ते त्यावेळची वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. वकिलीत पैसे मिळवून बॅरिस्टर होण्याची त्यांना जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. ते मुख्यतः फौजदारी खटले गोध्रा येथे चालवीत. वकिलीत त्यांना पैसा व प्रतिष्ठा दोहोंचा लाभ झाला. त्यांनी इंग्लंडला जाण्याकरिता १०,००० रु.जमविले आणि पारपत्रही काढले परंतु आद्याक्षरातील सारखेपणाचा फायदा घेऊन त्यांचे वडीलबंधू विठ्ठलभाई बॅरिस्टर होण्यासाठी १९०५ मध्ये इंग्लंडला गेले. वल्लभभाईनी त्यांना संमती तर दिलीच पण आपले पैसे व कपडे दिले व त्यांचा प्रपंचही चालविला. वल्लभभाईंच्या पत्नी १९०९ साली वारल्या. पुढील वर्षी ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. या परीक्षेत त्यांचा पहिला क्रमांक आला व ५० पौडांचे पारितोषिक त्यांना मिळाले. १९१३ साली ते परत आले व अहमदाबादला त्यांनी वकिली सुरू केली. प्रारंभी ते लोकमान्य टिळकांच्या जहाल पक्षात सामील झाले. त्यांचे प्रारंभीचे जीवन काहीसे विलासी व चैनीचे होते. क्लब, पत्ते खेळणे यांत ते उरलेला वेळ घालवीत. महात्मा गांधी अहमदाबादला येईपर्यं त्यांची ही दिनचर्या चालू होती पण गांधीच्या सहवासाने ते पूर्णतः बदलले (१९१७). महात्मा गांधी गुजरात सभेचे अध्यक्ष व वल्लभभाई चिटणीस झाले. त्यांनी १९१७-१८ सालच्या खेडा सत्याग्रहात हिरिरीने भाग घेतला आणि तो यशस्वी करून दाखविला. अहमदाबाद नगरपारिकेत ते याच वर्षी निवडून आले. पुढे तर १९२४–२८ दरम्यान ते नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी अनेक सुधारणा करून अहमदाबाद शहर स्वच्छ व सुंदर केले. त्यांनी केलेल्या सुधारणांत जलनिकास व्यवस्था व पाणीपुरवठा योजना या दोन महत्त्वाच्या होत. त्या वेळी गुजरातमध्ये वेठबिगार पद्धती होती. त्यांनी प्रयत्न करून ती पद्धत बरीच मर्यादित केली. रौलट कायद्याचे वेळी त्यांनी आक्षिप्त राष्ट्रीय साहित्य विकले व सार्वजनिक निदर्शनांत भाग घेतला. गांधींच्या असहकारितेच्या चळवळीत वल्लभभाई आघाडीवर होते. त्यांनी सुखासीन राहणीमानाचा त्याग केला व तत्काळ वकिली सोडली. या सुमारास सु. दहा लाखांचा निधी गोळा करून गुजरात विद्यापीठाची स्थापना केली (१९२०). १९२१ साली ते गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि लवकरच अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष बनले. १९२३ सालच्या नागपूर झेंडा सत्याग्रहात त्यांच्याकडे नेतृत्व होते. त्यांनी तो सत्याग्रह यशस्वी केला. याच सालच्या बोरसद सत्याग्रहातही ते यशस्वी झाले. १९२७ साली ते नगरपारिकेचे अध्यक्ष असताना गुजरातमध्ये जलप्रलय़ झाला. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामी त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. १९२८ च्या फेब्रुवरीत बार्डोलीला करबंदीची चळवळ जोरात सुरू झाली. त्या लढ्याची संपूर्ण योजना वल्लभभाईंची होती. फेब्रुवारी १९२८ ते ऑक्टोबर १९२८ पर्यंत हा लढा चालू होता. त्यात त्यांनी घवघवीत यश मिळविले. त्यांचे नाव सर्व भारतभर दुमदुमू लागले व याच वेळी सरदार ही उपाधी त्यांना प्राप्त झाली. १९३० साली मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाषणबंदीचा हुकूम मोडला आणि रास गावी भाषण केले. त्यामुळे त्यांना शिक्षा व तुरुंगवास भोगावा लागला. यानंतर त्यांना ३ महिने, ९ महिने अशा आणखी शिक्षा झाल्या. सरदारांचे कर्तृत्व व काँग्रेसमधील कार्य यांचा विचार करून त्यांना कराची काँग्रेसचे अध्यक्षस्थान देण्यात आले (१९३१). गांधींबरोबरच त्यांनाही १९३२ मध्ये अटक झाली व येरवड्यास स्थानबद्ध करण्यात आले. त्यांना जुले १९३४ मध्ये सोडण्यात आले. पुढे बिहारच्या भूकंपाच्या वेळी काँग्रेसचे विधिमंडळ प्रवेशविषयक धोरण बदलले. त्या साली पार्लमेंटरी बोर्ड स्थापन झाले आणि सरदार त्याच्या उपसमितीचे अध्यक्ष झाले. १९३६ साली पुन्हा त्यांना प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणूक मंडळाचे अध्यक्ष केले. सरदारांची ती कामगिरी अत्यंत मोलाची होती. १९३८ च्या हरिपूर काँग्रेसचे ते स्वागताध्यक्ष आणि सुभाषबाबू अध्यक्ष होते. त्याच साली राजकोटच्या महाराजांबरोबर संस्थानी प्रजेतर्फे त्यांनी तडजोड केली पण महाराजांनी ती तडजोड अमान्य केली. सरदारांनी कायदेभंग सुरू केला. त्याच कारणाने गांधींना ३ ते ७ मार्च १९३९ दरम्यान उपवास करावा लागला. १९४० च्या नोव्हेंबरमध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना स्थानबद्द करण्यात आले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी ‘छोडो भारत’चा ठराव संमत होण्यापूर्वीच सरदारांनी गुजरात पेटवला होता. ९ ऑगस्टला त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात इतर काँग्रेसच्या नेत्यांबोबर अटकेत ठेवले. १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका झाली. 

सुटकेनंतर सिमला परिषद, कॅबिनेट मिशन वगैरेंत त्यांनी भाग घेतला. त्यांच्या मध्यस्थीने मुंबईच्या नाविक बंडाला (१९४६) आळा घातला गेला. २ सप्टेंबर १९४६ रोजी हंगामी मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून ते समाविष्ट झाले. घटनापरिषदेचे ते सभासद होतेच. त्यांनी सुरुवातीस कम्युनिस्टांची बंडे निपटून काढली पण सरदारांचे सर्वांत मोठे, महत्त्वाचे व राष्ट्रीय ऐक्याचे काम म्हणजे संस्थानांच्या वलीनीकरणाचे काम होय. त्यांनी हैदराबाद, जुनागढ व काश्मीर सोडून इतर सु. ५५० संस्थाने भारतात विलीन केली. पुढे त्यांनी हैदराबाद संस्थानही, पोलीस कारवाई करून खालसा केले. या विलीनीकरणाच्या कार्यात त्यांना व्ही. पी. मेनन यांचे बहुमोल साहाय्य झाले. प्रसिद्ध सोरटी सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी व व्यवस्थेसाठी त्यांनी एक विश्वस्त निधी उभा केला. अस्पृश्यांना त्या देवळात प्रवेश व पूजा करण्याचा हक्क विश्वस्त पत्रकात वल्लभभाईंनी नमूद केला तसेच सर्व धर्मांंच्या व्यक्तींना खुल्या प्रवेशाची तरतूदही त्यात नमूद केली. ही त्यांची इच्छा पुढे १९५१ मध्ये पुरी झाली. महात्मा गांधीचा ३० जानेवरी १९४८ रोजी खून झाला. आपण गृहमंद्री असताना ही घटना घडावी, यामुळे ते अत्यंत उद्विग्न झाले. यानंतर काही दिवसांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. ३१ ऑक्टेबर १९४८ रोजी मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रत्नजडित सोन्याचा अशोकस्तंभ आणि चांदीची मोठी प्रतिमा त्यांना अर्पण करण्यात आली. त्यांना नागपूर, प्रयाग, उस्मानिया यांसारख्या अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त १९५० साली अहमदाबाद शहरातर्फे त्यांना पंधरा लाख रुपयांची थैली अर्पण केली. त्यानंतर सरदारांची प्रकृती अधिक क्षीण झाली. हवा पालटण्यासाठी ते १२ डिसेंबर रोजी मुंबईस आले. तेथेच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अंत झाला. त्यांच्या मुलाचे नाव डाह्याभाई व मुलीचे मणिबेन. 

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्योत्तर भारतात वल्लभभाईंना मानाचे स्थान आहे. एकात्म भारताचे ते खरे शिल्पकार असून काँग्रेसच्या पक्ष संघटनात्मक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. भारताचा पोलादी पुरुष म्हणून त्यांची जगभर ख्याती होती. ते धार्मिक व परंपरागत विचारसरणीचे होते आणि वृत्तीने अत्यंत कणखर होते. ते स्वतःला एक सामान्य शेतकरी व काँग्रेसचा एक नम्र सैनिक म्हणत. शेतकऱ्यांत स्वाभिमान निर्माण झाला, यात आपण कृतार्थ झालो असे ते मानीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि तत्काळ कृती यांवर त्यांचा भर असे. जवाहरलाल नेहरूंचा सामाजवादी आदर्शवाद त्यांना मान्य नव्हता. ते पूर्णतः वास्तववादी होते. त्यांचे व नेहरूंचे अनेक तात्त्विक मतभेद होते पण महात्मा गांधी या दुव्यामुळे ते एकत्र काम करीत. शिवाय दोघांना व्यक्तिगत मतभेदांपेक्षा देशाचे कल्याण व भवितव्य श्रेष्ठ वाटे. देशाच्या फाळणीमागील द्विराष्ट्रवाद त्यांना अमान्य होता. मुसलमानांनी भारतीयांमध्ये एकरूप व्हावे, असे त्यांना वाटे. पण तत्कालीन परिस्थितीच्या दबावाखाली व गांधींमुळे त्यांनी ती योजना नेहरूंबरोबर मान्य केली. स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्ठी घडवून आणणारी  चाणाक्ष बुद्धी, कठोर शिस्त व परिस्थितीचे विलक्षण आकलन हे राजकारणी मुत्सद्याला आवश्यक असणारे गुण त्यांच्यात होते. कोणत्याही प्रश्नाकडे ते फलप्रमाण्यवादी दृष्टिकोनातून पाहत. म्हणूनच त्यांना श्रद्धांजली वाहताना द टाइम्सने (लंडन) त्यांचा गौरव बिस्मार्कपेक्षा श्रेष्ठ राजकरणपटू म्हणून केला आहे.

संदर्भ : 1. Das, Durga, Ed. Sardar Patel’s Correspondence, 10 Vols., Ahmedabad, 1971–74. 2. Panjabi, K. L. The Indomitable Sardar, Bombay, 1962. 3. Parikh, N. D. Sardar Vallabhbhai Patel, 2 Vols., Ahmedabad, 1953–56. 4. Patel, P. U. Sardar Patel : India’s Man of Destiny, Bombay, 1964.  

                              

देशपांडे, सु. र.